इमोशनल मॅनेजमेन्ट

मूल जेव्हा टीका झेलत वाढतं; ते प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या वृत्तीचं होतं.  
मूल जेव्हा सतत विरोध सोसत वाढतं; तेव्हा ते भांडखोर बनतं.  
मूल जेव्हा उपहासाचा विषय बनतं; तेव्हा ते भीत्र आणि बुजरं बनतं.  
मुलाला जेव्हा स्वतःबद्द­ल लाज वाटायला लागते तेव्हा त्याच्या मनात अपराधीपणाची भावना घर करुन बसते.  
मूल जेव्हा सहनशिल बनतं; तेव्हा त्याच्या अंगी चिकाटी निर्माण होते.  
मूल जेव्हा प्रमाणिकपणे वागायला शिकतं; तेव्हा ते इतरांशीही न्याय बुद्धीने वागतं. 
मूल जेव्हा सुरक्षित वातावरणात वाढतं; ते इतरांवर विश्वास टाकयलाही शिकतं.  
मूल जेव्हा त्याच्या लहान सहान गोष्टींसाठी इतरांच्या कौतुकास पात्र ठरतं; तेव्हा ते स्वतःवर प्रेम करायला लागतं.  
मूल जेव्हा आनंदानं स्वीकारलं जातं, मैत्रीनं वाढवलं जातं तेव्हा प्रत्येक लहान सहान गोष्टीतला आनंद शोधायला आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीतून प्रेम शोधायलाही ते शिकतं.  

डोरोथी लाॅ नोल्टे (लहान मुलांना कसं वाढवावं या संदर्भातील ही कविता जगप्रसिद्ध आहे  इंग्रजीमधल्या या कवितेचा स्वैर अनुवाद) नोल्टे यांनी ही कविता पालकांसाठी आणि लहान मूल कसं वाढवायचं या संदर्भात जरी लिहिली असली तरीही; ही कविता जरा नीट वाचली तरी त्यात आपल्याला अंसख्य सॉफ्टस्किल्सबद्द­ल तपशिलानं लिहिलेलं लक्षात येईल.   
आपल्यापैकी कुणाच्याच हातात आपलं बालपण असत नाही. आपल्याला कसं वाढवलं जातं, लहान असताना कसले आणि कुठले गंड आपल्या मनात विकसित होतात हे त्यावेळी आपल्या हातात मुळीचच नसतं. पण लहान वयात निर्माण झालेले गंड किंवा चुकीच्या समजूतीच पुढे मोठं झाल्यानंतर आपल्या सॉफ्टस्किल्सच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेतले सगळ्यात मोठे अडथळे असतात.   

आपल्यापैकी अनेकांना टीका ऐकून घ्यायला आवडत नाही,  कुणी आपल्याला काही सल्ले देत असेल तर ते ऐकून घेण्याचा पेशन्स आपल्याकडे नसतो, लहान सहान गोष्टीत कळत किंवा नकळतपणे खोटं बोलण्याची सवय आपल्याला असते  किंवा आपल्यापैकी कितीतरी जणं भयंकर शंकखोर असतात.  चटकन कुणावर विश्वास टाकायला तयार नसतात. समोरचा माणूस हा फक्त आणि फक्त आपल्याला फसवायलाच बसलेला आहे अशी धारणा करुनच वागतात तर, काही जणांना त्यांच्या आयुष्यात येणारा आनंदही नीटसा उपभोगता येत नाही.   

असं सगळं का होतं?

आपण आपल्या आयुष्यातल्या कटू-गोड आठवणींचं गाठोडं घेऊन सतत फिरत असतो. आपल्याला येणाऱ्या कडवट अनुभवांचा आपल्यावर जरा जास्तच परीणाम होत असतो. त्या अनुभवांतून चटकन बाहेर येण्याचीही आपल्यापैकी अनेकांची वृत्ती नसते. एखादा कटू प्रसंग आयुष्यात आला, तर त्यातून शिकून पुढे जाण्याचं सोडून आपण त्या आठवणींच्याच जंजाळात अडकतो. 

यातून होतं काय, तर कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या 'टेम्प्रामेन्ट'मध्ये आपण मार खातो. कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची मनाची तयार करण्याऐवजी असं घडलंच कसं? का? ती व्यक्तीच तशी आहे, नोकरीच चांगली नाहीये, सगळंच वाईट आहे, माझ्यावर नेहमीच अन्याय होतो अशा अनावश्यक विषयांमध्ये आपण स्वतःला गुरफटून टाकतो. 

आपल्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अनुभवांच्या आधारेच आपल्यातली कौशल्य कशी असणार आहेत, कोणत्या बाबातीत आपण सक्षम असणार आहोत आणि कुठे कमकुवत हे ठरत असतं. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचा कसा आणि काय परीणाम स्वतःवर होऊ द्यायचा हेही आपण स्वतःचं ठरवणं अवश्यक आहे.  

'इमोशनल मॅनेजमेन्ट' ही टाइम मॅनेजमेंट इतकीच महत्वाची असते. 

- मुक्ता चैतन्य 

फोटो गुगल साभार

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार