मराठी शब्दप्रयोग
*बोलतो मराठी*
----------------------------
परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
बायको - "तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का?"
नवरा - "नको, मी आहे तोच ठीक आहे. आली मोठी जादूगार!"
आता इथे विनोद निर्माण झालाय कारण 'बनवणे' हे क्रियापद तेथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाक घरात नको इतके घुसले आहे!
मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळेच पदार्थ 'बनवले' जातात. मराठीत 'बनवणे' म्हणजे 'फसवणे' असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचा उत्तप्पा 'बनवणारा' जादूगार नवर्याला आठवला तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत 'मारणे' हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, पाकीट मारणे, शिट्टी मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हात-पाय मारणे, माशा मारणे इत्यादी. 'मारणे' म्हणजे 'मार देणे' असा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणेच वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहित आहे ना? खांद्याला खांदा लावणे (सहकार्य करणे) आणि खांदा देणे (प्रेताला खांदा देणे) यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरायची सवय असायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा, हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय आणि कोण फिरकी घेतोय हेच कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ 'अंगाला लावणे' आणि 'अंगावर घेणे'
'तिला हसणे' म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे हे सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. जसे 'तुझी मदत करणे' या ऐवजी 'तुला मदत करणे' हवे. ‘त्यांचे धन्यवाद' या ऐवजी 'त्यांना धन्यवाद' असे म्हणायला हवे.
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात आणि कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकांसंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. जसे टेबल हा शब्द आपल्याला परका वाटत नाही. पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठीचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. "मी स्टडी केली" यातून काय अर्थ कळतो? त्याऐवजी "मी अभ्यास केला" हे म्हणणे योग्य नाही का?
भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. "मोरांबा" या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी आहे. जुन्याकाळी साखर मॉरिशस मधून यायची. म्हणून तिला मोरस म्हणायचे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे त्यातून कळते. "कदर करणे" असे आपण म्हणतो. हा वाक्प्रचार 'कद्र' या अरबी शब्दापासून तयार झालेला आहे. कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला.
शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ 'अनुसया' असे नाव नसून 'अनसूया' आहे. 'अन+असूया' अर्थात मनात असूया/मत्सर नसलेली अशी अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्क रुजतो. तसेच "जराजर्जर" या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. त्यातील "ज" उच्चार तालव्य (ज्य) असा आहे तर 'जरा' चा अर्थ थोडे. तर 'जर' चा अर्थ कलाबूत.
शब्दातील जे उच्चार दंततालव्य आहेत त्या उच्चारांवरही अर्थ अवलंबून असतो.
भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो? कोणत्या अक्षराशी तोडतो? या साऱ्यांना महत्त्व असते. 'सूत कताई' हा शब्द जर 'सूतक ताई' असा उच्चारला तर कसं वाटेल? तसंच 'अक्षरश:' हा शब्द लिहिताना 'अक्षर शहा' असे लिहिणे बरोबर आहे का? "पुराणातील वांगी पुराणात" नाही. त्याऐवजी "पुराणातील वानगी पुराणात" हे बरोबर आहे. 'वानगी' म्हणजे उदाहरण आणि आपण पुराणात शोधत राहिलो वांग्यांविषयीच्या गोष्टी. अशी फजिती होते!
काही वेळा दोन शब्द सारखे असतात आणि चकवतात. उदा. १) राजाचे कलेवर प्रेम होते २) अपघातस्थळी एक कलेवर पडले होते.
येथे पहिल्या वाक्यात "कलेवर" हे शब्द ह्या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रुप आहे तर दुसर्या वाक्यात "कलेवर" हे नाम आहे ज्याचा अर्थ शव असा होतो. आणखी एक उदाहरण आहे.
"पुण्याची खासियत म्हणजे पुण्याची प्राप्ती करून देणारी मंदिरे" या वाक्यात पहिला शब्द "पुणे" आणि नंतरचा "पुण्याची". ह्यामध्ये एक "पुणे" चे रुप आहे तर दुसरा शब्द "पुण्य" या शब्दाचे रुप आहे. त्यामुळे दोघांचे उच्चार वेगळे आहेत.
आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचे असेल तर शब्दातील अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत.
भाषेचा योग्य वापर करून तिचा सन्मान राखायला हवा. आपल्या घरी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही मिळवायला हवे. आपली भाषा हवेसारखी असते. ती आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे.
उदाहरणार्थ "आता पाऊस पडत आहे". पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वेगळ्या प्रतिक्रिया कशा देता येतात ते पहा १) पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली २) सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले.
अशी अनेक वाक्ये तयार करता येतील आणि त्यातून भाव खुलत जातात.
भाषा आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी" हे शब्द उच्चारायला खर्या अर्थाने पात्र ठरू.
Comments
Post a Comment