नाशिकची चारित्रिक ओळख



*नाशिकची चारित्रिक ओळख*

एकेका शहराचं एक चरित्र असतं, मी गेली बेचाळीस वर्षे नाशिकला पाहतो आहे आयुष्याच्या नवव्या वर्षी नाशिकला दाखल झाल्यानंतरच्या आठवणीतून मी नाशिकच्या चारित्र्यात डोकावण्याचा प्रयत्न करणार आहे
कोण घडवतं शहराचे चारित्र्य...... प्रमुख्याने त्या शहराचा भूगोल ,इतिहास आणि तिथली माणसं ! नाशिक जसं जसं मला उलगडत गेलं, तसे नाशिकचे विविध पैलू मी शब्दबध्द केले आहेत.

*अगत्यशील नाशिक*
हे शहर प्रत्येक येणाऱ्याला आपलंसं करून घेतं. आपलं-परकं हा वादच नाही. देवळाली येथिल सैन्यदलाची छावणी असो, ओझरचा विमान कारखाना असो वा नाशिकरोडचा नोटांचा छापखाना भारतातील सर्व प्रांतातून आलेले येथे गुण्यागोविंदाने नांदतात..... इथून बदली होऊ नये म्हणून देवाला प्रार्थना करतात..... येथील कोकणी दुधाच्या धंद्याला आपलंसं करतात, पटेल मंडळी किराणा बाजार काबीज करतात, युपीचे भय्यै बांधकाम व्यवसायात दिसतात, सरदारजी गॅराज काढतात. कोणाची काहीच तक्रार नाही. मराठी माणूस अगदी साधा भोळा.... आपल्याला जमतं ते आपण करावे जे जमत नाही ते इतरांना करु द्यावे , या मताचा !

*माझं मी पण जपणारं नाशिक*
शहर छोटसं, पण ओळख खूप मोठी.... दक्षिणेची काशी म्हणून असलेला लौकिक ते आजची वाइन केपिटल .... नवीन जडणघडणीतही शहरानं आपलं नावं टिकवलं.  विस्तारा बरोबर बकाल न झालेलं बहुतेक हे एकमेव शहर.... कारण ते कधीही राजकारण्यांच्या ताब्यात गेलं नाही ! एखाद्या उत्पादना मागे नाशिकचे नाव असेल तर ते प्रीमियम गणले जाते.. मग ती नाशिकची चांदीची भांडी असोत नाशिकचा सागवानी लाकुड असो वा ... द्राक्ष, कांदा ते वाइन आणि मिसळ पर्यंत..... नाशिकची व्हरायटी म्हणजे नेहमी उजवी. आपलं मी पण जपताना शहरानं आपुलकी सोडली नाही. नाशिक वर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांचे संस्कार आहेत.... पण नाशिकने मुंबईकडून बकालपणा न घेता  मुंबईची फॅशन आणि औदार्य घेतलं तर पुण्याकडून अहंगंड न घेता सांस्कृतिक वैभव घेतलं.

*सातत्यशील नाशिक*
छत्रपती शिवाजींपासून टिळकांपर्यंत आणि सावरकरां पासून आजतागायत या शहराने स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या बाबतीत तडजोड केलेली नाही. संत निवृत्तीनाथ, समर्थ रामदासां पासून आजतागायत या शहराने संतांची शिकवण सोडलेली नाही. सातत्याने चारित्र्याला जपणारे हे शहर आहे. देश आणि समाज हिताच्या चळवळीत नाशिक नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे मग ते आणीबाणी विरुद्ध राजकीय आंदोलन असो, शेतकऱ्यांचा लढा असो वा राममंदिराचा मुद्दा असो....
वसंत व्याख्यानमाला, पाडवा पहाट, रथयात्रा, होळीच्या वीरांच्या मिरवणूका, रंगपंचमी.... सर्व काही बदलत्या काळातही सुरळीत आहे.

*नाशिकची धन दौलत*
नाशिकला लाभलेला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा ही खरी नाशिकची धन-दौलत, त्यासोबत लाभलेली उदंड निसर्ग संपदा . दोन करा ने किती घेऊ न किती नको ही परिस्थिती. थेट रामायण कालीन संबंध असल्यामुळे नाशिकचा इतिहास किती प्राचीन हा प्रश्नच गैरलागू आहे. बरं रामायण कालीन संदर्भ फक्त पोथ्यां पुरते नाहीत तर त्यांची भौगोलिक सत्यता प्रमाणीत होत चाललेली आहे. गोदावरीचा उगम कधीचा , हे विचारणं म्हणजे  ऋषीचा कुळ विचारण्यासारखे आहे ! गोदाघाट, पुराणकालीन देवालये, गाडगे महाराज धर्मशाळा, जुने वाडे जुन्या नाशकातील घरे, पेशवेकालीन बारवा या सर्व नाशिकची ओळख ठसविणाऱ्या खुणा . नाशिकच्या सभोवताली असणाऱ्या सह्याद्रीचं अभेद्य कवच आणि त्यावरची निसर्गसंपदा म्हणजे पदरी पडलेलं जास्तीचं माप ! नाशिकच्या सभोवतालच्या डोंगराळ भागात असणाऱ्या कोरलेल्या अनघड गुहांमध्ये कदाचित ऋषी-मुनींनी दीर्घकाळ तप केले असावे, म्हणूनच नाशिक ही तपोभुमी . येथिल गड किल्ल्यांच्या पुसटशा खुणां मधून डोकावतो मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास.
जुन्या काळाशी सांगड घालणारं हे सांस्कृतिक वैभव आता काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

*भोळं- भाबडं नाशिक*
भोळेपणा हा इथला स्थायीभाव. पुण्या सारखा नाशिककर चिकित्सक मुळीच नाही. पटकन विश्वास ठेवणार आणि कुठलेही गाजर दाखवलं तरी नादी लागणार ! कुठलाही पंथ फोफावण्या साठी ही अगदी सुपिक नगरी. फरशीवाले बाबा ते आसाराम बापू..... हे मध्यमवर्गीयांचे, तर हरे राम हरे कृष्ण ते श्री श्री रविशंकर हे पांढरपेशीयांचे.... पंथ महिमा हा सार्वत्रिक आहे... खरे-खोटे ज्याचे त्याने ठरवावे ! इथे थापा मारल्या तरी पचतात म्हणूनच तर जास्त उत्पन्नाच्या गाजर दाखवणाऱ्या स्कीमा पुन्हा पुन्हा उघडकीस आल्यावर ही पुन्हा पुन्हा नव्याने फोफावतात. येथे कोणीही यावं व बस्तान बसवावं.... हे बुधवारच्या बाजारात तंबू टाकण्या इतकं सोपं आहे. तू कोण कुठला किती दिवस थांबणार हे विचारणं इथल्या स्वभावातच नाही ! येथील व्यवहार अजूनही विश्वासावर चालतात, वकिली कागदपत्रांचा अजून सुळसुळाट झालेला नाही आणि आणि ही अभिमानाने मिरवण्या सारखीच गोष्ट आहे की इथला विश्वास पानिपतच्या लढाईत मारला गेलेला नाही.

*कर्मकांडी नाशिक*
होय, इथे सुतावरुन स्वर्ग गाठता येतो.... त्र्यंबकेश्वर किंवा गंगाघाटावर गेलात कि तुमची नाळ थेट तुमच्या स्वर्गीय आप्तांशी जुळते. इथल्या पुरोहितांच्या पोथ्यांमध्ये तुमच्या आठवणीतून गेलेल्या तुमच्या पूर्वजांच्या खाणाखुणा नक्की सापडतील. मोबाईल मध्ये साठवलेला तुमचा डाटा कधी स्वर्गस्थ होईल हे सांगता येणार नाही पण तुमच्या सात जन्माचा इतिहास पुरोहितांच्या पोथ्यांमध्ये अजूनही सुरक्षित आहे याचा पडताळा खरोखरच नव्या पिढीने घ्यायला हवा. तुम्ही कितीही विज्ञाननिष्ठा असा... कर्मकांडाचा प्रभाव संपलेला नाही....  हे तुम्ही त्रंबक किंवा गोदाकाठी गेल्यावर दिसेल. 

