थडग्यावरची पाटी*
*लेख : थडग्यावरची पाटी*
*लेखक : राजेंद्र वैशंपायन*
काही दिवसांपूर्वी मला एका स्नेह्यांनी एक फोटो पाठवला. एका थडग्याचा फोटो होता तो. सर्वसाधारणच थडगं होतं ते पण एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट त्यात होती जी मला भावली ती म्हणजे त्या थडग्यावर असलेल्या संगमरवरी पाटीवरील, कोरलेली दोन वाक्य.
ती वाक्य होती
मै अहम था । वही वहम था ।।
याचा अर्थ असा की मी स्वतःला खूप महत्वाचा किंवा मौल्यवान समजत होतो पण तोच माझा गैरसमज होता.
ती दोन वाक्य मला खोल विचारसागरात घेऊन गेली.
आपल्याशिवाय कुणाचं काहीही अडत नाही याची पहिली चाहूल मला मी पहिली नोकरी बदलली तेव्हा लागली. राजीनामा देताना मनात वाटलं होतं की " मी असताना माझी किंमत नाहीये, पण सोडून गेलो ना, की कळेल माझ्याशिवाय किती अडतं ते !!" पण तसं खरंच अडलं का कुणाचं? अजिबात नाही. मी नसण्यामुळे अगदी अल्प काळ गैरसोय झाली असेल फार तर, पण अडलं कुणाचं खेटर सुद्धा नाही. पण या प्रसंगामुळे माझ्याबाबतीत मात्र स्वतःविषयीच्या माझ्या एक मोट्ठ्या गैरसमजाला सुरुंग लागला होता. जीवनाच्या या कटूसत्याशी माझी पहिली ओळख झाली होती. "मै अहम था । वही वहम था ।।" हे पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवलं होतं.
खरंच ! आपलं महत्व आपणच केवढं वाढवून ठेवतो नाही ! आपल्याला उगाच वाटत असतं की आपण आहोत म्हणून चाललंय, आपण नसतो तर, आपल्या कुटुंबीयांचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं, आपण जिथे नोकरीला आहोत त्या कंपनीचं, आपल्या उद्योगाचं, आपल्या व्यवसायातील आपल्या अशिलांचं, आपल्या सभोवती असणाऱ्या आपल्या समाजाचं किती अडेल!! पण खरंच असं अडत असतं का?
आयुष्यात अनेक वळणं आली आणि त्या प्रत्येक वळणावर हेच सत्य वारंवार सिद्ध होत गेलं की आपल्याशिवाय कुणाचं काहीही अडत नाही. हा! गैरसोय होईल, आठवण येईल आणि राहीलही एक वेळ, पण अडणार मात्र कुणाचंच नाही. आणि खरं तर असं अडून चालणारही नाही. उलट, उद्योगजगतात एखादा उद्योग हा उद्योजकाच्या दैनंदिन उपस्थितीशिवाय जर उत्तम चालत असेल तर त्या उद्योजकाला यशस्वी उद्योजक म्हणतात.
कविश्रेष्ठ भा. रा. तांब्यांची एक कविता आमच्या शालेय जीवनात मराठीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून होती. त्याचं एक सुंदर हृदयस्पर्शी गाणंही झालेलं आहे. ती कविता अशी;
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय।।धृ ।।
सूर्य तळपतील चंद्र झळकतील।
तारे अपुला क्रम आचरतील।।
असेच वारे पुढे वाहतील।
होईल कांहिं का अंतराय।।१।।
मेघ वर्षतील शेतें पिकतील।
गर्वानें या नद्या वाहतील।।
कुणा काळजी कीं न उमटतील।
पुन्हा तटावर हेच पाय।।२।।
सगे सोयरे डोळे पुसतील।
पुन्हा आपल्या कामी लागतील।।
उठतील बसतील हसुनि खिदळतील।
मी जातां त्यांचें काय जाय।।३।।
राम कृष्णही आले गेले।
तयां विना हे जग ना अडले।।
कुणीं सदोदित सूतक धरिलें।
मग काय अटकलें मजशिवाय।।४।।
अशा जगास्तव काय कुढावें ।
मोहिं कुणाच्या कां गुंतावें।।
हरिदूता कां विन्मुख व्हावें ।
कां जिरवुं नये शांतींत काय।।५।।
शालेय जीवनात ही कविता अभ्यासक्रमात देण्यामागे मराठी माध्यमिक शिक्षण मंडळाचा काय उद्देश होता ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. परीक्षेसाठी संदर्भासहित स्पष्टीकरण किंवा रसग्रहण आणि त्याचे १० मार्क यापलीकडे त्या कवितेचा आमच्या बालजीवनात काही संदर्भही नव्हता आणि स्पष्टीकरणातील खोली समजण्याचं ते वयही नव्हतं. त्याकाळी अतिशय निरस वाटणाऱ्या त्या कवितेचं आम्ही घोकंपट्टी केलेलं रसग्रहण उत्तरपत्रिकेत लिहून येणे आणि मार्क मिळवणे, यापलीकडे या कवितेत आम्हाला त्यावेळी तसाही रस नव्हता. पण वाढत्या वयाबरोबर, अनुभवांबरोबर, जगात वावरताना या कवितेचे संदर्भही लागत गेले, स्पष्टीकरणं उमजत गेली आणि अनुभवाच्या पातळीवर रसास्वादही घेतला.
खरं तर या कवितेतील ध्रुवपद धरून पहिली चार कडवी "मै अहम था । वही वहम था ।।" हेच सत्य आपल्याला अधिक प्रकर्षाने समजावून देतात. पण पाचवं कडवं एक अशेचा किरण देऊन जातं. आणि त्यातल्या त्यात "मोही कुणाच्या का गुंतावे" हा कवितेतला खरा अर्थबोध आपल्याला देऊन जातं. अर्थात यात आधी मला खूप नकारात्मकता वाटली आणि अशा कविता वाचून प्रश्नही पडला की असं निर्मोही जीवन जगणं निरस नाही का होणार? निर्मोही असूनही आनंदी कसं राहता येईल? अलिप्त असूनही रसपूर्ण कसं जगता येईल?
याचं उत्तर मिळालं भगवद्गीतेत. अलिप्त असूनही जीवन रसमय असणं, निर्मोही बनूनही कर्मरत असणं, जीवनाचं सत्य जाणून अंतिम ध्येयापर्यंत जाताना घडणारा जीवन नावाचा प्रवास त्या त्या जन्मात आनंदाने स्वधर्मकर्मरत राहून निरपेक्षपणे करत राहणं हे खरं अंतिम सत्य हे उमगलं. भगवद्गीता हाच जीवनाचा संदर्भ आणि भगवद्गीता हेच स्पष्टीकरणही. मग कविश्रेष्ठ भा. रा. तांबे यांच्या त्या कवितेतील "हरिदूता का विन्मुख व्हावे। कां जिरवुं नये शांतींत काय" या शेवटच्या दोन काव्यपंक्तींचा खऱ्या अर्थाने रसास्वाद गीतेच्या प्रकाशातच आपल्याला घेता येईल असं लक्षात आलं. ईश्वरकृपेने श्रीमद भगवद्गीता आचारण्याची प्रेरणा मिळून त्या दिशेने काही थोडी प्रगती जरी या आयुष्यात जमली तरच हे आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणता येईल हे उमगलं.
मग एक स्वतःलाच गम्मत म्हणून प्रश्न केला. केवळ एक कल्पना म्हणून, माझ्या थडग्यावर ओळी लिहायच्या असतील तर त्या काय असतील?
मला सुचलं, त्या ओळी असतील;
मै अहम था, वही वहम था ।
इस जिंदगी में इतना समझ आया।
हे ईश्वर! ये तेराही रहम था ।
राजेंद्र वैशंपायन
Comments
Post a Comment