नास्तिक परिषदेत केलेले भाषण
नास्तिक परिषदेत केलेले भाषण
विनोद शिरसाठ
मित्रहो, नास्तिकांच्या परिषदेत नगरला भाषण करायला येशील का, असं कवी संतोष पवारने विचारलं; तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता मी ‘हो’ म्हणालो. याचं कारण, एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद मला उपभोगायचा होता. जवळपास दोन दशकांपूर्वी मी बारावीनंतर नगर सोडून पुण्यात गेलो. अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि महावीर वाचनालयात मी त्या आधीची तीन-चार वर्षे सरासरी रोज दोन तास वेळ घालवला होता. मुख्यत: वृत्तपत्रांचेच वाचन केले होते आणि तरीही स्वत:ला ‘नास्तिक’ म्हणवून घेण्याइतपत मजल मारली होती... तर पुण्यात गेलो आणि काहीच दिवसांनी वृत्तपत्रात एक छोटेसे निवेदन वाचले- ‘‘मी नास्तिक कसा झालो? या विषयावर निबंध पाठवा. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. पत्ता- माधव गवाणकर, संपादक, ‘साद’ अनियतकालिक, वडाचा कोड, मु.पो.ता.दापोली, जि.रत्नागिरी.’’ माझ्या अंगात बळ संचारले. निबंध लिहायचा ठरवले. बरेच मुद्दे काढले. संगतवार लावले. आठ-दहा पाने लिहिली. पाठवली. आणि दोन-तीन महिन्यांनंतर दहा-पंधरा पानांचे ते छोटेसे अनियतकालिक आले... साद. त्यात इतर अनेकांप्रमाणेच माझ्याही लेखनातला एक परिच्छेद आला होता. माझ्या नावाने काही तरी छापून येण्याची ती पहिली वेळ. विषय- ‘मी नास्तिक कसा झालो?’
त्यानंतर काही महिन्यांनी मी श्रीविद्या प्रकाशनात गेलो होतो. त्यांच्या सूचीमध्ये एका पुस्तिकेचा उल्लेख दिसला. ‘परमेश्वरावर मात : लेखक- ए.सूर्यनारायण, ए.हरनाथ.’ पुस्तिका घेतली, वाचली. हरखून गेलो. फारच भारी ऐवज हाती आल्याचा आनंद झाला. परत श्रीविद्यामध्ये गेलो. दहा पुस्तिका खरेदी केल्या, दहा मित्रांना भेट दिल्या. ‘तुमच्या मनातील ईश्वरविषयक भूमिका तयार व्हावी, यासाठी उपयुक्त ठरेल यासाठी सप्रेम भेट.’ या आशयाचा सुवाच्च अक्षरातील संदेश आणि लफ्फेदार स्वाक्षरी करून ती पुस्तिका भेट देण्याचा अवर्णनीय आनंद मी उपभोगला. त्या पुस्तिकेच्या समारोपामध्ये असं म्हटलं होतं की, ‘अजूनही तुमचा देवावर विश्वास असेल तर साक्षात परमेश्वरही तुमचे संरक्षण करू शकणार नाही.’ फक्त प्रश्न विचारत जाणारी आणि सुसंगत उत्तर देताच येणार नाही, अशी ती पुस्तिका मी त्यानंतर पंचवीस-तीस मित्रांना भेट दिली. त्या पुस्तिकेचा अनुवाद केला होता वाई (जि.सातारा) येथील डॉ.शरद अभ्यंकर यांनी. त्यांना पत्र पाठवले, ‘तुम्हाला भेटायला आवडेल.’ पुण्यात तुमचा ग्रुप असेल तर सांगा, असेही लिहिले. ‘पुण्यात बुद्धिप्रामाण्यवादी विचारमंच आहे, तिथे जा.’ असे त्यांनी पत्र पाठवून कळवले.