*नाशिकचा पावसाळा आणि कुंभमेळा*
पुणेकर जशी आपली बिरुदं अभिमानाने मिरवतात तसं नाशिककरांचं नाही. अभिनिवेश तर मुळीच नाही. कुंभमेळ्याला अख्ख्या भारतातून लोक येतात.... पण पांढरपेशा नाशिककरांना मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नसते. नदीला पुर आला तरी गंगापूररोडकर फारतर विक्टोरिया पुलावरून पाणी न्याहाळण्यासाठी येणार...गोदा स्नानाचं महत्व इतरांसाठी.... आमच्या नळाला गंगेचंच पाणी येतं...! पुणेकरांना सिंहगड आणि पर्वतीचा कोण अभिमान... तितकसं नाशिकच्या पांडवलेणी व रामशेज विषयी नाही सांगता येणार.
आताशी कुठे नाशिककर जागा होतोय..... जसं नाशिकच्या रामकुंडात परकेच जास्त न्हाऊन जातात तसंच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि धबधब्यांवर बाहेरचीच मंडळी जास्त भटकतांना दिसते. हरणाला  त्याच्या पोटी कस्तुरी असल्याचं जसं माहीत नसतं
 तसंच काहीसं नाशिककरांच्या बाबतीत म्हणता येईल..
एरवी हाकेच्या अंतरावर असलेलं सह्याद्रीचं पावसाळी सौंदर्य ज्यानं पाहिलं आणि अनुभवलं.....त्याला वेड लागायचंच बाकी राहतं. अशा वेड्यांची अख्खी जमात आता नाशिकला फोफावतेय. केसरीचे भटके आणि सह्याद्रीचे भटके यांची नाळ जुळणे अवघड आहे !

*संथ नाशिक*
नाशिककर आपलं आयुष्य आपल्याला लयीत जगतो, संथ वाहणाऱ्या गोदामाई सारखं, त्यात धोकादायक वळणे व धक्के फार कमी.... बेताचं सुखी आयुष्य जगण्याइतपत उत्पन्न..... जास्त शिकलेले व जास्त उत्पन्न वाले सर्व पुण्यात किंवा परदेशी. बहुतांश आई बाबा आपलं रिटायर्ड आयुष्य नाशकात मस्त मजेत घालवतात. नाशिकचा कितीही विस्तार झाला तरीही आजही नाशकात दोन ठिकाणी फार तर फार अर्ध्या तासात पोहोचता येतं. घरचं वाहन नसलं तरी दाराशी ओला उबेर ची सोय. होरपळणारा उकाडा नाही की गारठून टाकणारा हिवाळा नाही. इथे कोणासही आपापल्या आवाक्यात जगता येतं.... पैसे खुळखुळत असतील तर मोठी हॉटेल्स नाहीतर मस्त मिसळ आणि बुधाची जिलबी आणि भटकायला फ्री फंडाचा सह्याद्री.
वरिष्ठांसाठी बागा, मुलांसाठी क्रीडांगण, तरुणांसाठी टर्फ !
सभा व्याख्यान नाटक सिनेमे शास्त्रीय संगीताच्या मैफिली.... ज्याला जे जे आवडेल ते ते. लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक हे महाराष्ट्रातील चौथ्या नंबरचे मोठे शहर असून सुद्धा व्यक्तिगत ओळखीपाळखी चा विस्तार ही तितकाच. प्रत्येक मत मतांतरांच्या लोकांना त्यांचे समविचारी भेटून जातात त्यामुळे एकटेपण जाणवत नाही. पाल्य जवळ नसलेल्या कित्येक जोडप्यांना‌ हे शहर एकटं पडु देत नाही. सध्याच्या युगात विकास मिरविण्यापेक्षा ही गोष्ट खचितच खूप मोठी. 


माझ्या दृष्टीने नाशिकची चारित्रिक ओळख पटविण्याचा हा अगदी छोटासा प्रयास आहे. ही ओळख अजुन कित्येक  अंगाने वेगवेगळी असु शकते....
🌸

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार