पोस्टकार्ड

आज चाळीशीपार असलेल्याना हे सगळं अनुभवता आलेलं आहे, नव्या पिढीला जिथे आईबाप स्मार्ट फोन आणि इमेल्स वापरतात त्यांना हे पुरातन वगैरे वाटेल कदाचित !!

“ तुझ्या डोळ्यात का पाणी आलय ? “
“ अवो ,काई न्हाई ,चुलीच्या धुरान पाणी आलय जरा , न तुमच्या डोळ्यात का पाणी आलय ?”
“आग ,वावधान उठल न फुफाटा डोळ्यात गेलाय बघ "

दोघांनी एकमेकाला खोटच सांगितलेलं.
तालुक्याला शिकणाऱ्या पोराच पत्र आलेल. खुशाली कळवली ,अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितल त्याचा दोघांना आनंद झालेला.

पत्र आलेल डालडाच्या पत्र्याच्या डब्यात भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं. त्याला भाकरीचा,लोणच्याचा गंध लागलेला. खाजगी मेस दुर्मिळ आणि असल्या तरी आर्थिकदृष्ट्या न परवडणारी बाब, एसटी महामंडळ ही डब्यांची सेवा द्यायच त्यामधून अनेकांची शिक्षण पूर्ण झाली.

काल सकाळी आईन पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडलान लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेल.

" पाऊस बराय,गहू काढणीला आलाय ,गाईला कालवड झालीय तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईन ,तुझ्या मित्रांना पण दे ,बाकी खुशाल ,सुट्टीत आल्यावर बोलू ,काळजी घ्या "

घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडलान लिहिलेलं पत्र.पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलन लिहिलेल्या.

पण त्या अक्षरांना गंध असायचा ,मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा,भाजीचा,चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध.

हजारो पत्र्याचे डबे रोज एसटीने अशी आईबापाची खुशाली पोरांना न पोरांची खुशाली आईबापाला कळवत असायचे.

लांबच्या गावात शिक्षणाला असलेल्या पोराला, परगावी असलेल्या पाव्हण्या रावळे ,नातेवाईकाला खुशालीच पोस्टकार्ड जायचं.कधीतरी कुणीतरी गेल्याची न दशक्रियेची माहिती देणारी काळ्या शाईत छापलेली पांढरी कार्ड असायची.

परगावी दिलेल्या लेकीला बाप अंतर्देशीय पत्र टाकायचा.नीळ पत्र आल न घरातल्या कुणीतरी आणून दिल कि कामातून वेळ काढून सासुरवाशीन लेक अधिरतेने अल्लाद पत्र फोडून वाचायची. “ अनेक उत्तम आशीर्वाद " अस वाचल कि बापाचा खरखरीत हात गालावरून फिरल्याचा भास व्हायचा. पत्र वाचताना लेकरू मांडीवर बसलेल असायचं न " पिंट्याला गोड पापा " वाचल कि नकळत हात लेकराच्या डोक्यावरून फिरायचा. शेवटाला " सगळे खुशाल आहेत " वाचल कि डोळ्यातून पडलेल्या थेंबानी शाई ओली होऊन अक्षर विस्कटून जायची.

रात्री एकांतात पारायण करताना फुटलेला हुंदका नवऱ्याच्या हसण्यात विरघळून जायचा. अक्षरावरून हात फिरवताना आईवडिलांच्या मायेचा जणू स्पर्श जाणवायचा.

पोस्टाच्या पिवळ्या पाकिटातून राख्या यायच्या नाहीतर तिळगुळ यायचे ,बारीक प्लास्टिकच्या पुडीत ठेवलेले.
भावाच्या आठवणी ,लटकी भांडण सगळ लख्ख आठवायचं.

लग्न जमलेली ,जमवण्याच्या प्रयत्नात असलेली ,कॉलेजला असलेली जोडपी निगुतीन गुलाबी सुगंधी कागदावर चांगल अक्षर असलेल्या मित्र नाहीतरी मैत्रिणीकडून लिहून घेऊन तेही रंगीत पेनान " मोह्ब्ब्तका इजहार " करायची. अशी पत्र एखादी वही पुस्तक देण्याच्या निमित्ताने दिली जायची.मग अशी सुगंधी पत्र कुठल्यातरी वहीच्या मधल्या पानात लपून बसायची न त्याचीही पारायण व्हायची. किरकोळ यमक्या कविता टाकून सुंदर अक्षरात पत्र लिहून देणाऱ्या मैत्रीण मित्राचा काहीही वट असायचा.

लग्न ठरलेल्या जोड्यांची पत्र घरात आली कि कुणी फोडत नसल तरी त्यावरून लहान भाऊ ,बहिण,वहिनी चेष्टा मात्र करायची अन अशी चेष्टाही गोड गुदगुल्या करायची.

कधीतरी अवेळी दरवाजावर पडलेली थाप आणि " तार " अशी हाक ऐकली कि काळजात धस्स व्हायचं न छातीचा ठोका चुकायचं. आलेली तार बहुतेक वेळा कुणाच्या तरी गेल्याची वर्दी द्यायची तर क्वचित प्रसंगी नोकरीवर रुजू व्हा म्हणून निवड झाल्याची बातमी देऊन आनंदी करायची.

साध्या चतकोर पानावर लिहिलेली चिठ्ठी,पोस्टकार्ड ,अंतर्देशीय पत्र असोत कि गुलाबी कागदावर लिहिलेली पत्र असोत ,त्या अक्षरांचा सुगंध आणि स्पर्श अगदी नेमका जाणवायचा ,अगदी मनाच्या तळाला जाऊन पोहोचायचा. अक्षर कसही असलं तरी त्यावरून बोट फिरवलं की माणसाला भेटल्याचा भास व्हायचा.

बदल चिरंतन असताय.काळ बदलला.स्मार्टफोन आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात असली पत्र पाठवण म्हणजे बैलगाडीचा स्पीड वाटेल एखाद्याला.

पण वाट पाहण्यातली आतुरता ,हुरहूर आणि अप्रूप आता तेवढ राहील नाही.

तस तर पहिलं काहीच आता पहिल्यासारख राहील नाही.

#नॉस्टॅल्जिक 

#अवांतर

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार