पन्नाशी ओलांडली की
मित्रांनो, पन्नाशी ओलांडली की प्रत्येक माणसाला आपला भूतकाळ आठवतो .विशेषता बालपणीच्या आठवणी प्रकर्षाने जाणवतात व बऱ्याच वेळा आपण म्हणतो ,आमच्या काळात असे नव्हते .त्या काळातील गप्पा-गोष्टी सण-उत्सव अगदी बारीक-सारीक प्रसंग बालपणीच्या मित्रांच्या संगतीचे किस्से यांनी मन मोहरून येते व माणूस परत एकदा तेवढ्या क्षणा पुरता का होईना लहान होतो. पूर्वी खेडेगावात व निमशहरात एवढेच काय पुण्या-मुंबई सारख्या शहरातही चाळीत, गल्लीत दीपावली नंतर तुळशीचे लग्नाच्या समारंभ असायचा.प्रथा होती की तुळशीचे लग्न लागल्याशिवाय विवाह मुहूर्त धरत नसत अशाच एका खेडेगावातील तुळशीच्या लग्नाला चला तर मित्रानो.
" तुळशीच लगीन "
दसरा दिवाळीची गडबड जरा कुठं संपायला येण्याच्या बेतात असायची.कुरमुर्याचा लाल तिखटाचा आणि हळदीचा पिवळा रंग ल्यायलेला चिवडा त्यातली डाळ , तिखट शेंगदाणा व खोबऱ्याचा तुकडा शोधत शोधत केव्हाच संपलेला असे. उरसूर म्हणाल तर त्याकाळच्या दिवाळीचं फराळ म्हणजे करंज्या त्याला आमच्या इकडं" सांजोऱ्या" म्हणीत त्यातला थोडा फार गरा शिल्लक आहे की नाही हे आम्ही पत्र्याचा गोल डबा हलवून हलवून अंदाज घेत असू. लाडू बिडू फार काही घरांमध्ये करायचे नाही. असलंच तर वाण्या ,बेपाऱ्याच्या आण मास्तरच्या घरामधी व्हायचं .अशातनच शाळेच्या दिवाळीच्या सुट्ट्या पण संपायच्या .सुट्ट्या संपून शाळेमध्ये जायला जरा पाय ओढीतच जात, कारण पंधरा-वीस दिवस मोकाट गुरावानी हुंदडायची सवय झालेली सगळ्यानाच .भुईमुगाच्या शेंगा आण बोरं खाऊन खाऊन सरू मायचा "उलुशा" खो-खो करीत गल्लीतन हिंडे .तरीपण बारक ठिगाळ लावलेल्या खाकी चड्डीचा खिसा टम्म भरून, आप्पाच्या आडावरच्या ओट्यावर बसून पोरासोरास्नी पाटीवर लिहायच्या पेनीच्या बदल्यात बोरं विकत
असे. पेनी त लय गोळा करायचा पण लिहायची बोंबाबोंब. मारकुट्या पवार मास्तर ची छडी खाल्ल्या बिगर ह्याचा दिवस जायचा नाही. तेच्या जवळ बसलं तर आंबूस वास येई.भिलाचा परसूचा त पूरा अंगाचा मासोळ्याचा वास वर्गामधी यायचा कारण तो नदीतन मासे पकडता पकडताच कधीतरी शाळत यायचा...{१}
३}
लगीन लावायच्या ठिकाणी तीन-चार ऊसाची खोपडी बांधलेली असे हाच काय तो लगीन मंडप .मंडपामध्ये दोन पाट मांडत एकावर तुळस व एकावर देव्हाऱ्यातील पितळी बाळकृष्ण. तेला आम्ही लंगडा देव म्हणत अशी मांडणी होई. दोन झेंडूच्या फुलांच्या माळा माळीन मावशीने बनवलेल्या खोपडीला टांगत असू. एका एका गल्लीमध्ये म्हणजे वाणी गल्ली ,मधली गल्ली ,खालची गल्ली व "नरोठ पेठ" गल्ली अशा गल्ल्यांमध्यी दोन ते तीन ठिकाणी आळीपाळीने दहा-बारा दिवस लगीन गोंधळ असायचा. आमच्या त्या खेडेगावांमध्ये पंचायतीचे रेशन दुकान व तीन चार छोटीशीच वाण्याची वाणसामानाची दुकान होती. या बिगर दुसरं दुकान नव्हतं. काय कापडचोपड व इतर काही आणायचं तर तालुक्याला जायला लागायचे तरीपण त्या एका गल्लीला "न रोठपेठ "असं का म्हणतात हे बालसुलभ कोडं मला तव्हा पण पडे. आज पावतो मला हे कोडं काय उमगलं नाय, कारण त्या गल्ली मध्ये साधन वाण्याचं दुकान पण नव्हतं तरी "पेठ" म्हणायचे अख्खा गावात सगळेच जण....
२}
असल्या दिवाळीनंतर सालाबादा परमाण एकादशीला गल्ली गल्लीतन तुळशीचं लगीन लागायचे. तुळशीचं लगीन म्ह॔जी घरचच लगीन कार्य. सगळ्या गल्ल्यांमध्यी बायका-पोरी सडा-सारवण करीत. सर्वांची घरं ही मातीची, यामुळे सडा-सारवण, चुलीला पोतेरं मारण ही आया ,मायांची रोजचीच काम होती. आमच्या गल्लीत शिंप्याचे चंदूनानाचे घराम्होर लगीन लागायचे. नानांच छोटसं दुकान होतं व शेतीभाती ही होती. नाना च्या घराम्होर जिथं लगीन लागायचे तिथे सारवण करून दगडावर वाटलेल्या शिरगोळ्याची रांगोळी काढत. हे शिरगोळ आम्ही नदीत डुंबायला जायचो तव्हां येताना वाळूमध्ये हूडकायचो व गोळा करून खिशामध्ये भरून आणायचं .मग ते जो तो आपल्या बहिणीकडं नेऊन टाकायचं. पोरी हौसेने ते दगडावर नाही तर खलबत्यात कुठून आण फडक्यात चाळून रांगोळी करीत असत...
४}
अशा या लगीन मंडपात जवळपासच्या घराचे सर्वजण आपापल्या तुळश्या व देव्हाऱ्यातील पितळेचा लंगडा देव लगीन मंडपात आणीत.ब ऱ्याच घरांमध्ये कोनाड्यातील देव्हार्यात वाडवडिलांच्या टाका व्यतिरिक्त पितळेचा देव सुदिक नसत .नुसतीच तुळशी आणलेल्या बाईला मग धनगराची" वाणू" माय म्हणे नसला" बाळकृष्ण" तर काय बिघडते ग बयां? ठेव इथं. आण कीर्तनात नाय का बुवांनी सांगितलं" किसन देवानं" सोळा सहस्र नारींना आशीर्वाद देलता. मग सर्वांची मांडणी रिंगणात होई, चहू बाजूकडून वराडी उभ राहात. परिस्थिती नसली तरी त्याला कमीपणाची जाणीव "न" होऊ देता समाजात सामावून घेण्याची प्रवृत्ती या अशिक्षित माऊलीकडे कुठन आली असेल? असलं संस्कारक्षम बाळकडू कळत नकळत का होईना मनात पांझरल .
