जगण्यातली सहजता
*बिर्याणी*
अतिशय चवदार बिर्याणी बनवली आहे. तुम्हाला असे सांगितले की उच्च प्रतीचा तांदूळ वापरला आहे. बिर्याणी तयार झाली शंभर लोकांना वाढली. बिर्याणीचा स्वाद आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले. प्रत्येकाने पहिला घास हातात घेतला आणि तोंडात घालणार तोच शेफने येऊन सांगितले यात एक गारेचा एक खडा पडलाय आणि तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कुणाला येई हे सांगता येणार नाही. काळजी घ्या कुणाच्या दाढेखाली आला तर ईजा होऊ शकते म्हणून सांगितले. आता बिर्याणीचा स्वाद चांगला आहे चव उत्तम आहे. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येक घास गणिक चवीकडे लक्ष न जाता घास सावकाश खाल्ला जातोय न जाणो खडा याच घासला आपल्यालाच आला तर काय घ्या. आता सगळ्यांच्या जेवणातली मजा गेली. जो तो सावध झाल्याने गप्पा गोष्टी विनोद काहीही झाले नाही. सर्वांनी शेवटपर्यंत जेवण केले अगदी शेवटचा घास देखील सावधपणे घेतला. सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुस्कारा सोडला. हात धुतले तेव्हा कुणाच्या तरी लक्षात आले अरेच्चा कुणालाच खडा आला नाही. शेफला बोलावले त्याला विचारले तू तर म्हणाला होतास की खडा येईल तो म्हणाला मी काढले बहुतेक पण एखादा राहिला असेल असे वाटले म्हणून तुम्हाला सावध केलं. सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या बिर्याणीवर चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमलेले होते कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती.
जबड्याच्या हालचालीतली सहजता गेली होती म्हणून जेवण जेवणे कष्टदायी झाले होते.
तर मित्रांनो सांगायचे तात्पर्य सध्या कोरोनामुळे आपली अवस्था बिर्याणीतल्या खड्यासारखी झाली आहे.
कुणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही.
"जगण्यातील सहजता" गेली आहे.
अगदी मदत करणारा हात देखील कोरोनाचा असेल का, दूधवाला, भाजीवाला, किराणावाला जीवनावश्यक वस्तू देताना वस्तू बरोबर काय देईल याची शंका घेऊन जगतोय आपण.
माहीत नाही किती दिवस चालेल हे पण "जगण्यातली सहजता" किती महत्वाची आहे हे आता कळले....
😊 😊
Comments
Post a Comment