चढता सूरज धीरे धीरे..
*चढता सूरज धीरे धीरे...*
साधारणतः १९७० च्या दशकात लिहिली गेलेली आणि गायली गेलेली ती एक सुफी कव्वाली आहे. पण आज सुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात !
शायर *कैसर रत्नागिरवी* यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल *अझीझ नाझा* यांची गायकी यांचा सुरेल संगम या कव्वाली मध्ये दिसून येतो.
तसे पाहिले तर कव्वाली हा सुफी गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही *भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे*.
या कव्वालीत आपल्या जीवनाचे सार सांगितले गेले आहे. म्हणजे माणूस आपल्या काहीश्या यशाने खूप अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखायला लागतो पण तरीही ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत हा ठरलेलाच.
पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेवून येत नाही तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाचं भावार्थ या कव्वालीत आहे.
सुरुवातीलाच जो शेर आला आहे त्यातच खरं तर सगळा अर्थ शायरने सांगून टाकला आहे.
*हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !*
*जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !*
*आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,*
*चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥*
कितीही मोठे नांव असले, कितीही कीर्ती मिळवली आणि कितीही सत्ता, पैसा, ताकद मिळवली तरीही शेवटी एक दिवस त्यातील काहीच राहत नाही आणि नंतर तर लोकं त्याचे नांवही लक्षात ठेवत नाहीत हेच पहिल्या ओळीत शायरने सुचवले आहे. आता पर्यंत अनेक राजे, महाराजे या पृथ्वीतलावर होऊन गेले पण त्यांच्या मृत्युनंतर आज जर कुणाला त्यांच्याबद्दल विचारले तर कित्येकांना त्यांचे कर्तुत्वचं काय पण नांवही माहित नाही. आणि म्हणून शायर आधीच आपल्याला सावध करत आहे की बाबारे... जरी आज तू तरुण आहेस, बलवान आहेस, धनवान आहेस तरी त्याचा गर्व करू नकोस... नाहीतर तुला पश्चताप करावा लागेल यात संशय नाही. दुनियेची ही रीतच आहे की दिवसा उगावणारा सूर्य देखील संध्याकाळी मावळतोचं.
*तू यहां मुसाफ़िर है, ये सरा-ए-फ़ानी है,*
*चार रोज़ की मेहमां तेरी जिंदगानी है,*
*ज़र, जमीं, ज़ेवर कुछ न साथ जायेगा ,*
*खाली हाथ आया हैं, खाली हाथ जायेगा ।*
*जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने ,*
*अपनी उम्र-ए-फ़ानी पर तन रहा है दीवाने ।*
*इस कदर तू खोया है, इस जहां के मेले में,*
*तू खुदा को भूला है, फ़ंस के इस झमेले में ।*
अरे तू इथे फक्त एक यात्रेकरू आहेस. हा मृत्युलोक आहे आणि इथे माणसाचे जीवन हे फक्त काही दिवसांचेचं असते. इथे तुला कितीही लोकं मिळू दे, जमीन मिळू दे, धनदौलत मिळू दे... यातील काहीच शेवटी तुझ्याबरोबर येणार नाही. तू जसा येताना रिकाम्या हाताने आलास तसाच रिकाम्या हाताने जाणार आहेस. हे सगळे तुला माहित नाही असे नाही, पण तरीही हे सगळे तू मान्य करायला तयार होत नाहीयेस. आणि आजची भोवतालची परिस्थिती पाहून वृथा अभिमान करतो आहेस. बरे या सगळ्यात तू इतका गुरफटून गेला आहेस की तुला या सगळ्यांपुढे ईश्वराच्या अस्तित्वाचेही (शाश्वत सत्य) स्मरण राहिले नाही.
*आज तक तो देखा है, पाने वाला खोता है,*
*ज़िंदगी को जो समझा ज़िंदगी पे रोता है,*
*मिटने वाली दुनिया का ऐतबार करता है*,
*क्या समझ के तू आखिर इस से प्यार करता है ?*
*अपनी-अपनी फ़िक्रों में जो भी है, वोह उलझा है,*
*ज़िंदगी हकीकत में क्या है, कौन समझा है ?*
*आज समझलें, कल यह मौका, हाथ न तेरे आयेगा,*
*ओह गफ़लत की नींद में सोने वाले, धोखा खायेगा ।*
आज पर्यत पहात आलो आहे की जो एखादी गोष्ट मिळवतो त्याला एक दिवस ती गमवावी लागतेच. ज्याला ही गोष्ट समजली त्याला जीवनाचे काहीच मोल राहत नाही; आणि मग तो परत या जीवन मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी प्रयत्नशील होतो. अरे एक दिवस तर या पृथ्वीचेही अस्तित्व संपणार आहे मग असा कोणता विचार करून तू या मोहात अडकतो आहेस? जो तो आपापल्या भविष्याच्या चिंतेत अडकलेला आहे, त्यामुळे हे जीवन काय आहे हे तरी कुणाला कुठे नीटसे उमगले आहे? त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आजूनही यांवर विचार कर. कारण हे संधी हुकली तर परत तू तुझ्या नेहमीच्या चिंतांमध्ये अडकल्यावर परत संधी मिळेलच याची शाश्वती नाही. अजूनही बेसावधपणे झोपून वेळ दवडू नकोस. नाहीतर तुला सावरण्याचाही वेळ मिळणार नाही...
*मौत ने जमाने को क्या समां दिखा डाला,*
*कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला ।*
*याद रख उस सिकंदर के हौसले तो आली थे,*
*जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली थे ।*
*अब ना वोह हलाकू है, और ना उसके साथी है*,
*जंग-जु ना पौरस और ना उसके हाथी है ।*
*कल जो तनके चलते थे, अपनी शानों शौकत पर,*
*शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर ।*
मृत्यू ने आता पर्यंत अनेक लोकांचा अंत केला आहे. ज्यावेळेस सिकंदर पृथ्वी जिंकण्यास आला त्यावेळेस त्याच्यात हिम्मत, झुंजारुपणा याची काहीच कमी नव्हती, पण ज्यावेळेस त्याचा अंत झाला त्यावेळेस मात्र त्याने जिंकलेल्या गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट त्याला बरोबर नेता आली नाही. आता तो दुष्ट आणि सगळ्यांचा कर्दनकाळ ठरणारा हलाकू आणि त्याचे साथीदार राहिले नाहीत की शूर लढवय्या पौरस ही राहिला नाही. त्यांची धनदौलतही राहिली नाही. पूर्वी हे जे राजे महाराजे अगदी आढ्यतेने चालायचे आज त्यांच्या कबरीवर साधा दिवाही तेवत नाही.
*अदना हो या आला हो , सबको लौट जाना है,*
*मुफ़्लिस-ओ-तवंगर का कब्र ही ठिकाना है ।*
*जैसी करनी-वैसी भरनी, आज किया कल पायेगा,*
*सर उठा कर चलने वाले, एक दिन ठोकर खायेगा ।*
लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच एक दिवस जायचे आहे, सगळ्यांचे शेवटचे ठिकाण हे पंचतत्वात विलीनीकरण हेच तर आहे. तुम्ही जसे कराल, जे पेराल तेच नंतर उगवणार आहे. फक्त तोंड वर करून चालत राहिलात तर ठेच ही लागणारच... त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही हेच शायर जीव तोडून सांगतो आहे.
*मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है,*
*तू फ़नाह नहीं होगा, ये खयाल झूठा है ।*
*सांस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे,*
*बाप, मां, बहेन, बिवी, बच्चे छूट जायेंगे ।*
*तेरे जितने भाई है, वक्त का चलन देंगे,*
*छीन कर तेरी दौलत, दो ही गज कफ़न देंगे ।*
*जिन को अपना कहता है, कब यह तेरे साथी है ?*
*कब्र है तेरी मंजिल और यह बाराती है ।*
मृत्यू हा तर सगळ्यांनाच येणार आहे. त्यापासून आज पर्यंत कुणीच सुटलेले नाहीत. जर तुला असे वाटत असेल की तू त्यापासून वाचू शकतोस तर हे पूर्णपणे चूक आहे. एकदा का जीव शरीरातून निघून गेला की मग त्या शरीराचे कोणतेच नाते राहत नाहीत. आईवडील असो वा भावंड किंवा बायको मुलं सगळेच दूर होतात. ज्यांना तुम्ही भाऊ म्हणतात तेही इतरांसारखेच बनतात आणि जी काही धनदौलत तुम्ही कमावली आहे ती तर घेऊन टाकतातच, पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त काही मीटरचे कफन देतात. ज्यांना तू स्वतःचे मित्र, परिवार म्हणतो आहेस हे फक्त तेवढ्या पुरतेच आहेत. बाकी ज्या वेळेस तुझा मृत्यू होईल त्यावेळेस फक्त तुला जायचे आहे आणि हे सगळे लोकं फक्त काही पावले बरोबर असतील आणि नंतर आपापल्या मार्गाने निघूनही जातील.
*लाके कब्र में तुझको मुर्दा-पाक डालेंगे,*
*अपनेही हाथों से तेरे मुंह में खाक डालेंगे ।*
*तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे* ,
*तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे ।*
*इसलिए ये कहता हूं, खूब सोचलें दिलमें,*
*क्यूं फ़सायें बैठा है, अपनी जान मुश्किल में ?*
*कर गुनाहों से तौबा, आगे वक्त संभल जाए*
*दम का क्या भरोसा है, जाने कब निकल जाए ।*
*मुठ्ठी बांध के आने वाले... हाथ पसारे जाएगा ।*
*धन-दौलत-जागीर से तुने क्या पाया है, क्या पायेगा ?*
जे तुझे पार्थिव असेल ते कबरीत टाकून त्यावरच स्वतःच्या हाताने माती टाकणारे हे लोकं नंतर काही दिवसातच तुला पूर्णतः विसरून जातील. आणि यांनाच तू आपले सगेसोयरे म्हणतो आहेस? म्हणून परत एकदा सांगतो... विचार कर... नीट विचार कर... आज जर तू तुझं वर्तन सुधारलं तर उदया तू जेंव्हा पाप पुण्याच्या दरबारात उभा राहशील त्यावेळेस तुला त्रास होणार नाही. त्यासाठी आजपासूनच त्याची सुरुवात कर... काय माहित उदया कसा येईल? शेवटी तुला मोकळ्या हातानेच जायचे आहे. पैशाने या गोष्टी विकत घेता येत नाहीत. त्यासाठी सद्वर्तनचं महत्वाचे आणि गरजेचे असते.
खरं तर या कव्वाली मध्ये प्रत्येकाच्या जीवनाचे सारचं दिलेले आहे. जर तुम्ही मरताना काहीच नेऊ शकणार नसाल, तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? पण नेमका माणूस हेच विसरून जातो. पैशाच्या आणि संपत्तीच्या मोहात अनेक अविधायक गोष्टी करतो आणि स्वतःचा शेवट वाईट करून घेतो. असे म्हणतात की माणूस मेल्यावर त्याच्या कर्तुत्वाने जिवंत राहतो पण त्यासाठी त्याने चांगले वर्तन केले पाहिजे. हाच सुंदर संदेश ही कव्वाली आपल्याला देते. जर याप्रमाणे प्रत्येकाने आपले वर्तन सुधारले तर ही पृथ्वी मृत्युलोक न राहता स्वर्ग बनेल.
Comments
Post a Comment