आणखी काही दिवस गेले. वृत्तपत्रांमध्ये एका पुस्तकाचे परीक्षण वाचले. ‘ईश्वर नव्हे, मीच खरा-’ लेखक- नारायण देसाई (गांधीजींचे मानसपुत्र महादेवभाई देसाई यांचे हे चिरंजीव. अलीकडेच त्यांचे निधन झाले.) पुस्तक प्रदर्शनात गेलो, ते पुस्तक मिळवले. आणखी मजा आली. चांगलाच बौद्धिक खुराक होता तो. त्यानंतर काही दिवसांनी शरद बेडेकर यांचे पुस्तक हातात पडले- ‘ईश्वरविरहित जीवन.’ (सध्या या बेडेकरांचा ‘लोकसत्ता’मध्ये कॉलम चालू आहे.) बेडेकरांची आणखी दोन पुस्तके वाचली. अर्थातच, खूप आवडली. त्याच दरम्यान ईश्वराविषयीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदर्भ असलेले अनेक लेख, वाचत होतो- भाषणे ऐकत होतो आणि स्वत:ला ‘नास्तिक’ म्हणवून घेताना अभिमानच वाटत होता. ईश्वराचे अस्तित्व नसल्याची खात्री पटली होती. त्याबाबतची माझी भूमिका पुढील दोन-तीन वर्षांत इतकी पक्की झाली की, वाईच्याच शरद अभ्यंकरांचा ‘मी नास्तिक का आहे?’ या शीर्षकाचा एक छोटा लेख दै.सकाळच्या संपादकीय पानावर आला आणि पुढील दोन आठवडे बाजूच्या व विरोधातील पत्रांचा पाऊस पडला; तेव्हा ते सर्व वाचून मला असे वाटले की, शरद अभ्यंकरांनी ‘ते नास्तिक का आहेत’ याची फारच वरवरची कारणे दिली आहेत, त्यांनी अधिक खोलात जायला हवे होते. तसे न केल्याने, या लेखातून नास्तिकांची खरी भूमिका पुढे येतच नाही. तशा आशयाचे सविस्तर पत्र ‘सकाळ’कडे पाठवले आणि दुसऱ्याच दिवशी ‘हा वाद आता थांबवत आहोत’ अशी टीप ‘सकाळ’च्या पत्रव्यवहारात वाचली. मग त्या पत्राची झेरॉक्स अभ्यंकरांना पाठवली. त्यांचे नम्र उत्तर आले, ‘तू म्हणतोयस ते खरेही असेल, पण जागेची मर्यादा लक्षात घेता मला तेवढेच लिहिता आले, वगैरे...’ त्यानंतर ‘मी नास्तिक का आहे?’ ही भगतसिंगांची पुस्तिका वाचली. त्या पुस्तिकेबाबतही मला अपूर्णत्वच जाणवले. पण असेही वाटले की, भगतसिंग 23 व्या वर्षी गेले आणि 1930 च्या आधी ती पुस्तिका लिहिलेली असल्याने ते अपूर्णत्व साहजिक आहे.
नंतरच्या टप्प्यावर श्याम मानव यांची दोन-तीन भाषणे ऐकली आणि ‘बुवाबाजी बळी स्त्रियांचा’ हे पुस्तक वाचले. त्यानंतर डॉ.नरेंद्र दाभोलकरांची एक-दोन भाषणे आणि दोनतीन पुस्तके. मला वाटते, ईश्वरविषयक विचार करण्याचा माझा दुसरा टप्पा इथून सुरू झाला असावा. साधारणत: इ.स.2000 हे वर्ष. पहिल्या टप्प्यात मी ईश्वराचे अस्तित्व नसल्याची माझी भूमिका घासून, पुसून, तासून घेत होतो. दुसऱ्या टप्प्यात मात्र, ईश्वरविषयक संकल्पनेमुळे समाजजीवनात काय व किती अनिष्ट घडत आले आहे आणि ते कसे रोखता येईल याचा विचार करू लागलो. त्यामुळे एका बाजूला सामाजिक बदलांच्या संदर्भात वाचन आणि विचार करू लागलो, तर दुसऱ्या बाजूला विज्ञानविषयक वाचन करीत मानवी उत्क्रांती कशी होत गेली हे समजून घेत गेलो. (या दोनही प्रकारांतील वाचन किती व्हरायटीचे होते, हा खूप मोठा व स्वतंत्र विषय आहे.) सामाजिक परिवर्तन व विज्ञानाची वाटचाल अशा दोन्ही अंगांनी विचारप्रक्रिया चालू राहिली आणि मग हळूहळू नास्तिकता व बुद्धिप्रामाण्यवाद यापेक्षा ‘विवेकवाद’ हा शब्द जवळचा वाटायला लागला. त्याचदरम्यान डॉ.लागू व डॉ.दाभोलकर यांचा ‘वाद-संवाद : विवेक जागराचा’ हा कार्यक्रम दोन-तीन वेळा ऐकला, पाहिला. दोन-अडीच तासांचा तो कार्यक्रम म्हणजे मनात लाटा-लहरी उत्पन्न करणारी मस्त वैचारिक मेजवानी होती. ‘‘परमेश्वर हीच सर्वांत मोठी व पायाभूत अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावर प्रहार केल्याशिवाय अन्य अंधश्रद्धा दूर होणार नाहीत,’’ हा डॉ.लागू यांच्या मांडणीचा गाभा होता. याउलट, ‘‘ईश्वर या संकल्पनेला विरोध न करता, शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सेचा आग्रह धरणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे’’ ही चतु:सूत्री डॉ.दाभोलकरांच्या म्हणजे अंनिसच्या भूमिकेचा गाभा होती. तो वाद-संवाद ऐकून माझे असेच मत झाले की, ज्ञात अवकाशात ईश्वराचे अस्तित्व नाही, याबद्दल या दोनही डॉक्टरांचे एकमत आहे. फरक असेल तर एवढाच आहे की, ‘‘ईश्वर नाही असे सांगून कामाला लागा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करा,’’ असे डॉ.लागू यांना म्हणायचे आहे. तर ‘‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करायला लागा आणि मग आपोआपच ती व्यक्ती ‘ईश्वर नाही’ या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचेल, आणि समजा नाही पोहोचली तरी काही बिघडत नाही. दरम्यानच्या प्रवासात त्या व्यक्तीने जे काही टप्पे ओलांडलेले असतील, त्यांतूनही त्या व्यक्तीचे व समाजाचे भलेच होणार आहे; तेवढ्यावर समाधान माना... आपण ज्या कार्यक्षेत्रात आहोत, तेथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा याची जाणीव ठेवा’’ अशी डॉ.दाभोलकर व अंनिस यांची भूमिका होती आणि त्याप्रमाणेच त्यांनी पावशतक काम केले आहे.
आज नास्तिकांची परिषद भरली आहे. आणि तुम्हा सर्वांना असेच वाटत असणार की, डॉ.लागूंच्या म्हणण्याप्रमाणे चालून पाहावे. तुमच्यापैकी काहींनी डॉ.दाभोलकरांच्या व अंनिसच्या बरोबर काम केले आहे, अद्याप करत आहात. तरीही असा काही वेगळा प्रवास करावा वाटत असेल; तर याचा अर्थ तुम्हाला परिवर्तन आणि परिणाम अधिक गतीने-वेगाने व्हायला हवे आहेत, असे मी मानतो. तुम्हाला हा प्रवास कोणत्या पद्धतीने करायचा आहे, त्याची काही त्रिसूत्री- चतु:सूत्री-पंचसूत्री तुम्ही तयार केली आहे का, हे मला माहीत नाही. पण तसा प्रवास करायचे तुमच्या मनात असेल, तर त्याला शुभेच्छा देत असतानाच, त्या संदर्भातील आकलन मांडणे हे माझे कर्तव्य समजतो. माझे आकलन असे सांगते की, नास्तिकांना सार्वजनिक काम करायचे असेल, तर तीन प्रमुख आघाड्यांवरील अडथळ्यांचा सामना करावा लागेल. वैज्ञानिक, तात्त्विक आणि व्यावहारिक.
1. आज जे कोणी लोक निरीश्वरवादाची मांडणी करतात, त्यांचा प्रमुख मूलाधार आहे विज्ञान. म्हणजे, या पृथ्वी नावाच्या ग्रहावरच जीवसृष्टी आहे आणि या ग्रहावरील कोपरा-न्-कोपरा ज्ञात आहे, छाननी झाली आहे. त्यातून हे सिद्ध झाले आहे की, अशी कोणतीही दैवी शक्ती नाही, जी या ग्रहगोलाचे किंवा मानवी जीवनाचे, सजीव सृष्टीचे नियंत्रण करते. याबाबत सर्वत्र शोध घेऊन ‘असे काहीही अस्तित्वात नाही,’ हे विज्ञान सांगते. चंद्रावर माणूस उतरला आणि तिथेही ईश्वराचे अस्तित्व नाही, असे विज्ञानातून सिद्ध झाले आहे. आकाशगंगा, तिच्यातील ग्रह, उपग्रह, तारे आणि आकाशगंगेच्या बाहेरचा अफाट पसारा याबाबत मात्र आपल्याला जुजबी माहितीच विज्ञान देऊ शकले आहे. विज्ञानाने साध्य केलेली प्रगती अफाट आहे, जे शोधले आहे ते खूपच जास्त आहे, पण विज्ञानाला अज्ञात असा प्रदेश या विश्वाच्या पसाऱ्यात कितीतरी जास्त आहे. हा पसारा नेमका किती आहे, याबाबतही विज्ञान अद्याप सांगू शकलेले नाही आणि या विश्वाची निर्मिती कशी झाली असावी, याबाबत तीन-चार सिद्धांत मांडले जात आहेत; पण कशावरही अद्याप एकमत नाही. विश्वाची निर्मिती झाली त्याआधी काय होते, याबाबतही विज्ञान काही सांगत नाही. आधुनिक विज्ञानाने 500 वर्षांच्या इतिहासात कित्येक गूढ रहस्ये उलगडून दाखवली असली तरी अद्याप त्याच्या कित्येक पट रहस्ये उकलणे बाकी आहे. सारांशउपलब्ध पुरावे व ज्ञात माहिती लक्षात घेता, ईश्वराचे अस्तित्व नाही, असे विज्ञान ठामपणे सांगते. पण अज्ञात प्रदेशात काही असले तर? या प्रश्नाला विज्ञानाचे उत्तर ‘नाही’ असे नाही. ते उत्तर, ‘‘असूही शकेल कदाचित, पण शोधल्याशिवाय ‘हो’ किंवा ‘नाही’ कसे सांगणार?’’ असा प्रतिप्रश्न विचारणारे आहे.
मित्रहो, विज्ञान हे ठाम असते, निश्चित व निर्णयात्मक उत्तर देते; ते उत्तर स्थल, काल किंवा व्यक्ति-सापेक्ष नसते. पण विज्ञान नम्रही असते. निरीक्षणे, प्रयोग, तर्क, अनुमान या साखळीपद्धतीने विज्ञान पुढे सरकते. नवे पुरावे व नवी निरीक्षणे पुढे आली आणि नवे प्रयोग व नव्याने तर्क लावला तर नवे निष्कर्ष पुढे येतात, आधीचे रद्दबातल होतात. त्यामुळे ठामपणा व नम्रपणा यांचे अजब मिश्रण विज्ञानाच्या प्रक्रियेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनात असते. म्हणून ईश्वराच्या अस्तित्वाविषयी विज्ञानाची भूमिका अज्ञेयवादी आहे. म्हणजे विज्ञानाच्या साह्याने विश्वाच्या अफाट पसाऱ्याचे आकलन करून घेणारी कोणीही व्यक्ती स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवून घेण्यापेक्षा अज्ञेयवादी म्हणवून घेणे पसंत करील. म्हणजे स्वत:ला नास्तिक किंवा निरीश्वरवादी म्हणवून घेणाऱ्याला ‘अज्ञात प्रदेशातही ईश्वर नाही’ असे ठामपणे म्हणावे लागेल; पण ते कशाच्या आधारावर म्हणणार? त्या विधानाला विज्ञान आधार देऊ शकत नाही.
2. दुसरा अडथळा आहे तत्त्वज्ञानाचा. तत्त्वज्ञानाच्या बऱ्याच शाखा आहेत आणि त्यासंदर्भात बोलताना- लिहिताना Metaphysics, Philosophy, Ethics, आणि Morality इत्यादी संकल्पना आपल्या मनात येतात. यात भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते यांचा एकत्र विचार केला तर ही गुंतागुंत इतकी प्रचंड आहे की, निसर्गविज्ञानालाही ती लाजवेल. भारतातील वेद-उपनिषदे किंवा महर्षी कणाद आणि पश्चिमेकडील सॉक्रेटिस, ग्रीक फिलॉसाफी इथपर्यंत जायचे ठरवले; तर पाच हजार वर्षांपर्यंत मागे जावे लागेल. तत्त्वज्ञानाची गंभीर वा जड पुस्तके तर सोडाच, पण विंदा करंदीकरांची ‘अष्टदर्शने’ वाचली किंवा विल ड्युरांटचे ‘स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ (मराठी अनुवाद : पाश्चात्त्य तत्वज्ञानाची कहाणी- साने गुरुजी) वाचले, तरी मती गुंग होऊन जाईल. युगानुयुगे ईश्वराचा चाललेला शोध, या तत्त्वज्ञानाच्या वाचनातून/अभ्यासातून अधिकाधिक कठीण होत चालल्याचे लक्षात येईल. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या प्रांतात जितके खोल जावे तितका ईश्वराचा शोध दूरदूरचा वाटत राहतो. मात्र तरीही ‘ईश्वर नाहीच,’ यावर तत्त्वज्ञानाच्या विविध प्रवाहांचे एकमत होत नाही.
यात विशेष महत्त्वाचा भाग येतो तो धर्माच्या संदर्भात. ख्रिश्चन व इस्लाम हे एकेश्वरी धर्म एक धर्मग्रंथ मानणारे आहेत. हिंदू धर्माला असे ईश्वरांच्या व ग्रंथांच्या संख्येचे बंधन नाही. जैन व बौद्ध हे निरीश्वरवादाच्या जवळ जातात, पण कोणत्या ना कोणत्या प्रकारची अवतार कल्पना तिथे मानली आहे. शिवाय, पूर्वजन्म व पुनर्जन्म या संकल्पनाही त्यांच्यातील काही प्रवाहांमध्ये आहेत. म्हणजे सर्व धर्मांचे ईश्वरविषयक संकल्पनेवर एकमत नाही, हा मुद्दा निरीश्वरवादाला बळकटी देणारा आहे. पण सर्वच धर्मांचे अनुयायी ‘ईश्वर हा अनुभवाचा प्रांत आहे, तर्काचा नव्हे’ असे सांगतात. किंबहुना, धर्मश्रद्धेची चर्चा चालू असते तेव्हा पहिला बळी दिला जातो तो तर्काचाच. तर्क लावणे म्हणजे संशयी वृत्ती बाळगणे; हा श्रद्धेच्या मार्गातील प्रमुख अडथळा मानला जातो. त्यामुळे धर्मश्रद्धा किंवा धार्मिक तत्त्वज्ञानाच्या संदर्भात चर्चा/चिकित्सा करायला निरीश्वरवाद्यांना वा नास्तिकांना मान्यताच दिली जात नाही. धर्मपरंपरा नाकारून, ऐहिक जीवनात इष्ट-अनिष्ट ठरवण्याचा आग्रह धरणाऱ्या गोपाळराव आगरकरांनीही क्रांतिकारी मांडणी करत असताना स्वत:ला अज्ञेयवादी म्हणवून घेणेच पसंत केले होते. (तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र व इतिहास यांचा त्यांनी चांगलाच अभ्यास केला होता, असे त्यांच्या लेखनावरूनही दिसतेच!) त्यामुळे, नास्तिकांना स्वत:चे असे तत्त्वज्ञान मांडावे लागेल- ‘ईश्वर अस्तित्वात नाही’ या म्हणण्याचे. पण तसे कशाच्या आधारावर म्हणता येणार आहे? तत्त्वज्ञानाच्या व तर्काच्या पद्धतीने विचार केला, तर कोणत्याही धर्मातील ईश्वराचे किंवा कोणत्याही प्रकारच्या ईश्वरी सत्तेचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, हे खरे! पण तर्काच्या आधारावर ‘ईश्वर नाहीच’ असे सिद्ध करता येत नाही, हेही तितकेच खरे!
3. नास्तिकांना जास्त कठीण आव्हान आहे, ते व्यावहारिक पातळीवर. नरहर कुरुंदकर यांनी ‘मी आस्तिक का नाही?’ या लेखात असे विधान केले आहे की, शेकडा 98 माणसे त्यांना देवाविषयी नेमके काय वाटते ते खरे सांगत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत. त्या विधानाचा नेमका अर्थ असा आहे की, जगात नास्तिक एक टक्का असतात, तसेच प्रामाणिक व अभ्यासपूर्वक मत बनवलेले खरे आस्तिक एक टक्काच असतात. उरलेल्या 98 टक्क्यांनी आस्तिक-नास्तिक यांच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते. त्यामुळे, मित्रहो एक टक्का नास्तिकांना एक टक्का अस्तिकांशी संघर्ष करायचा आहे की, सीमारेषेवरील 98 टक्क्यांशी? या 98 टक्क्यांनी ईश्वराविषयी सखोल अभ्यास, विचार केलेला नसतो. उपलब्ध वेळेत व श्रमात त्यांना ते शक्यही नसते आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही. पाठीमागून चालत आलेल्या प्रथा-परंपरा ते पुढे घेऊन जात असतात. त्या रूढीपरंपरामध्ये मोठ्या विसंगती आहेत, ढोबळ विरोधाभास आहेत असे उघड दिसत असले; तरी ते पुढे चालवले जाते. त्यामुळे ‘ईश्वर नाही’ असे सांगून या 98 टक्क्यांशी लढायचे म्हणजे त्यांच्या अर्ध्या-कच्च्या धर्मभावनेशीच खेळायचे, असा अर्थ निघतो. आणि तुम्ही देवा-धर्माच्या विरोधात खेळताय म्हटले की; हा 98 टक्के वर्ग पुढचे काही ऐकून किंवा समजून घेण्याच्या मन:स्थितीतच नसणार, तेवढी त्यांची क्षमताही नसणार आणि त्यांच्याकडे तेवढी उसंतही नसणार. त्यांतले थोडे समजदार एवढेच म्हणतील की, ‘नसेलही कदाचित परमेश्वर; पण ईश्वर ही आंधळ्याच्या हातातली काठी आहे, ती तुम्ही कशाला काढून घेताय?’ डॉ.दाभोलकर आणि अंनिस यांची भूमिका ‘आम्ही त्याचे अंधत्व काढण्याचा प्रयत्न करतोय, मग त्याला काठीची गरजच राहणार नाही’ अशी होती. अंधत्व काढून घेणे ही महाकठीण गोष्ट आहे; त्यामुळे आंधळ्याच्या हातातील काठीबद्दल बोलणेच नको, अशी ती व्यावहारिक भूमिका होती, आहे!
नास्तिकांची या संदर्भातील भूमिका उलटी असू शकते. म्हणजे ईश्वर ही मूलभूत/पायाभूत अंधश्रद्धा दूर झाली तर पूर्वजन्म-पुनर्जन्म आणि पाप-पुण्याच्या कल्पना संपुष्टात येतील. मग जादूटोणा-भूत-भानामती, अतिंद्रिय शक्ती, विविध प्रकारचे ज्योतिष आणि या सर्वांतून उगम पावणाऱ्या विविध प्रकारच्या अंधश्रद्धा निर्माणच होणार नाहीत. पण व्यावहारिक प्रश्न हा आहे की, या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचे जोखड काढल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या मनात निरीश्वरवादाची संकल्पना कशी घुसवता येईल?
मित्रहो, वरील तीन प्रमुख अडथळ्यांच्यानंतर तीन छोटे पण महत्त्वाचे अडथळे सांगतो आणि थांबतो
1. घरातील व भोवतालच्या वातावरणातून झालेल्या संस्कारांच्या बळावर नास्तिक झालेली व्यक्ती आणि विचार-अभ्यास याद्वारे नास्तिक झालेली व्यक्ती यांच्यात दिसायला छोटा, पण प्रत्यक्षात खूप जास्त फरक असतो. केवळ संस्कारांच्या बळावर नास्तिक झालेली व्यक्ती कठीण प्रसंग आला तर दैवशरण होऊन शकते, व्यक्तिगत अनुभवावरून सामाजिक सिद्धांत मांडण्याची सवय तिला लागू शकते, अहंकारी वृत्तीची वाढ तिच्यात होऊ शकते आणि भावनांचे महत्त्व कमी लेखून कोरड्या जीवनव्यवहाराचा पुरस्कार करू शकते. हे समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक असते.
2. भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविका नजरेखालून घातली तरी लक्षात येईल, ही राज्यघटना ईश्वरी सत्तेविषयी एकही शब्द बोलत नाही, धर्म ही व्यक्तिगत बाब आहे असे मानते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन (सायंटिफिक टेंपरामेंट) समाजमनात रूजविणे हा कर्तव्याचा भाग आहे, असे स्पष्टपणे सांगते. त्यामुळे नास्तिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतीय राज्यघटना आपल्याला खूपच अनुकूल आहे हे खरे; पण देव, धर्म व उपासना याबाबतच्या व्यक्तिस्वातंत्र्याला पुरेपूर संरक्षण ती देते.
3. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी पहिल्यांदा उमेदवार होते तेव्हा प्रचारसभांमधून त्यांनी फार सर्वसमावेशक भाषणे केली. तेव्हा भाषणाची सुरुवात करताना ते उपस्थित ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू, हिंदू यांना संबोधित असतानाच ‘अथेइस्ट’ किंवा ‘नॉनबिलिव्हर्स’ (निरीश्वरवादी, निधर्मी, नास्तिक) असे संबोधनही वापरत असत. तेव्हा जगभरातील नानॅबिलिव्हर्स व अथेइस्ट लोकांनी ‘आपली दखल घेतली जात आहे’ म्हणून आनंद व्यक्त केला होता. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्याला इतर धर्म किवा पंथ यांच्यासोबत संबोधले जात आहे, म्हणजे नास्तिकांचा धर्म किंवा पंथ आहे असा तर अर्थ घेतला जात नाही ना?
(23 मार्च 2015 रोजी, सरदार भगतसिंग यांच्या स्मृतिनिमित्त अहमदनगर शहरात झालेल्या नास्तिक परिषदेत केलेले समारोपाचे भाषण.साधना साप्ताहिकाच्या 11 एप्रिल 2015 च्या अंकातून हे भाषण घेतले आहे. )
#weeklysadhana
#साधना_साप्ताहिक
#23_मार्च
#नास्तिक
Comments
Post a Comment