दुर्दैवी अश्या २ घटना

*आजच्या अत्यंत दुर्दैवी घटना आणि शिकवण*

मित्रहो, आज अतिशय दुर्दैवी अश्या २ घटना घडल्या आणि आपल्याला खूप काही शिकवून गेल्या. 

आज पहाटे ५.०५ मिनिटांनी महाराष्ट्रातील तडफदार नेते विनायक मेटे यांचे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात निधन झाले. मेटे हे काल रात्री १.३० वाजता बिडवरून मुंबईला स्वतःच्या फोर्ड इंडेव्हर या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या गाडीने निघाले होते असे समजते. या प्रवासात पहाटे त्यांच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुढील वाहनाला डाव्या  बाजूने धडक बसली असे गाडीचे फोटो पाहिल्यावर कळते. 

दुसरी घटना म्हणजे भारतातील शेअर मार्केटमधील नामवंत असे अतिशय श्रीमंत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार व्यवसायाने सी. ए. असलेल्या झुनझुनवाला यांनी १९८५ साली अवघ्या रु.५०००/- इतक्या छोट्या रकमेने शेअर मार्केट मधील आपली गुंतवणूक सुरू केली आणि आज ते काही हजारो कोटींचे मालक होते. त्यांचे फोटो पाहिल्यावर त्यांचे वजन जास्त असावे असे दिसते आणि त्यामुळे त्यांना इतरही शारीरिक व्याधी असाव्यात यात शंका नाही. इतके पैसे मिळवताना झुनझुनवाला यांनी शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केले असावे असेही लक्षात येते.

आपण मिळवलेल्या पैशाचा उपभोग स्वतःला घेण्याइतपत आपण आपले शरीरस्वास्थ्य जपले पाहिजे आणि त्याकरिता नियमित व्यायाम करण्यासाठी आपण स्वतःला स्वतःसाठी योग्य तेवढा वेळ आणि महत्व दिले गेले पाहिजे हे यातून पुन्हा प्रकर्षाने जाणवते. सध्याच्या भौतिक युगामध्ये आर्थिक उन्नतीसाठी शारीरिक अधोगती होतेय हे नक्की. पैसे किती कमवायचे, कमवताना कुठे आणि कधी थांबायचे हे आपल्याला कळले पाहिजे. आपल्या आयुष्यात आर्थिक, शारीरिक, सामाजिक , बौद्धिक, वैचारिक, धार्मिक अश्या सर्व आघाड्यांवरआपल्याला समतोल साधता यायला हवा.

दुसरे म्हणजे रात्रीचा प्रवास आग्रहपूर्वक टाळला पाहिजे आणि प्रामुख्याने ड्रायव्हर घेऊन जाताना, कारण ड्रायव्हरने दिवसा आवश्यक तेवढी विश्रांती, झोप घेतली होती की नाही याची आपल्याला कल्पना नसते. आपण स्वतः गाडी चालवणार असेल तर आपल्याला कळते की आपल्याला आवश्यक विश्रांती अगोदर मिळाली आहे का आणि आपण सुखरूप गाडी चालवू शकतो का? तरीही रात्रीचा प्रवास म्हणजे रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत प्रवास टाळला पाहिजे. आपल्यावर असंख्य जबाबदारी असतात ज्यात मुलांचे शिक्षण, लग्न, वृद्ध आई वडिलांची देखभाल, आपण उद्योजक असेल तर आपले कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अश्या सर्वांची जबादारी असते.   

वरील घटनांवरून आपणा सर्वांना आग्रहाची विनंती की आपल्या शरीर स्वास्थ्याकडे योग्य लक्ष द्या आणि रात्रीचा प्रवास टाळा.

आपण माझी पोस्ट पुढे आपल्या मित्र परिवाराला, ग्रुपना पाठवल्यास इतरानांही याचा फायदा होऊ शकतो.

धन्यवाद 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार