आम्ही मध्यमवर्गीय
"आम्ही मध्यमवर्गीय"
साधारण 20-25 वर्षा पूर्वी ' मध्यमवर्गीय ' ही जमात अस्तित्त्वात होती. तसं संपूर्ण भारतभर ती पसरली होती.. पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड ' होता.
घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंड, नवरा बायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती...एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6.. हे चित्र सगळीकडे सारखचं होत...काही ठिकाणी महिला वर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता.. पण आजच्या इतका नाही..म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्री वर्गाची सत्ता होती,एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःच एक गणित होतं, पक्क गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.. अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता..माझी आजी नेहमी म्हणायची,"खावून माजावं, पण टाकून माजू नये.."
कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायच,आंब्याचा रस असेल तर भाजी कमी लागते, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्या तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची.. घरातली माणसांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलं सुरल त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमा गरम पिठलं असायचं... इतकही करून पोळी भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा ' कुचाकरा ' किंवा 'फोडणीचा भात'.जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे.. आता सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न मिटला.
मुलाची शाळा म्हणजे 'टेन्शन'चा विषय नव्हता.
आपली साधी मराठी शाळा.. 200-300 रू वर्षाची फी.. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे... जरा मोठा धाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा..
पुस्तकांचा जरा ' जुगाड ' असायचा.. म्हणजे समजा 'अ' ने कोरे करकरीत दुकानातून पुस्तकं विकत घेतले असतील, तर तो ती पुस्तकं 'ब' ला 70% नी विकायचा.. अन् मग 'ब' तिचं पुस्तके 'क' ला 40% विकायचा..
ती चेन ठरलेली होती..Purchase Cost ,Selling Cost, Depressiated Value.. हे कामापुरत ' अर्थशास्त्र ' सगळ्यांनाच येत होतं.ह्या पुस्तकाच्या 3 वर्षाच्या प्रवासात.. कधी कधी बेगम हजारत महल,अहिल्याबाई अशा दूरदृष्टी च्या व्यक्तिमत्त्वाला चष्मा काढलेला असायचा..कोणाला दागिने घाल,दाढी मिशी काढ, असा उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.
बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची.पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला Back Water अशी Destanations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाही..
पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा 'अ' करून मोकळा व्हायचा... म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त 'चित्रकलेत स्कोप' होता.
त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पाना पाना वर यायचा...
युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागतही नसत.. मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं, दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ' इगो बिगो' कोणाचा आड येत नव्हता..
स्वेटर चा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मुळ मालक कोण हेही कोणाला अठवायच नाही..
पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. यंदा नापास झाला किंवा कमी मार्क्स मिळाले तर मुलींना, "तुझ लग्न लावून देवू.." आणि मुलांना, "तुला चालवायला रिक्षा घेवून देवू.." अशी ' जागतिक ' धमकी मिळायची..
12 वी नंतर कुठल्या शाखे कडे जायचं , कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली ठिकाण..Proposals.. ही आजच्या काळातली Highly Personal Issues त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिल्या जात.. हातपाय पसरायला लागते तेवढी च काय ती प्रत्येका ला घरात Space.. बाकी सगळा 'लेकुरवाळा' कारभार...
आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा 'बाबा' लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांनी 4-5 RD,LIC काढलेल्याच असायच्या.. आणि बऱ्याच वेळा त्या एजंट वरील प्रेमापोटी.. बाकी शेअर्स,Mutual Fund चा 'एजंट' त्या काळी काही उदयाला आला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याचं, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशन ला सुरुंग लागायचा... Share market म्हणजे जुगार.. हा 'समज' अगदी पक्का होता..
' फॅमिली डॉक्टर' हा एक जिव्हाळ्याचा विषय होता.. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा.. आजीच्या दम्या पासून ते बाळाच्या तापा पर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषधं असायचे.. तस ते डॉक्टर पण 'नीतिमत्ता' वैगेरे बाळगून होते.. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया, पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा 'व्यवहारिक' पवित्रा असायचा..
जसा 'फॅमिली डॉक्टर' तशीच एक फॅमिली 'बोहारीण' पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही 'बोहारिण' एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोड Vurses चहा गाळणी अशी 'तहा' ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा.. खूप घासाघीस करून 'Deal' चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..
खरं सांगू का.. मध्यमवर्गीय ही काय 'परिस्थिती' नाही, ती ' वृत्ती ' आहे.. साध्या, सरळ, कुटुंबवत्सल,पापभिरू माणसांची..मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा 'कणा'.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित 'कर' भरणारे,वाहतुकीचे काटेकोर 'नियम' पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत 'मतदान' करणारे.
असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच,' वादळ ' झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीय पण.. प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक आम्ही, अचानक 'प्रोफेशनल' झालो.माणसा माणसातलं आपलेपण कोरड झालं, कालांतराने ते भेगाळलं, पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule,Deadlines, Projects Go Live अश्या 'गोंडस' नावाखाली आम्ही ते स्वीकारलं..
गलेलठ्ठ Package मध्ये गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा..
#आम्हीमध्यमवर्गीय#
Comments
Post a Comment