आसपासच्या मंथरा
_*आसपासच्या मंथरा*_
_*.. प्रवीण दवणे*_
मंथरा ही रामायणातील केवळ एक व्यक्तिरेखा नाही. ती एक प्रवृत्ती आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात मंथरा वावरत असतात. आपल्या हिताचा आव आणून त्या अशा काही आपल्या कानात आणि मग मनात शिरतात , की असं वाटतं यांच्याशिवाय आपला तरणोपाय नाही. अन् मग हलके हलके सारं अस्तित्वच त्या ताब्यात घेतात. आपल्या निर्णयाच्या त्या सूत्रधार होतात. हळूहळू घराला पडणारे तडे, जवळच्या नातलगांची होणारी भांडणं हाच या मंथरांचा चारा असतो. तो खाऊन त्या तृप्त होतात.मस्त होतात. *मंथरा कोण , हे वेळीच कळून , त्यांना कानात शिरणारी वळवळणारी गोम जशी चपलेनं ठेचतात , तसं वेळीच ठेचून टाकता यायला हवं.* आपल्या आसपास या मंथरांची छाया पडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.आपल्या घरातले सर्व कुटुंब - घटक हे कितीही मतभेद असले , तरी इतरांनी काडी टाकल्यावरही अभेद्य असले तर आपल्या एकतेच्या भिंतीवर नांगी आपटून निष्प्रभ होतात. _*मंथरा सर्वत्र असतात. क्वचित ती आपल्यातूनही जागी होते.*_ इतरांचे आनंद सोहळे नष्ट करते .रामायण घडतं ते मंथरेमुळेच !
ते पुरणातालं काय न् या क्षणीचं काय , वनवास प्रत्येकाच्या नशिबी येतो . कधी वनातला , कधी राजवाड्यातल्या एकाकीपणाचा . तोही वनवासच ! तिकडे लक्ष्मण वनात एकाकी , इकडे ऊर्मिला राजवाड्यात ! वनवासातच !
घरात अपरिहार्य कारणानं नोकर ठेवावे लागतात. या नोकरांनी आपल्याला जपण्या ऐवजी आपणच त्यांना जपत असतो.काहीवेळा त्यांना जपण्याचा इतका अतिरेक होतो , की तो नोकरच स्वतःला समजून बसतो. . गरजू माणसाच्या साऱ्या किल्ल्या आपल्या कमरेला असल्यासारखा त्याचा वावर सुरू होतो. धूर्त नोकरांना हे समजून चुकते की , घरातल्या बिझी लोकांना आपली अधिक गरज आहे . आपण एखादे दिवशी दांडी मारली की त्यांचा सारा दिवस कसा डळमळून जातो , हे ही मंडळी जाणून असतात. काही मोजके अपवाद वगळले तर घरातील अनेक भांडणे घडविण्यात ही मंडळी आघाडीवर असतात. संशयाची एक हलकी रेघ निर्माण करून पुन्हा ही मंडळी अलिप्त असण्याचं नाटक करतात. त्या रेघेचीच पुढे दरी होते. आधी मनं कलुषित करायची , न् साऱ्या घरादरात भांडणं निर्माण करायची , हे यांचे विकृत धंदे असतात.
*फार प्रेमानं , आपुलकीनं मंथरा वावरतात . इतक्या की , त्यांच्या हातात ठिणगी आहे , हे पेट घेतल्यावरही कळत नाही.*
घरात घडलेला एक प्रसंग . वडील कपड्यांच्या घड्या करीत होते.झालं ! घरातल्या कामवाल्या बाईला आयतंच निमित्त मिळालं.
" कमाल आहे . तुम्ही घड्या करता?"
" हो . का हो ? "
" तुमचं वय काय? तब्येत काय ? एवढा साधा विचार सूनबाईनं करायला नको ? हे असंच असतं हो . आमचे सासरे एवढे कडक ! इकडची काडी तिकडे करणार नाहीत. पण तुमच्या वयाकडे तरी वहिनींनी बघायला हवं होतं ."
वडिलांना क्षणात कळलं - मंथरा डोकं वर काढतेय. ते शांतपणे म्हणाले , " काय हो , तुम्हाला या घरात कशासाठी नेमलंय ?"
ती बघतच राहिली असावी.
" भांडी - धुणी करायला. "
" हो ना ? मग तेवढी करायची, न् इथून सटकायचं . महिन्याचा पगार त्याबद्दल देतो आम्ही तुम्हाला. हे घर माझं आहे . या घरात मी कपड्याच्या घड्या घालीन , झाडून काढीन , लादी धुवीन , झोपीन , उठीन - काय हवं ते करीन . तुम्ही आमच्यात भेद का निर्माण करता ?"
" मी तुमच्याच भल्यासाठी बोलले ना ? "
" मंथरेनंही कैकयीचं भलंच चिंतिलं होतं .भरत गेला होता मामाकडे , तीनच कैकयीला सुचवलं - ' राणीसाहेब , उरलेले दोन वर मागा दशरथ महाराजांकडे . हीच संधी आली आहे. - भरताला राज्याभिषेक करून घ्यायची. एकदा का कौसल्याराणीचा राम गादीवर बसला, की जन्मभर भरताला संधी नाही. बघा राणीसाहेब , तुमच्या भल्याचं म्हणून सांगते. माझं काही म्हणणं नाही हो !' हे बघा मावशीबाई , या मंथरेनंच रामायण घडवलं. कैकयीच्या मनात कोसल्येचा , रामाचा द्वेष निर्माण करून ! तेव्हा पुन्हा या घरात असा विघट करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहितेय - ती दोघं पहाटेची गाडी पकडायची म्हणून घाईनं गेलेत . त्यात गजर झाला नाही घड्याळाचा. तारांबळ झाली. हा पसारा दोन दिवस तसाच ठेवणार का ? अवराला मी , तर त्यात त्यांनी त्रास देण्याचा प्रश्न कुठे आहे ?"
वडिलांनी ही हकीकत नगरहून मी व पत्नी आल्यानंतर मुद्दाम सांगितली. ऊर अभिमानानं भरून आला. घरात _*केव्हातरी मतभेद होतात, पण ते आपल्यातले आपल्यातच विरून जावेत.*_ बाहेरच्याला तोंड खुपसायची एकदा का संधी दिली , की त्यांनी साऱ्या घराची मनःशांती खाल्लीच समजा.
लग्नानंतरच्या पंधरा - वीस दिवसांतले दोन प्रसंग असेच बोलके . माझी बायको आसपास नाही असं पाहून मित्रमहाशय माझ्या आईच्या कानाजवळ झुकून म्हणाले , " कशी आहे नवी सून ?"
आईकडून सूनेविरुद्ध काही आंबट - गोड मजकूर मिळतोय का , याचा वेध मित्रात दडलेली मंथरा घेत होती . माझ्या आईला या मंथरेची चाहूल लागली. तीनं एकदम हाक मारली , " अगं प्रज्ञा , हा बघ काय विचारतोय ..." मित्राची जी बोबडी वळलेय ! *सासू - सूनांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम अनेकदा वेगवेगळ्या रुपातल्या मंत्रा करतात.* केव्हा या मंथरा शेजारणीच्या रुपात प्रकट होतात . आईच्या हातातली भाजीची पिशवी पाहून शेजार - मंथरा फुत्कारली -
" काय हो तुमचे हाल ! सून माहेरी न् तुम्हाला अशी भाजी आणावी लागते . खरंच आजकालच्या..."
" थांबा थांबा - "
" काय हो ? "
" भाजी मी आणतेय . जिना मी चढतेय . दमतेय मी. पण तुम्हाला एवढा त्रास का होतोय ?"
" आता सून आली तरीही हे तुम्हीच करायचं ? तिनं माहेरी राहायचं . तुम्हाला कसं काहीच वाटत नाही ? "
" माझ्या मुली नाही का येतात माहेरी ? तशी ती गेलेय् दोन दिवस माहेरी . आईची ओढ कुठल्याही मुलीला असतेच .ती आल्यावर तिला सांगतेच तुम्ही किती काळजी घेता माझी ते ."
" नको नको . मी आपलं सहज.."
" सहज ? पण यामुळेच सासू वेगळी पडते सूनेपासून ."
आईने जेव्हा ही हकीकत सांगितली , तेव्हा आम्ही खूप हसलो. सुनेलाही त्यातून नव्या वाटेचे समजूतदार धडे मिळाले.
कुठल्याही ऑफिसमध्ये अशी एखाद दुसरी मंथरा असतेच . साहेबाच्या विश्र्वासातली... मुख्याध्यापकांच्या वर्तुळातली . बॉसच्या अगदी जवळची मंथरा 'मोस्ट ओबिडियंट ' असल्याचा गणवेश करून इतरांना 'कामचुकार' ठरवण्याचा सातत्याने , शिताफीने प्रयत्न करीत असते. धूर्त वरिष्ठ या मंथरांचा उपयोग करून घेतात. त्यांना सगळे एकत्र नकोच असतात. ' डिव्हाइड अॅण्ड रूल ' करणाऱ्यांना हे आपल्या मधीलच मंथरेच्या रूपातील सहकारी मजकूर पुरवत असतात. - ' साहेब हे बघा , तुम्ही थांबता रात्री आठ पर्यंत. अन् सगळा स्टाफ जातो पाचलाच . एकालाही वाटत नाही - साहेब आहेत तोपर्यंत थांबावं .." किंवा " सर , धडपड तुम्ही करताय , श्रेय तिला जाणार. आदर्श शिक्षिकेचं शिफारस पत्र देताय खरं , पण याच बाईनं जनगणनेच्या कामाबद्दल नाराजी दाखवलेली आठवते ना ? "
झालं ! स्वतंत्र विचार न करणारा वरिष्ठ पेनला टोपण लावून टाकतो. किंवा ' सर , त्याच्या एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटिज वाढल्यात. नाव त्यांचं होतं . कॉलेजला काय उपयोग ? अशी शिफ्ट त्याला द्या , की धड सकाळी काही करू शकणार नाही की संध्याकाळी ! शेवटी सर कॉलेज महत्वाचं नै का ? "
फाईल उगीच मागे - पुढे करताना एखादी ' मंथरा ' बोलते - " एखाद दिवशी लवकर ठीक आहे , पण नेहमीच कसा यांचा मुलगा आजारी ? बाहेर दुसरे धंदे
असणार - "
साहेबाला स्टाफवर वेगळी ' नजर ठेवावीच लागत नाही . काडीचा फायदा ज्यांना नाही , नव्या पैशाचा लाभ नाही , पण अशी सारखी कळ लावून दुही निर्माण करणं , हाच उद्योग अनेकदा कित्येक ' मंथरा '
करीत असतात. बरं , या मंथरांचं दुसरं वैशिष्ट्य हे की , ज्यांची मानसिक शांतता खाऊन टाकली , त्यांच्या बरोबरही खाऊन - पिऊन , गोड बोलून नातं जोडलेलं ठेवतात. तुमच्याच पैशाचा वडा - सांबार खात , एकीकडे तुमचंच वाटोळं करीत , पुन्हा तुमच्याच हिताचा आव आणत , साहेब कसा तुमच्यावर अन्याय करतो , हे या मंथरा सांगत असतात.
_*मंथरा या असणारच . जगाच्या अंतापर्यंत असणारच.*_
जो कामात निष्णात , आपल्या व्यवसायात व्यासंगी , कर्तुत्वाने संपन्न आहे,अशाला ही 'मंथरा' गिरी करावीच लागत नाही . पण वेळ न पाळणारे , आळशी , व्यसनी , स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्र्वास डळमळलेले , लाचार , कणाशून्य , भ्रष्ट मार्गाने चार पैसे मिळवणारे , जीवनाचा परिघच न उमजलेले असे पोकळ न्यूनगंडी आत्मेच पुढे मंथरा होतात. ध्यानात ठेवा - अशा मंथरा आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत. *फक्त आपण आपल्या नेमलेल्या कामात नेक हवं ! सरळ हवं ! तेच आपलं बळ ! तेच आपलं भविष्य !*
_*लेखक :*
*कवी प्रवीण दवणे*_
*संकलन :*
*मार्तंड औघडे*
_*साभार : सावर रे*_
*(भाग२)*
*दि. ३ एप्रिल २०२०*
Comments
Post a Comment