स्पर्धा
🏃🏻♂️ *स्पर्धा ... एक चिंतन*🏃🏻♂️
✍🏻 आज सकाळी फिरायला गेलो. तेव्हा माझ्यापासून ५० मिटर पुढे एक व्यक्ति चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार. निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी. मी थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन, असा मनाशीच विचार केला आणि मग काय तर मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. खरतर रोजच्या प्रमाणे मला अजून एक मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते. तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती. थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर बरेच कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझी गती पाहून माझा मलाच अभिमान वाटू लागला होता. आणि तो क्षण आला. मी त्याला पार केले.. मागे टाकले.. हुर्र्ये.. हुर्र्ये.. हुर्र्ये.. मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा !!!
🌾 *स्पर्धा ? पण याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, म्हणजे तो तर या स्पर्धेचा भाग ही नव्हता. आणि मी मात्र जिंकण्याच्या ओढीने माझा नेहमीचा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. त्यामुळे आता उशीर होणार होता. वेळापत्रक चुकणार होते. अचानक माझी चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. कारण उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता.*
असेच होते ना आपल्या आयुष्यात सुद्धा..?
☝🏻 *सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते.. सहकारी..? शेजारी..? मित्र..? नातेवाईक..? यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आपले सगळे आयुष्य जाते. मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.*
🙏🏻या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे.. “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे. ही नशा आहे, झिंग आहे." हे ध्यानात येत नाही. कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते आणि आपण आपले सुख गमावून बसतो.
☝🏻कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की. कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच. कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार. कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच. कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त आजार असणारच. कोणाजवळ तरी, काही तरी वेगळे असणारच म्हणजेच...
✍🏻 *प्रत्येकाची चालण्याची आपापली एक वेगळी चाल आहे. कोणाच्या चालण्याची गती कमी आहे. तर कोणाची जास्त आहे. कोणाच्या चालण्यात सुंदरता आहे. लयबद्धत्ता आहे. तर कोणाच्या चालण्यात मंदपणा आहे. कारण कोणाचे शरीर सुदृढ आहे. तर कोणाचे कमकुवत. कोणी स्थूल आहे तर कोणी सडपातळ. कोणी आनंदी आहे तर कोणी चिंताग्रस्त.*
☝🏻 *तेव्हा... लक्ष आपल्या स्वतःवर, आपल्या ध्येयावर केन्द्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे ? एवढेच पाहावे. गती कमी असेल तर नक्कीच वाढवावी. पण स्पर्धा न करता. आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक कुवतेप्रमाणेच वयाचा विसर पडू देऊ नये. कारण वयानुसार शरीरालाही मर्यादा आहेत..*
🙏🏻 वयाच्या एका ठराविक टप्प्यावर आल्यावर मात्र थोडं थांबून आत्मचिंतन करावं.. आणि आज जे आपल्याजवळ आहे ते कसे उपभोगता येईल एवढेच पाहावे...आणि सदैव आनंदी रहावे, नाही कां ?
Comments
Post a Comment