साहेबाची मीटिंग
*साहेबाची मीटिंग*
साहेबाच्या मागे भरपूर मिटिंग.. ...कामाच्या व्यापामुळे काही मीटिंग साहेब विसरून जातो.....साहेबाच्या खुर्चीच्या समोरच्या फळ्यावर पुढच्या मीटिंग ,कार्यक्रम वगैरे लिहिण्याची फॅशन साहेब जॉईन झाल्यापासून 5-6 दिवसात बंद पडते..
मीटिंग चा agenda येऊन पडतो... मरणामातीचे विषय... नेहमीप्रमाणे agenda आल्यानंतर तयारीला सुरुवात! मागची मीटिंग झाल्यापासून महिनाभर पाट्या टाकणे , भानगडी सोडविणे, कुटाने मिटविणे,आंदोलन, उपोषण, आमदार, मंत्री, उदघाटन प्रोटोकॉल ,कमिट्या, दुष्काळ, पूर, पाणी , पाऊस, धंदापाणी, पार्ट्या , अध्यात्म वगैरे यातच गेला... मग मिटिंगसाठी कर्मचारी कसले तरी report आणून टाकतेत, काही बिचारे तर आकडे बदलायची पण तसदी घेत नाहीत ,काही अंदाजेच आकडे हाणून टाकतेत...काही काही विषय तर फक्त साहेबालाच माहीत असतात... त्याचा बाकीच्या स्टाफ ला गंध पण नसतो!! शेवटी जमेल त्या पत्रावळ्या बांधून घेऊन साहेब मीटिंग ला निघतो...मीटिंग सुरू होण्यापूर्वी साहेब डायरी उचकुन बघतो, साहजिकच ती मागच्या मीटिंग नंतर थेट आजच उचकलेली असते!! साहेबाला वाटत जरा 2-4 दिवस आधी डायरी उचकुन बघितलीअसती तर जरा बरं झालं असतं.... मीटिंग सुरू होते...
मग एका एका विषयाच्या आढाव्याला सुरुवात होते. मीटिंग घेणारा साहेब मुद्देसूद मीटिंग घ्यायला लागला तर मग खालच्या साहेबांच्या फ्युज उडायला सुरुवात होते.. एक तर मिटींगला आणलेल्या पत्रावळ्यामध्ये जे पाहिजे ते सोडून बाकी सगळं सापडतं!! साहेबाने काही विचारलं की नुसते पानं चाळायचे...काही सापडणार नाही हे माहिती असतंय तरी acting करायची!!..नाहीतर गुपचूप चोरासारखं इकडं तिकडं बघून खाली वाकून संबंधित कर्मचाऱ्याला फोन करून आकडे , माहिती घेण्याचा प्रयत्न चालू असतो पण त्याचा फारसा उपयोग होत नाही!!आढावा घेणारा साहेब विचारत असतो अमुक विषयात आपला performance खूपच खराब आहे( तसा सगळ्याच विषयात खराबच असतो!!) तर आपला साहेब सांगणार साहेब आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, सगळ्यांना सूचना दिल्या आहेत, बऱ्यापैकी काम झालं आहे, थोडंच राहील आहे, 100% करून घेतो असली काहीतरी मोघमछाप उत्तरे देण्याचा कार्यक्रम चालू असतो, पण याच साहेबाला जेंव्हा याचे फिल्डवरील कर्मचारी असली मोघम उत्तरे देतात तेंव्हा ती त्याला मुळीच आवडत नाहीत!!!
त्यात पुन्हा आढावा घेणाऱ्या साहेब आणि आढावा देणारा साहेब यांचे आकडे एकमेकांशी कधीच जुळत नाहीत, आणि हा जर विषय वेळीच गांभीर्याने घेतला नाही तर अजून किमान 50 वर्ष ह्या दोघांचे आकडे जुळण्याची सुतराम शक्यता नाही( शासनाने यासंबंधी एखादा अभ्यासगट नेमण्याची गरज आहे, पण त्या अभ्यासगटामध्ये पुन्हा असलेच साहेब घेणे कटाक्षाने टाळले पाहिजे!). बरं आकडे जुळले नाही की साहेब सांगणार आम्ही online केलं होत पण दिसतच नाही, technical problem आला, अपलोड झालं नाही, कस काय दिसेना तेच समजेना असल्या दयनीय ,केविलवाण्या ,कालबाह्य कारणांचा आधार घ्यायला सुद्धा साहेब मागे पुढे पाहत नाही.
प्रत्येक विषयाच्या आढाव्यात हेच.. करून घेतो, घेतो करून, पाहून घेतो, लक्ष घालतो(एवढ्या दिवस लक्ष कुठं होत हे विचारायचं नाही!)वगैरे वगैरे....
बऱ्याच विषयांबाबत साहेब बिनधास्त सांगून टाकतो दोन दिवसात करून घेतो... अख्खा महिना गेला तेंव्हा याला जमलं नाही आणि आता दोन दिवसात काय तिर मारणार ते साहेबाला
माहिती...हे असले बरेच विषय दोन दिवसात संपवतो म्हणणाऱ्या सुपरमॅन साहेबांची कार्यक्षमता तपासण्यासाठी एकदा आढावा घेणाऱ्या साहेबाने यांची तिसऱ्या दिवशी मीटिंग घेतलीच पाहिजे!! त्याशिवाय ही दोन दिवसात करून घेतो म्हणण्याची अनिष्ट प्रथा समाप्त होणार नाही... पण आढावा घेणारा साहेब पण यांची कार्यक्षमता तपासण्याची रिस्क घेत नाही(शेवटी तो पण साहेबच!!)...
काही विषयामध्ये शून्य कामगिरी असते पण एखादा साहेब अमुक करताना तमुक technical problem येतो असं काहीतरी खुसपट काढतो ...वरच्या साहेबाला पण काय समजत नाही.. मग वरचा साहेब पण वेळ मारून नेण्यासाठी म्हणतो ठिक हे, दोन दिवसात करून घ्या... त्यामुळे बाकीच्या साहेबांवर आलेली संक्रात टळते...
एवढं सगळं होऊन एखादा तरी विषय असा असतो की त्यात साहेबाचा performance बाकीच्यांपेक्षा जरा बरा असतो पण नेमकं त्याच वेळी आढावा घेणारा साहेब म्हणतो मी काय आज या विषयाचा आढावा घेत बसणार नाही, जे राहिले त्यांनी लवकर विषय संपून टाका!! आता सांगा साहेबानी करायचं तरी काय....
प्रत्येक विषयाचा आढावा घेताना साहेब नमूद करतो की या विषयाचा वरच्या पातळीवरून प्रचंड फॉलोअप सुरू आहेत, मला स्वतःला showcause नोटीस आली, DO आला वगैरे.... थोडक्यात आढावा घेणाऱ्या साहेबाच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की मला नका घाबरू पण किमान माझ्या वरच्या साहेबाला तरी घाबरून काम होईल, पण त्याचा विशेष उपयोग होत नाही!!
असे प्रत्येक विषयामध्ये साहेबाची विकेट जात जात मीटिंग संपण्याची वेळ झालेली असते. एव्हाना सगळ्या साहेबाना बायकांचे (स्वतःच्या) फोन सुरू झालेले असतात, जेवायला येणार का वगैरे वगैरे, आढावा घेणाऱ्या साहेबाला पण फोन येत असतो पण तो बायकोचा फोन आहे असं समजू नये म्हणून त्याच्या वरच्या साहेबाला बोलल्याची acting करतो.. काही अतीऍक्टिव्ह साहेब घरून निघतानाच आज उशीर होणार अस सांगून पुढचं 'नियोजन' करून मीटिंगला निघतात.....मीटिंग सुटल्या सुटल्या कुजबुज सुरू होते लै काम आहे राव आपल्याला ,कस एवढं manage करायचं वगैरे वगैरे...मग सगळे साहेब मार्गस्थ होतात... काही श्रमपरिहारस्थळाकडे तर काही घराकडे... पुन्हा एकदा नव्या उमेदीने... पुढच्या मीटिंग ला चांगली तयारी करू असा निश्चय करून.... पण पुन्हा पुढच्या मीटिंग ला तीच बोंब... बदलीपर्यंत तेच...बदली झाली तरी तेच ...
मीटिंग म्हणजे साहेबाला स्वतःच्याच ऑफिस मध्ये त्याला होणार मनस्ताप ,त्रास ,हतबलता टाळणेकामी केलेली सोय आहे.खरेतर दैनंदिन कामातून(की त्रासातून) त्याची केलेली सुटका आहे.
त्याचे फायदे खुप आहेत जसे की
साहेब गाडीत बसून जेव्हा हातातील कागद वाचतो तेव्हा तो विचार करतो की मी आता काय काय करू आणि कसे कसे करू. आणि काय बोलू.यामुळे साहेब आत्मचिंतन करू लागतो.
हाताखालच्या clerk ने चुकवलेले , न जुळवलले आकडे साहेब प्रयत्न करून
जुळवतो आणि त्याची टक्केवारी ऍडजस्ट करतो तेव्हा साहेबाच्या शाळेतील गणित च्या बाई आणि मास्तर चा सन्मान राखला जातो.आणि आपोआप तो सांख्यिकी तज्ञ होतो.
साहेब मीटिंग चे अहवालातील चुका दुरुस्त करून आपली माय मराठी आणि वाघिणीचे दूध असणारी इंग्लिश याचा सन्मान राखतो.
ऐन टायमाला विचारलेल्या मूळ आढावा प्रश्नाला उत्तर देतांना हातात चुकूच्या,वेगेलेच कागद असलेने उत्तर देताना प्रश्नांना बगल देऊन वेगळेच उत्तर देऊन साहेबाचे समाधान करणेची हातोटी लाभते(ही बायको समोर पण उपयुक्त ठरते)
मोठा साहेब हुशार असेल तर त्याला ही मेख कळल्यावर तो आपल्याला बोलतो तेव्हा इतर अधिकारी/ कर्मचारी यांच्या समोर स्थितप्रज्ञ राहून ,शिव्या खाणारा देह नश्वरआहे पण आत्मा चिरंतन आहे याची जाणीव होते.म्हणून त्रास करून घ्यायचा नाही हे कळून आपण निवांत होतो.
तसेच गरजेपुरते बोलावे,कमी बोलावे आणि नेहमी एकूण घ्यावे त्यामुळे श्वास हळूहळू घेतला जातो आणि परिणामी आयुष्य वाढते असे आपल्या वेदात पुराणात सांगितलं आहे त्यामुळे मुकाट्याने फक्त एकूण घेतलेने मीटिंग च्या दिवशी श्वास संख्या वाढवण्यात यश येते.
या निमित्ताने खाली मान घालून समोर चा नाष्टा चा गारेगार वडा , मोजून 5 वेफर्स, आणि एक गोलसर दिसणारा आणि 7/8 साखरेचे दाणे लावलेला गुलाबजाम आपण मन लावून खातो .यातून आपण अन्न हे परब्रह्म आहे हे शिकतो.मग कोमटसर असणारा , साय आलेला चहा कधी येईल याची वाट पाहत बसतो .परिणामी संयम वाढतो.
तोवर शेजारील ऑफिसरला पण मोठया साहेबाने शरीर आणि देहातील फरक जाणवून दिलेला असतो. आणि आपण सगळेच एकाच नावेचे प्रवासी आहोत याची जाणीव होते.आणि भेदभाव विसरला जातो. आणि आपण सगळे एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कॊनि या उक्तीप्रमाणे पुढील शिव्या खायला आपण सज्ज होतो😜😜
थोडक्यात आपण निष्काम कर्मयोगी होणेकडे वाटचाल करत राहतो. शेवटी 'ठेवली तैसे अनंते राहावे चित्ती असू द्यावे समाधान 'याप्रमाणे 'जसे जुळतील तसे सांगावे आकडे, साध्यपूर्तता असू द्यावी गोपनीय' हेच बैठकीचे अंतिम सत्य समजते.
इति आढावा बैठक कथा सफळ सम्पूर्ण...
- हभप श्रीमती सोनाली ताई घुले मांजरीकर
( कृपया किर्तनासाठी whatapp क्रमांकावर संपर्क साधावा)
Comments
Post a Comment