भोगातूनच त्याग घडतो

दिनांक: २६ /०९ /२०२०
*१५९. अभंग क्र. ९३*

*भोगें घडे त्याग ।*
*त्यागें अंगा येती भोग ।।१।।*
*ऐसें उफराटें वर्म ।*
*धर्मा अंगी अधर्म ।।२।।*
*देव अंतरे तें पाप ।*
*खोटे उगवा संकल्प  ।।३।।*
*तुका म्हणे भीड खोटी।*
*लाभ विचाराच्या पोटीं ।।४।।*

        भोगातूनच त्याग घडतो, त्यागातून भोग मिळतो. असं हे उफराटं वर्म आहे. धर्मातच अधर्म सामावलेला आहे. ज्याने देव अंतरतो ते पाप असतं, त्या खोट्या संकल्पना मनातून काढून टाका. तुकाराम महाराज म्हणतात भीड खोटी असते म्हणजे भीडेपायी नुकसान होतं, विचार केला तरच त्यातून लाभ होतो.
             भोगातून त्याग होतो आणि त्यागातूनच भोग भोगायला मिळतो ही कल्पनाच अफलातून आहे. समजायला कठीण आहे. पण उदाहरणातून समजू शकेल अशी आहे. 
          उपभोग म्हटला की पंचेंन्द्रियांमार्फत घेतले जाणारे अनुभव आपल्या डोळ्यासमोर येतात. डोळ्यांनी आपण द्रूष्टीसुख घेतो. कानाने श्रवणसुख मिळतं. त्वचा स्पर्शसुखाचा अनुभव देते. रसनेच्या माध्यमातून चवीचा उपभोग घेता येतो. नाकाने गंधोपभोग घेतला जातो. संत ज्ञानदेवांनी आपल्या काव्यात हे सर्व गुंफले आहेत.
       ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात मराठीचं गुणवर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
सहजे शब्दु तरी विषो हा श्रवणाचा । परी रसना म्हणे रसु हा आमुचा ।।
घ्राणासी भावो हा जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।
नवल देखिता रेखेचि वहाणी ।
देखतां डोळ्यांची पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी ।रुपा ची ।
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथे मनची लागे धांवे ।
बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ।।
    पंचोपद्रीयांनी अनुभवायच्या पलिकडचेही भोग असतात. हे भोग त्यागातूनच घेतले जातात. 
         छत्रपती शिवरायांना राज्याचे उपभोगशून्य स्वामी म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, राज्याभिषेकाला होणारा विरोध झुगारून ते अभिषिक्त राजेही झाले. राजा म्हणून सर्व अधिकार त्यांनी उपभोगले, पण ते रयतेच्या हितासाठीच ! शिवरायांनी अधिकार मन मानेल त्या पद्धतीने वापरले नाहीत. इतरांवर जुलुम करुन आपली धनदौलत, खजिना वाढवण्यासाठी वापरले नाहीत. तर जनतेला सुखी, सम्रूद्ध, सुरक्षित जीवन जगता यावं यासाठी वापरले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही असा आदेश शिवरायांनी आपल्या सैन्याला दिला. शिवरायांनी अनेक युद्धे केली, दक्षिण दिग्विजय केला, पण स्वराज्याच्या सैन्याने कधीही उभ्या पिकात घोडे घातले नाहीत. शेतकऱ्यांचं नुकसान केलं नाही. शिवराय रयतेचे मायबाप बनले. भोगातच त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! 
        असंच दुसरं उदाहरण आहे महाराजा सयाजीराव गायकवाडांचं ! महाराजा सयाजीराव उत्कृष्ट प्रशासक होते.  त्यांनी अचूक धोरणं आखून राज्यातल्या उद्योगधंद्यांना चालना दिली. शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयाचा थकीत शेतसारा माफ केला. राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढवला. यातून त्यांनी केदारनाथपासून कन्याकुमारीपर्यंतच्या अनेक संस्थांना सढळ हाताने मदत केली. आपल्या राज्यात अडीच हजार शाळा काढल्या. अस्पृश्यांसाठी तीनशे शाळा काढल्या. उर्दू शाळा काढल्या. आदिवासींसाठी आश्रमशाळा काढल्या. गोरगरीबांच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून 'कमवा शिका' योजना काढली. स्त्रीशिक्षणासाठी खास प्रयत्न केले. उच्च शिक्षणासाठी अनेकांना मदत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तर आपलेच नियम बाजूला ठेऊन तीन वेळा शिष्यवृत्ती दिली. महर्षी शिंदे यांना आधीची शिष्यवृत्ती माफ करुन "सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास" करण्यास परदेशात जाण्यासाठी पुन्हा शिष्यवृत्ती दिली. १९१२ साली त्यांच्या राज्यातले शिक्षणयोग्य वयोगटातले ९८% मुलं आणि ८६% मुली शिक्षण घेत होत्या. असं असूनही महाराज किती साधे रहात ते एका प्रसंगातून दिसून येतं. चौथ्या जाँर्जच्या राज्याभिषेक प्रसंगी सर्व संस्थानिकांना बोलावलं म्हणून महाराज आपल्या महाराणींसह इंग्लंडला गेले होते. रात्री राजभोजनासाठी आमंत्रण होतं म्हणून ते निघाले, तर महाराणी म्हणाल्या आज तरी चांगले कपडे घाला..तुम्ही साधे कपडे वापरतात त्यामुळे आम्हालाही साधेच कपडे वापरावे लागतात. त्यामुळे इतर संस्थानिकांच्या बायका मला हसतात. सयाजीराव म्हणाले नाहीतरी तिथे सर्व लाचारच जमतात. जाऊ द्या मी निरोप पाठवतो, माझी तब्येत बरी नाही म्हणून.. 
