ते सध्या काय करतात?

ते सध्या काय करतात???

मागच्या रविवारी आमचा शाळकरी ग्रुप एकत्र आला.
१९७१ सालचे मॅट्रिकचे विद्यार्थी.. 
एका मित्राने पुढाकार घेऊन सर्वांशी संपर्क केला आणि दोन दिवसांचे गेट टुगेदर अरेंज केले....
 
४८ वर्षांच्या प्रदीर्घ गॅपनंतर सर्वांची भेट होणं, एक वेगळाच अनुभव होता. 

तेव्हाचे राजेश खन्ना, अमिताभ, विनोद खन्ना आता सरसकट ए.के.हंगल; तर हेमा,जया,रेखा,श्रीदेव्या, सरसकट लीला मिश्रा झाल्या होत्या.....
 
विशेष म्हणजे प्रत्येकाची स्वतःची एक खासियत होती.
त्यातलाच एक मित्र. 
त्याला एकच छंद होता. 
"रिकाम्या लोकांना मनोरंजनाचे साधन पुरवायचे...."
 
"रिकामे लोक.." ही परंपरा आजचीच नसून थेट पुरातन काळापासून चालत आलेली आहे.....

शाळेत येतांना ह्याची एकच सवय होती. 
एखाद्या चौकात उभा राहायचा. आम्हां मित्रांना त्याच्याजवळ बोलवायचा आणि आकाशाकडे बोट करून काहीतरी दाखवायचा. 
आम्ही नकळत आकाशाकडे बघायचो. तो आम्हाला हळूच कानात सांगायचा, 
"फक्त पाच दहा मिनिटे मी दाखवतो तिकडे बघत रहा आणि हळूच दप्तर घेऊन सटका.."

आम्ही तसंच करायचो. पाचेक मिनिटांत आमच्या भोवती पन्नासेक लोक गोळा होऊन आकाशात बघायला लागायचे. ह्याचं अवतारकार्य समाप्त. 

मग आम्ही मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर चौकात बघायचो. लोक बदललेले असायचे पण गर्दी कायम. 

जो यायचा तो आकाशात बघितल्याशिवाय पुढच्या कामाला लागत नव्हता....
 
मित्रांच्या गप्पांमध्ये हा विषय निघाला तेव्हा मी त्याला विचारलं, 
"हल्ली काय करतोस तू..??"
रिटायर झाल्यावरची दिनचर्या कशी काय सुरु आहे??

"एकदम झकास सुरु आहे. तोच शाळेतला उद्योग पण आता डिजिटल.." त्याने हसत सांगितले....

म्हणजे नक्की काय करतोस तू??" मी विचारलेच..

तो सांगायला लागला..
"सकाळी पाच वाजता उठतो.. 
अंथरुणातच कराग्रे वसते लक्ष्मी."म्हणतो..
नंतर "समुद्र वसने देवी... पादस्पर्शम्  क्षमस्व हे.." 
म्हणून जमिनीवर उतरतो....

मला त्याचे संस्कार बघून मनातल्या मनांत माझ्या निःश्लोक आयुष्याची लाज वाटायला लागली...

बरं, मग नंतर??? मी उत्सुकतेने विचारले....

"मग काय?? चार्जिंग चा मोबाईल काढतो, 
फेसबुक उघडतो आणि मनांत येतील त्या दोन चार ओळी लिहून पोस्ट करतो.."

"मला नातू झाला, त्याचे 'ब' या अक्षराचे नाव सुचवा.."

"कालपासून दाताला ठणक आहे पण कीड अजिबात नाही.."

"घरी कारल्याचा वेल आहे, पण त्याला गोड कारली लागतात.."

"ह्यावर्षी हरितालिकेचा उपवास माझ्या बायकोने करणे माझ्या दृष्टीने लाभदायक की हानिकारक राहील??"

इतकं पोस्ट करून मी माझ्या पूजेअर्चेत बिझी होऊन जातो. मग भाजीबाजार, नातवांना शाळेत पोहचवणे, येतांना दूध आणणे, अशी सकाळची कामं आटोपली, की एकदा फेसबुक उघडून बघतो....

एव्हाना शंभरेक तज्ञ मंडळींचे सल्ले पौराणिक दाखल्यांसह कॉमेंट्समध्ये आलेले असतात...

"बिभीषण नाव ठेवल्यास नातू तुमच्या अगेन्स्ट जाईल .."

"दात पूर्ण किडु द्या. नंतरच डॉक्टरकडे जाऊन एकदाचा उपटून टाका.."

"कारले शिजवतांना त्यात २० एम.एल. जीवनमिक्स्चर टाका.."

"तुम्हाला बायकोचा जाच असेल तर तिला अजिबात हरितालिकेचा उपवास करू देऊ नका."
इत्यादि इत्यादी...

नंतर बारा वाजता जेवून मी तीन तास छान छोटीशी वामकुक्षी घेतो....

मधल्या काळांत हे सल्ले न पटलेली मंडळी सल्लागारांवर अक्षरशः तुटून पडलेले असतात....

तीन तास एकमेकांशी विकोपाचे वाद घालत ही मंडळी आपला वेळ सत्कारणी लावतात....

रात्री मग सिनियर मंडळी ह्या वादात समेट घडवून आणण्याचे विफल प्रयत्न करतात....
कुणीतरी त्यांना...
"तुमचा जमाना गेला काका, झोप बघू शांत.." असं सांगतो

एकंदरीत काय, घरबसल्या बऱ्यापैकी टाईमपास होतो.

कुणीतरी सांगूनच गेले आहे की,
"करेल रंजन जो लोकांचे!!  जडेल नाते प्रभुशी तयाचे!!"

लेखक : अज्ञात

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार