दहीहंडी गोविंदात्सोव
*आत्मा हरवलेला उत्सव - दहीहंडी गोविंदात्सोव*
*महाराष्ट्रातील गोविंदा दहीहंडीचे मूळ कोकणातील आहे. हे खरे आहे. पण त्याचे निश्चित मूळ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील बाणकोट भाग, दापोली भाग, मंडणगड, खेड तालुक्यातील, तसेच त्या जवळच्या सध्याच्या रायगड जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागातील (महाड, आंबेत, श्रीवर्धन) बाळ्ये/बाल्या, कुणबी आदी लोकांमधून आले आहे असे वाटते. यांना कृष्णबाळ यावरूनच बाळा, बाळ्या असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश 'बाल्या' असा झाला. हे बाणकोटी लोक 'ळ' चा उच्चार 'ल' असा करतात.*
*दक्षिण मुंबईत हे बाल्या लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त फार पूर्वी गेल्या शतकात दिडशे वर्षात स्थायिक झालेत. गिरगाव, खेतवाडी, माझगाव, घोडपदेव, लालबाग, परळ, वरळी या भागात हे बहुतांश लोक सुमारे शंभर दिडशे वर्षांपूर्वी मिलमध्ये बदली कामगार म्हणून कामाला किंवा त्या वेळच्या श्रीमंत लोकांकडे त्यात विशेषतः गुजराती, मारवाडी लोकांकडे घरगडी म्हणून कामाला होते. यांना रामा गडी असेही म्हटले जाते.*
*हे लोक त्याकाळी छोट्या प्रमाणावर दही-हंडी साजरी करत आणि गणेशोत्सवात त्यांच्या पारंपारिक पद्धतीने फेर धरून नाच-गाणी सादर करत. विजया मेहता यांनी त्यांच्या 'हयवदन' नाटकात बाल्या लोकांचे नृत्य दाखवले होते. तर महाराष्ट्र शाहीर 'शाहीर साबळें'च्या महाराष्ट्राची लोकधारा मध्ये छानसे बाल्या नृत्य दाखवले होते.*
*लहानपणी परळला गेल्यावर कामगार मैदान, नरे पार्क येथे रात्री उशिरा किंवा एखाद्या चाळीच्या आवारात, पायथ्याशी मी बऱ्याच वेळा यांची नृत्य बघितलेली आहेत.*
*पुढे यांच्या छोट्या दहीहंडीचे रूपांतर मोठ्या दहीहंडीत म्हणजे जास्तीजास्त चारपाच थरांत, अगदी क्वचितच सहा थरात होऊ लागले. याला कारण माझगाव, घोडपदेव, लालबाग-परळ-लोअर परळ-वरळी आदी गिरणगाव भागातील व्यायामशाळा, क्रीडापथक-कबड्डीपथके जसे हिंदमाता, लक्ष्मीमाता, क्युरीयस, यंग भारत वगैरे.*
*यात माझगावचे ताडवाडीतील हे फार मोठे आणि प्रसिद्ध पथक. यात या बाल्यां लोकांबरोबर इतर बहुजन समाजातील लोक जसे भंडारी, कोळी, कोकणी मराठा, माळी, न्हावी, धनगर, तसेच इतर समाजातील लोक वगैरे समाविष्ठ झाले आणि हा साहसी दहीहंडीचा खेळ बऱ्यापैकी जोर धरू लागला.*
*अशाप्रकारे समाजातील विविध थरातील, जातीतील लोक एकत्र येऊन हा सण साजरे करू लागले. हळूहळू यात इतर धर्मीय, इतर प्रांतिय लोकसुद्धा सामील होऊ लागले शंभर-दोनशे माणसांची/गोविंदांची लहान-थोर वयोगटातील हे पथके असायची.*
*त्याकाळी दादरच्या रानडे रोडवरील कोहीनुर सिनेमा-सुविधा-बेडेकर दुकानांसमोरील दहीहंडीचे फोटो तर दुसऱ्या दिवशी मुंबईच्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रात यायचे. त्या हंड्यांच्या त्या मानवी थरांचे आकर्षण बऱ्याच जणांना असायचे.*
*हिंदी चित्रपटांनी विशेषतः मनमोहन देसाई यांच्या 'ब्लफमास्टर' या चित्रपटातील 'शम्मीकपूर याच्यावर चित्रित झालेले 'गोविंदा आला रे आला' हे गाणे, तसेच 'खुद्दार' चित्रपटातील अमिताभ बच्चन याच्यावर चित्रित झालेले 'मच गया शोर सारे नगरी में' या गाण्यामुळे हा गोविंदोत्सव इव्हेंटफुल झाला.*
*माझ्या लहानपणी, मी राहत होतो त्या चाळीत साधारणत सकाळी नऊ वाजल्यापासून दही-हंडी उत्सवाला सुरुवात व्हायची... रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये दोन इमारतींच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यांपर्यंत या हंड्या बांधलेल्या असायच्या.*
*त्या जवळपास पाऊणशे ते शंभर मीटर लांबलचक दोरखंडाला बरोबरमध्ये छोट्या दोऱ्यांच्या शिंकाळ्यात छोटे लाल मातीचे मडके ठेवून त्यात जरासे दही, हळद, लाल रंग गुलाल, फुले पाणी घालून वर एक नारळ ठेवून ते व्यवस्थित घट्टकरून बांधायचे. मग दोन्ही बाजूला फुलांचे हार, काकड्या, त्या मोसमातील काही फळे आणि प्लॅस्टिकच्या आवरणात नोटा ठेवून ती हंडी इमारतींच्या दोन्ही बाजूने खेचत वर चढवली जायची.*
*रस्त्यावर खाली एका फळ्यावर गोविंदा पथकांसाठी हंडीची रक्कम किती आणि कोठल्या सोसायटीची/इमारतीची ती हंडी आहे यांची सूचना असायची. छोट्या हंड्या तीन, चार थरांच्या, तर मध्यम म्हणजे पाच थरांच्या हंड्या असायच्या. क्वचितच हंडी मोठी म्हणजे सहा/सात थरांची असायची. शक्यतो सात थरांची नसायची. पण असली तर नंतर ती हंडी दुपारपर्यंत खाली आणून फोडली जायची. जास्तीत जास्त बक्षीस रक्कम त्या काळी १ हजार रुपयांची असायची.*
*आमच्या इथल्या पथकांबरोबर जवळपासच्या भागातील व्यायामशाळा-क्रीडामंडळांची गोविंद पथके यायची. हा साधारणतः १९७० ते १९८०च्या दोन दशकांचा काळ होता.*
*मला आठवतंय ते आमच्या सोसायटीच्या इमारतीत आम्ही शाळेतील छोटी मुले आणि कॉलेजमधील मुले तीन चार थरांची दहीहंडी बांधायचो. मी एकदा तीन थरांची आणि एकदा चार थरांची दहीहंडी फोडली आहे. आम्ही मुले काय त्या व्यायामपथकातील लोकांप्रमाणे प्रॅक्टिस करत नव्हतो. अगदी सांगायचे तर काही सुशिक्षित लोक एखाद्या अशिक्षित लोकांप्रमाणे वागतात तसे आयत्यावेळी मुले/माणसे आणि थर जमवून हंडी फोडण्याचा प्रयोग करायचो.*
*मी तिसरीत असताना दोन थरांची हंडी फोडताना माझ्या उजव्या पायाच्या करंगळीचे नख सोलटावले गेले. त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यन्त मी सेप्टीकमुळे आजारी आणि तात्पुरता अपंग झाल्यामुळे घरी होतो. शाळा बुडाली, शैक्षणिक नुकसान झाले हा भाग वेगळा. तसेच परत नववीला असताना चौथ्या थरावरून खाली पडलो. पाठीवर पडलो. पण माझे नशीब कि सुदैव आश्चर्य म्हणजे मला काही लागले नाही, जखमी झालो नाही.*
*तेंव्हा हा दही-हंडीचा खेळ दुपारपर्यंत म्हणजे तीन-चार वाजेपर्यंत असायचा. अगदी उशीर म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत. त्या काळी आजच्या सारखे रात्रीच्या प्रकाशझोतात खेळ चालत नसत. स्थानिक पोलिसांना आजच्यासारखा त्रास नसायचा. दही-हंडीचे लोण मुंबई-ठाण्यापुरते मर्यादित असायचे. महाराष्ट्राच्या इतर शहरात हे लोण पसरले नव्हते. पुण्यात क्वचितच हंड्या असायच्या.*
*१९९० नंतर ठाण्यात शिवसेनेचे नेते 'धर्मवीर आनंद दिघे' यांच्या पुढाकारामुळे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारामुळे मोठ्या रकमांच्या हंड्या सुरु झाल्या. त्यांच्या आपापसात स्पर्धा सुरु झाली आणि त्याचे अनुकरण तिथल्या इतर छोट्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी सुरु केले. आणि त्यात पुढे ठाणे हे दहीहंडीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.*
*मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये याची दुसरी, पुनरावृत्ती राष्ट्रवादीचे सचिन अहिर, मनसे-भाजपचे राम कदम, पश्चिम उपनगरात अगदी काँग्रेसचे कृपाशंकर सिंग यांनीसुद्धा ओढली. आणि हि बक्षीस रक्क्म हजारावरून लाखात आणि लाखावरून कोटीत गेली.*
*दुपारपर्यंत संपणारा हा उत्सव आता संध्याकाळी काय तर रात्री साडेदहा-अकरापर्यंत डीजेच्या आवाजात, गोंगाटात, सिने तारे-तारकांच्या, टीव्ही-मालिका, नाटकातील कलाकारांच्या सानिध्यात, कलापथके, ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांद्वारे होऊ लागला. यात फार मोठे अर्थकारण आले. दूरदर्शन आणि इतर वृत्तवाहिन्या, तसेच स्थानीय केबलच्या साहाय्याने याचे प्रसारण होऊ लागले.*
*थरांची स्पर्धा सुरु झाली. हंड्यांचे सहा-सात थर तर मामुली गोष्ट ठरू लागली. कमीत कमी आठ थर-नऊ थर, ४० फूट, ५० फूट अशी जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. यात बरेच गोविंदा (मोठे ते लहान मुले) जखमी होऊ लागली, काही मेले, काही कायमस्वरूपी अपंग झाले. पण कोणालाही काही याचे दुःख नाही किंवा काळजी नाही.*
*पण हा निश्चित जीवघेणा किंवा जखमी होऊन अपंग होणारा साहसी खेळ होऊ लागला. आपण प्रेक्षक म्हणून आनंदाने टाळ्या पिटतो. पण त्यांचे म्हणजे त्या जखमी गोविंदांचे पुढे काय होते कुणास ठाऊक?*
*हे अगदी प्राचीन काळातील त्या रोममधील जीवघेण्या ग्लॅडिएटर्स सारखे होऊ लागले. ते तर फार क्रूर होते. हा गोविंदा दही-हंडी खेळ तेवढा नाही, पण त्याकडे काही प्रमाणात झुकू लागलाय हे खरे आहे.*
*मधल्या काळात या सणाचे आयोजन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पेन मधल्या 'कॅसलर्स' बरोबर करण्यात आले. स्पेन मधील साधरणतः ते ४० फुटांचे हे 'कॅसलर्स' मानवी मनोरे भारतात, ठाण्यात सादर करण्यात आले होते. त्या स्पॅनिश लोकांनीही आपल्या गोविंदा पथकांचे कौतुक केले होते. साधारणतः तीन-चार वर्षांपूर्वी हा गोविंदा दही-हंडी सण राज्य सरकारने साहसी खेळ म्हणून घोषित केला. पण इतर खेळांसारखे याचे नियम काय? याची घटना काय? येथील भाग घेणाऱ्या खेळाडूंचे म्हणजे गोविंदाच्या आरोग्याचे काय? अपघातात जखमी झाल्यास काय? विम्याचे काय याची तरतूद किती? याविषयी निश्चित नियमावली काय? याविषयी सरकार, आयोजक, मंडळे, समन्वय समिती कोणीही निश्चितपणे मांडायला, बोलायला तयार नाही. कारण क्रीडाविश्वात कोणताही खेळ म्हटंला कि त्यास नियम हे लागू होतातच.*
*प्रत्येक खेळाची एक मूलभूत गोष्ट असते, आत्मा असतो. त्यावर आधारित क्रिया, प्रक्रिया यावर नियम व गुणसंख्या असते. जसे बहुसंख्य पाश्चात्य, युरोपिअन खेळांचा आत्मा हा 'चेंडू' आहे, जसे फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बेसबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस इत्यादी खेळात चेंडू हा महत्वाचा, तर बहुसंख्य भारतीय खेळांचा आत्मा हा स्पर्श असतो. जसे कबड्डी, खोखो, कुस्ती वगैरे....*
*तसे या गोविंदात्सोवाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे थोडक्यात थर रचून प्रत्यक्ष ती हंडी फोडणे आणि तो थरार अनुभवणे. हाच तो गोविंदा उत्सवाचा आत्मा.*
*पण आजकाल दहीहंडी गोविंदात्सोवात प्रत्यक्ष दहीहंडी फोडली जात नाही. कारण एकदा ती फोडली कि परत बांधणार कोण? फक्त आयोजकांना आणि त्या प्रमुख पाहुण्यांना, राजकीय नेत्यांना उंचच उंच थर रचून सलामी दिली जाते. माझे तर मत आहे तर त्या खालच्या, उत्सवाच्या नावाखाली प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा अपमान आहे. हे प्रश्न, ह्या भावना त्या आयोजकांच्या लक्षात येत नाहीत कि हिंदू धर्म प्रेमींच्या लक्षात येत नाही.*
*तसेच कोठेही हमरस्त्यावर रस्ता जागा अडवून आणि ऐन पावसाळ्यात खड्डे खणून कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्याची, प्रेक्षकांना हजारो लोकांना बघण्याची व्यवस्था करणे आणि या सर्व गोष्टींमुळे अक्खा दिवसभर शहरातील वाहतूकव्यवस्थेचे नियोजन करणे हि मोठी डोकेदुखी महानगरपालिका, पोलीस, वाहतूक व्यवस्थापन आणि सरकारसाठी झाली आहे.*
*त्याऐवजी शहरातील विविध विभागातील मोकळ्या मैदानात, पटांगणात व्यवस्थित आखीव रेखीव आयोजन केले तर बऱ्याच यंत्रणांचा आणि नागरिकांचा त्रास कमी होईल, भार कमी होईल आणि सर्वसामान्य लोकांना आनंदाने या उत्सवात सामील होता येईल.*
*जर याला कोणी विरोध केला कि तो माणूस उत्सव विरोधी, हिंदुविरोधी असे घोषित केले जाते. पण उद्या जर एखादी काही आपत्ती आली, दुर्घटना घडली तर या हंडीचे आयोजक त्याची सर्व जबाबदारी घेतील का? तसेच याकरिता राज्यसरकार, पोलीस, महानगरपालिकेने आणि अर्थात न्यायालयाने घातलेल्या निर्बंध, सूचना यांचे काटेकोरपणे पालन करतील का हा खरा प्रश्न आहे.*
*येथे अजून एक म्हणजे हा गोविंदा दहीहंडी उत्सव संस्कृती, परंपरा, भगवान श्रीकृष्णाची आठवण म्हणून साजरा करतात. भगवान श्रीकृष्ण त्याकाळी पाच हजार वर्षांपूर्वी गोकुळात वर शिंकाळ्यात मटक्यात ठेवलेले दही इतर आपल्या बालगोपाळ मित्रांच्या साहाय्याने थर लावून खायचे, ते मडक्यातील दही त्या गरीब गुराखी मित्रांना वाटून द्यायचे. गोकुळातील दूध, दही हे गोकुळात राहिले पाहिजे, ते मथुरेला फुकट जाता कामा नये हा त्यांचा त्या काळातील त्यांच्या वयाच्या मानाने क्रांतिकारक, समाजवादी विचार होता. आणि ते मटका आणि दही त्याकाळी काही ४० ते ५० फूट उंचीवर ठेवलेले नसायचे तर मांजर किंवा इतर पाळीव प्राणी किंवा माणसाने चोरून खाऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाच दहा फूट उंचीवर ठेवलेले असायचे. मग या आधुनिक युगातील आयोजकांना प्रश्न असा विचारावासा वाटतो कि, ती जर परंपरा आहे तर मग ही चाळीस-पन्नास फुटावर हंडी बांधण्याची कुठली जीवघेणी उत्सव परंपरा कोणी सुरु केली?
Comments
Post a Comment