        *राजपद, राजाचे अधिकार भोगूनही त्यागी जीवन कसं जगलं जातं त्याची ही दोन आदर्श उदाहरणं आहेत.* अशी माणसं जो त्याग करतात त्यातून त्यांना जे अधिकार प्राप्त होतात, जे सामर्थ्य प्राप्त होतं, त्यांना समाजात जे स्थान प्राप्त होतं, त्यातून आपोआप सर्व भोग त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहतात. सत्ता, संपत्ती प्रतिष्ठा त्यांच्याकडे चालत येतात. ते मानसन्मानाचे, आदराचे धनी होतात. "भोगे घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ।।".  भोग घ
भोगता त्याग व्हावा आणि त्याग करता भोगाचा अनुभव यावा असं हे उफराटंच घडतं. थणू धर्म करायला जावा आणि अधर्म घडावा तसं हे आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. अशावेळी योग्य, अयोग्य कसं ठरवायचं ? पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं ? तुकाराम महाराज सांगतात, *"देव अंतरे तें पाप!"* ज्यामुळे देव आपल्याला अंतरतो ते पाप समजावं. देव कशाने अंतरतो ? *"पाप ते परपीडा ।"* दुसऱ्याला पीडा दिल्याने देव अंतरतो. जेंव्हा आपण अनीतीने वागतो, व्यभिचार करतो, दुसऱ्याला फसवतो, लुबाडतो, अपमानित करतो तेंव्हा देव अंतरतो. 
      *खोटे संकल्प कराल तर त्यातून पाप उगवेल. त्यागी म्हणवून प्रत्यक्षात सर्व भोग भोगणं म्हणजे धर्माच्या नावावर अधर्म करणं. धर्माच्या नावाखाली खोट्या गोष्टींचा प्रचार कळणं, कर्मकांड प्रसरवणं, अंधश्रद्धा पसरवणं, धर्माच्या नावाखाली हिंसा, द्वेष पसरवणं, धर्मयुद्ध वा जिहादच्या नावाखाली अमानुष वर्तन करणं म्हणजे धर्मा अंगी अधर्म ह़य. भले धर्माच्या नावाखाली हे सर्व सुरु असलं तरी तो अधर्मच असतो. जो धर्म हिंसा करायला, हत्या करायला, इतरांचे जीव घ्यायला, जाळपोळ, लुटालूट करायला प्रवृत्त करतो तो अधर्मच असतो. माणसामाणसात भेद पहाणं, भेद करणं हा अधर्म आहे. जगात धर्माच्या नावाखाली जितकी हिंसा झाली तितकी क्वचितच दुसऱ्या कारणावरुन झाली असेल. पुष्यमित्र शुंगाने केलेल्या बौद्धांच्या कत्तली, जैन मुनींच्या हत्या, युरोपातली ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम दशवार्षिक लढाई, आजही धुमसत असलेला गाझा पट्टीचा संघर्ष अशी असंख्य उदाहरणं देता येतील. ज्याला धर्म म्हटलं गेलं त्याच्या अंगीच अधर्म कसा वाढतो ते भारतात गेल्या काही दिवसांपासून पहातो आहोतच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "भीडेपोटी नुकसानच होतं, विचार केला तरच लाभ होतो. माणसाला त्याचा आतला आवाज, सद्सद्विवेक इशारा देत असतो.  पण माणूस भीडेपोटी आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष देत नाही. आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत, त्यांना नाही कसं म्हणायचं ? विरोध कसा करायचा. वेगळं मत कसं मांडायचं. बहुमताच्या विरोधात कसं जायचं ? पण अशा कसोटीच्या वेळी कसं वागायचं ते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे. "नाही भीडभार । तुका म्हणे सान थोर ।" किंवा "सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेलें नाही बहुमता।।" इतक्या स्पष्ट शब्दात जगद्गुरू तुकाराम महाराज सत्याचाच पाठपुरावा करायला सांगतात. विचार  करायला सांगतात. कोणतीही गोष्ट कोणी सांगतो म्हणून करु नका. सगळेच तसं करतात म्हणून करु नका. तशी रुढी आहे म्हणून करु नका. लोक काय म्हणतील या विचाराने करु नका. तर ती तुम्च्या बुद्धीला पटली तरच करा. योग्य वाटली तरच करा. नैतिक असेल तरच करा. कोणत्याही गोष्टीचा स्विकार विचारपूर्वकच केला पाहिजे, कोणत्याही गोष्टीला नकारसुद्धा  विचारपूर्वकच दिला पाहिजे. थोडक्यात आपला सद्सद्विवेक सदैव जागा हवा. जगद्गुरू तुकाराम महाराज असे पावला पावलांवर आपल्याला मार्गदर्शन करतात. हात धरुन चालवतात. मार्ग दाखवतात. अंधश्रद्धा सोडू, गतानुगतिकता सोडू आणि विवेकाची कास धरु !*
   
*जय जगद्गुरू 

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार