निगुती
*निगुती*
- मृणालिनी जोशी
एकदा माझी एक मैत्रीण म्हणाली, 'काय फरक पडतो, लसणीचे मोठे मोठे तुकडे पदार्थात घातले तर...? शेवटी पोटातच तर जाणार आहेत...' तेव्हा तिला मी म्हणाले होते की, 'पदार्थात लसूण कोणत्या पद्धतीने वापरणार आहोत, त्यावर त्या पदार्थाची चव बदलते..' खरं आहे की नाही ? काही पदार्थात लसूण ठेचून घालावा लागतो, तर काहीत त्याचे तुकडे करुन. काही पदार्थात लसूण बारीक चिरुन, तर काहीत लसणीची पेस्ट वापरावी लागते
तीच गोष्ट कांद्याची ! कांदा हा किसून, मिक्सरमध्ये बारीक करुन, बारीक चिरून, उभे काप करुन किंवा मोठ्या फोडी करुन जसा आपण पदार्थात वापरु तशी पदार्थाची चव बदलते.
स्वयंपाक करणे किंवा एखादा पदार्थ अगदी मनापासून करणे आणि इतरांना तो खाऊ घालणे, यातला आनंद तो अनुभव घेतल्यानंतरच समजतो. मुली तर लहानपणी भातुकली खेळण्याच्या निमित्ताने असा एखादा पदार्थ... खोटा खोटा का होईना, करुन घरातील इतर सदस्यांना खाऊ घालत असतात. तेव्हा त्यांना याची मजा वाटते, पण मोठे झाल्यावर, खऱ्या संसाराला सुरुवात झाल्यावर समजते की स्वयंपाक करणे हे वाटते तितके सोपे नाही... हे अत्यंत 'निगुतीने' करण्याचे काम आहे.
निगुती म्हणजे नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, नेमकेपणा, काटकसरीपणा, स्वच्छता... असे अनेक गुण सामावलेला एक मोठा गुण !
फोडणी करतांना गरम तेलातील मोहरी तडतडली की एक-दोन क्षणांनी इतर पदार्थ कढईत टाकावे लागतात. म्हणजे तो मोहरीचा खमंगपणा पदार्थात उतरतो. पदार्थ खातांना मोहरीचा दाणा दाताखाली आली की तो खमंगपणा जिभेवर जाणवतो.
दुधाच्या बाबतीत तर फार निगुतीने काम करावे लागते. दूध तापवणे, दूध गार झाले की त्याची साय काढून ठेवणे, तिला विरजण लावणे, नंतर त्याचे ताक करणे, लोणी काढणे, लोणी कढवून त्याचे तूप करणे, जमलं तर निघालेल्या बेरीचाही एखादा पदार्थ करणे... दूध नासले, तर त्याचे पनीर करणे किंवा कलाकंद करणे, गूळ घालून 'नासकोणी' करणे, हे सुद्धा वेळेत करावे लागते. नाहीतर ते नासलेलं दूध कडू होत जातं.
कणिक भिजवण्याच्या सुद्धा किती तऱ्हा ! साध्या पोळीसाठी मऊ मळून भिजवणे, पुऱ्यांसाठी थोडी घट्ट भिजवणे, गूळ पोळीसाठी जास्त घट्ट भिजवणे, पुरणपोळीसाठी तेल-पाणी लावून एकदम मऊ, लवचिक कणिक भिजवणे... हे सुद्धा तर निगुतीने करावयाचे काम !
साखरेच्या पाकाचेही किती प्रकार ! साधा पाक, एक तारी, दोन तारी, घट्ट पाक, गोळीबंद पाक ! कोणत्याही गोड वड्या करायच्या तर पदार्थाला perfect शिजवावे लागते. कमी शिजवले तर वड्या मऊ होणार, जास्त शिजवले तर वड्या होतच नाहीत. सगळंच भगरट होतं.
तळून एखादा पदार्थ करणे... हे सुद्धा आपले कौशल्य पणाला लावणारे असते. पापड-कुरडई, पुरी, भजी, अनारसे, गुलाबजाम, चकली... असे अनेक पदार्थ तळताना त्याचे ठोक-ताळे वेगवेगळे असतात. नीट लक्ष देऊन तळण करावे लागते.
दाणे भाजतांना सुद्धा ते विशिष्ट प्रमाणात भाजावे लागतात. कमी भाजले तर कूट खमंग लागत नाही. जास्त भाजले गेले, तर कूट करपट लागतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाकघराची स्वच्छता. भाजी निवडतांना, भाजी किंवा फळे चिरतांना, लसूण सोलतांना waste material साठी आधीच पेपर किंवा एखादी ताटली घेऊन बसावे लागते. म्हणजे भाजीची देठं, लसणीची सालं इ. नको असणाऱ्या गोष्टी या ताटलीमध्ये टाकल्या की नंतरची स्वच्छता सोपी होते. हे ही एक निगुतीने कंटाळा न करता करावे लागते. लहानपणी आईने किंवा लग्न झाल्यावर सासूने याबद्दल सूचना दिल्या की, आपल्याला कधी कधी राग येतो, पण संसाराला पाच-सहा वर्षे झाली, की मात्र हे 'निगुतीने काम करणे' पटायलाही लागते आणि अंगवळणीही पडते.
खरोखर ! स्वयंपाक करणे हे सोपे नाहीच. अत्यंत कौशल्याने करावयाचे काम आहे. थोडा कंटाळा केला तर पदार्थ बिघडलाच... पूर्वी यालाच निगुतीने संसार करणे, म्हणत असावेत.
*©️ मृणालिनी मकरंद जोशी*
*औरंगाबाद*
Comments
Post a Comment