५}
तुळशी साठी आखीव-रेखीव तुळशी वृंदावन वगैरे फार काही नव्हतं खेड्यात .डालडा तुपाच्या पिवळ्या रंगाच्या डब्यात माती भरून व पाण्याच्या रांजना खाली गळतीचे पाणी जमा करण्यासाठी एक मातीचे भांडे कुंभार दादा देई त्याला "नंदाळे" म्हणत. असल्या जुन्या नंदाळ्यात तुळशीचे रोप लावीत. असल्या तुळस या वाड्याच्या अथवा घराच्या भिंतीच्या खुंटीला टांगून ठेवत. वडीलधारे आंघोळ झाल्यावर अथवा देवपूजेचे पाणी तुळशीच्या डब्यात वां नंदाळ्यात ओतीत .तुळशीच्या लग्नाला चार पाच दिवस बाकी असतानाच आम्ही तुळशी काढून घेत असत. मग वाण्याच्या दुकानातून थोडा चुन्याचा पांढरा रंग यांनी आधी डबा वा नंदाळे पांढऱ्या रंगात रंगविण्यात येई. मग त्यावर एका बारीक काडीला कापडाची चिंधी गुंडाळून कुंची तयार करीत त्या कुंचीने मग डब्याच्या चारी बाजूस जमेल तशी नक्षी पानाफुलांची काढली जाई. माझा जिगरी दोस्त शिंप्याचे बापूकाका व माझी चित्र काढायची जाणीव जरा इतरांपेक्षा बरी असल्याकारणाने आम्हाला जरा जास्तीच गल्लीत तुळशी रंगवायला बोलावणं यायचं. गल्लीतल्या "मन्यान" एकदा त्याच्या डब्यावर चारी बाजूनं मोराचे चित्र काढलं. अशी त्याची समजूत. आण त्यांन लग्नाच्या ठिकाणी त्यांच्या घरची तुळशी घेऊन आला .काही बेरक पोरं खो खो हसाया लागली. मनू जरा रागातच म्हणला काय रे, काय दाताड निचकतात ?तर म्हणतात मनू असलं कसलं मोर तुझं? आम्हाला तर तितुरच दिसतय. कालच आम्ही पांढरीत चिंचखाली फासेपारधी उतरलेत त्यांच्याकडे बघितलं पिंजऱ्यामध्ये. त्या वाणीच हाय की .परत सगळे खो -खो हसाया लागलेत. आप्पा न दम भरला मग सारे चडी चुप! असल्या गमती जमती पण व्हायच्या.
६}
उरलेल्या चुना गेरूच्या रंगात ज्या घराम्होर लगीन असायचे त्या भिताडांवर" शुभ तुळशीविवाह" असं नाव मोळाच्या केरसुणीने रंगवीत असू. भिंती मातीच्या व खडबडीत असल्याने त्यावर लिहिण म्हणजे जरा अवघडच काम ,त्यात हा कुंचला असल्या प्रकारचा. ओघळ वहायचे खाली. रंगवताना आम्ही पण बरेच रंगून जात सर्कशीच्या जोकरा वाणी. कधी कधी तर गेरू नाय मिळाला तर लई भारी डोकेबाज पणा लावायचे, भाजक्या चपट्या विटांचे तुकडे एखाद्या पडक्या वाड्यातन किंवा इंग्रजी कौलाचा तुकडा शाळेतन गपचूप आणायचे. मग एखाद्या गाई-बैल बांधायच्या वाड्यात ते विटकर नि कौल याला सारे मिळून आळीपाळीनं दगडावर चांगले कुटून काढीत. नंतर एखाद्या नौटंकी बाज मित्राला, स्वभावानं शांत आणि गरीब असलेल्या "भागा" आजीकडे पाठवायचं. तो आजीला म्हणायचा आजी गं शांता मायने पीठ चाळायला चाळणी मागितली. त्यांची चाळणी फाटली हाय .शांतामाय म्हणली मला आणून देतोस नव्ह, माझा बाळा शाळं मधी गेलाय. असली काहीतरी थाप हाणायचा भागा मायंन चाळणी दिली की हे बेणं चाळणी कुडत्याखाली लपवून धूम ठोकायचा ते थेट बैल वाड्याकडे. चाळणीने विटकर चाळून घेऊन वरचे खडे बिडे फेकून बारीक पावडरीचा रंग मग आम्ही तयार करीत. चाळणी वढ्याला नेऊन गुपचूप धून बिन अंधाराच्या वक्ताला आजी कडे देऊन सटकायायचं. पण असला आगाऊपणा कधीतरी अंगलट येयाचा कारण आजीची व आईची भेट आडावर पाणी भरताना झाली की भागा माय विचारायची, शांता काल पीठ चाळून झाल्यावर काही बाजरीचं मटार बिट्यार चाळलेस का ग ?आज ना आमच्या भाकऱ्या जरा लईच कचकच लागल्यात ग. मग आई भागा मायला विचारायची कसली चाळणी ,वगैरे वगैरे विषय व्हायचा अगं तो पद्मा मायचा नातू, तू नाही का त्याला चाळणी मागाया पाठवलं होतं ना. यात आमचं सारं बिंग फुटायच. आडावरच आई नी माय आमच्या साऱ्यांच्या नावाने दोन-चार शिव्या द्यायच्या. मेल्यांना काही कामधाम नको नुसतं रिकामं उद्योग करायला पाहिजे असलं रंगपुराण घङायच.
७}
कडूस पडायच्या वक्ताच्या आधीच गाव ओहळाच्या पिंपळा जवळ रानात चरायला नेलेली गाई गुर, शेरडं बापू गवा-रा घेऊन यायचा .आम्ही मुलं ती गाई ,शेरडं ज्याची त्येच्या घरी नेण्यासाठी पिंपळा जवळ येऊन थांबायचो. कारण काही गुरांना लई वाईट खोड असायची, ते गावाजवळ आले की गावंदरीकडे धूम पळत मग त्यांना आवरणं जरा मुश्कील काम. शेरड ,गाई, वासरे वाड्यामध्ये कोंडत .तोपर्यंत रानात कामाला गेलेली मोठी बाया-माणसं पण घराकड येत. गड्या माणसांचा चहापाणी होई. दिवाबत्ती पुसून, चिमण्या कंदिलात घासलेट भरून वाड्यात चुलीपाशी शेणीच्या गवऱ्या न लाकडं आणून झाले की गल्लीत तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू होई. गल्लीत म्हातांर-कोतार, गडी माणसं, बाया, पोरं-पोरी खोपडी पाशी जमत. काही पोरी परकर पोलक्यात तर काही आपल्या आजीची वा नवीनच लगीन लावून आलेल्या काकूच ठेवणीतलं लुगडं गुंडाळून येयाच्या. एखादी च्या गळ्यामध्ये आजीची वजीटीक वा पुतळ्याचा हार घालून खऱ्या लग्ना वाणी मिरवत .धनगराच्या" चिंधा" आत्याचे दंडामधी चांदीचे चमचमणारे दंडकडे असायचे. ती आई बाला एकटीच होती. तिचे वडील घोंगड्यांचा व्यापार करीत कोकणात तिकडे पेठ सुरगाणा कळवण कडे.गावातील सर्व जण त्येना बेपारी म्हणत. चिंधा आत्या स्वभावाने गोड होती ,व्यापारी दादानं शेव कुरमुर्याचा खाऊ आणला तिला तर ती गल्लीत पोरासोरास्नी घासभर तरी देई.वाटून निटून खाण्याची सवय व्हती सर्वानाच.
८}
सगळी जमा झाली की एखादं बारक पळत पळतच आमच्याच गल्लीत राहणारे कुलकर्णी बामन दादा कडे जाऊन सांगायचे काका काका आमच्या "तुळशीची" तयारी झाली आहे आण मी आमचा लंगड्या देवपण आणून मांडला आहे. चलाना आमच्या घराम्होर, जय्यत तयारी हाय.मग कुलकर्णी काका खांद्यावर पंचाचे उपरणे टाकून डुलत डुलत यायचे खोपडी च्या मंडपापाशी. म्हणायचे जमले का सगळे? करायची का सुरुवात? त्येंच्या खांद्यावरच्या ऊपरण्याचा अंतरपाट तयार होई. अंतरपाट धरायला बारक्या मध्ये चढाओढ. पण ज्याच्या घरा म्होर लगीन, त्येचा पाट त्येचाच नंबर लागायचा. अक्षदा वाटण्याचे काम पोरं-पोरी करीत .अक्षदा वाटली की मंगलाष्टक सुरू होत बामन दादाचे एक दोन मंगलाष्टक झाले की वराडातील एखाद्याला सूर लावायची हौस येई मग तो पण एक दोन मंगलाष्टक चिरक्या नायतर भसाड्या आवाजात म्हणूनच घेई. आम्हाला फिदीफिदी हसू येई पण मोठ्यांना घाबरून हसता येईना. तारा बलंत, विद्या बलंत ,दैवबलंत असलं काही बाही म्हणत गुरुजी शेवट" सावधान" म्हणत. सावधान म्हटले रे म्हटले की बरोबर आणलेल्या काशाचे ताट ,पितळी तांबे, भजनाचे टाळ ,घंट्या जे काय मिळेल त्याची वाजंत्री जोरदार वाजवली जायची .गल्ला करायचं एकमेकांच्या अंगावर अक्षदा फेकायचे .लगीन लागले वर खडीसाखरेचे एक दोन दाणे हातावर टेकवायचे बामनदादा .मग जो-तो आपापली तुळस घरी घेऊन जायचे. तुळस खुंटीला व बाळकृष्ण कोनाड्यातील देव्हार्यात, पुढच्या वर्षीच्या लग्नाच्या दिवसाची वाट पहात. यावरून विरह वेदना हा निसर्गनियम तो देवादिकांना ही चुकला नाही .तसलं सोशीक व्हायला भाग पाडणारा प्रसंग. एवढं होऊनही पोरांच कोंडाळ काही खोपडी पासनं हाले ना. मोठ्या माणसांच्या लक्षात यायचं ह्या वानर सेनेला ऊसाच कांड दिल्या बिगर ही काय जागची हलत नाहीत. वडीलधारे उसाची बांडी मोडून विळ्यान उसाचं दोन चिरफाट करीत व थोडे थोडे तुकडे पोरा पोरींना देत. मग चिरफाट आम्ही लेमन गोळ्या वाणी चाखत असा एकदाचा खोपडी चा निकाल लागायचा. मोडलेल्या बांडी चा पानं असलेला हिरवा भाग मी पटकन गोळा करून आमच्या गोठ्याकडे पळायचो माझ्या "मथुरा "गाईला व तिच्या वासराला देण्यासाठी. लहान वासरू शेळीचं कर् ड यांच्याशी खेळण्यात लईच मजा यायची.निरागस स्पर्शाची अनुभुती काहीतरी अद्भुत असते ती अनुभवण्याचे भाग्य बालपणी आमच्या नशिबी होते. नाना नायतर बापू मथुरेचे दूध काढायला गोठ्यात जात तवा मी पण वासरू पकडायला जायचो. दूध कसे काढतात याचं निरीक्षण आपोआप होत गेलं .एखादेवेळेस शेवटी शेवटी चार-दोन धारा काढायची माझी ही हौस पूरवत. दूध काढताना वासराला चाटत असताना, मथुरेच्या गळ्यातील घंटा व वासराच्या गळ्यात मी बांधलेल्या बारीक घुंगरांचा झुमका याचा आवाज कोणत्याही जादुई संगीता पेक्षा कमी नव्हता.
अश्या हा तुळशीच्या लगीनाची लगीन घाई ,धामधूम साधारण पंधरा एक दिवस चालायची. आज या गल्लीत उद्या त्या गल्लीत आमचं मित्रांच वराड या गल्लीत न त्या गल्लीत गावभर भटके यात कुठेही बडे जाव नव्हता .कुणी गरीब-श्रीमंत आण जात-पात तर आमच्या मित्रांच्या गावालाच नव्हते होता फक्त निखळ आनंद. कालाच्या ओघात मातीचे घरे गेलीत ,कातीव खांबाच्या ओसऱ्या गेल्यात, चिरेबंदी ओटे, बैठकी गेल्यात. पिंपळाचा पार गेला एवढेच काय जुनी देवळं ही आधुनिकी करणाच्या नादात पाडलीत, खुंटीवर च्या तुळश्या , बंगल्यात चिरेबंदी झाल्यात, देवळांचे सभामंडप झालेत. मोठ्या सुपार्या महाराजांचे कथा कीर्तने होऊ लागलेत, सभामंडपात निवडणुकीची भाषण होऊ लागलीत लग्नकार्याचे इव्हेंट झालेत पण कितीही झाले तरी माझ्या गल्लीतल्या तुळशीच्या लग्नाची सर आणि सय काही येईना मित्रांनो ,मथुरेच्या गळ्यातला घंटा व वासराच्या गळ्यातील घुंगरांचे नाद कुठेतरी हरवले आहेत. सारखं काहीतरी हरवत आहे याची कुणकुण मनाला बेजार करीत आहे कारण आपण त्या पिढीचे अनुभवी साक्षीदार आहोत.
इंजिनिअर दिलीपराव जी .शेवाळे बीई सिव्हिल
नाशिक. 9764643276
Comments
Post a Comment