ते दिवस
*ते दिवस....!*
पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.पण यामध्ये 'सरस्वति नाराज न होवो' हा पापभिरुपणा पण असायचा. अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं
पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता.
कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा.
आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती.
शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा 'ईगो' कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की 'चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा 'आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले' म्हणून...
आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला 'आय लव यू' म्हणणं माहीतच नव्हतं.
आज आम्ही असंख्य टक्के टोणपे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंय तर काही काय माहीती, कुठे हरवलेत ते? आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवातच वाढलो...
कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही मूर्खच राहिलो. आपल्या नशिबाला कबूल करून आम्ही आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही.
आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आम्ही एक 'जमाना' होतो हे मात्र नक्की...
काश...ते दिवस पुन्हा येतील?
Comments
Post a Comment