कोरोना एक आत्मानुभूती

कोरोना एक आत्मानुभूती... 
नाशिकचे विख्यात मानसशास्रतज्ञ- 
डॉ. शिरीष राजे यांचे मनोगत... 

काही वर्षांपूर्वी मी विपश्यनेला गेलो होतो. तेव्हा तीन दिवस तीन तप असावेत असं वाटलं होतं. तिथे कडकडून भेटणाऱ्या मौनांची जर भाषांतरं करायला गेलो तर शब्द सापडणार नाहीत इतकी किचकट त्यांची भाषा असते. तिथे जे मिळतं ती फक्त अनुभूती असते. तीन दिवस कोणाशीही काहीही न बोलता शांत राहाणं हे खूप कठीण. इथे शांत शब्द खरंतर चुकीचा आहे कारण, अंतर्मनात सुरू झालेली वादळं ही खूप जीवघेणी असतात. कोणाशी बोलायचं नाही.. कोणताही stimulus नाही.. ब्र देखील काढायचा नाही. पहिले दोन तास चांगले जातात Positive विचार करत करत. मग पुढचे तीन तास अवघडल्यासारखे. मग या पाच तासांनी मात्र संवाद सुरू होतो. आपला आपल्याशी! आनंद-दुःख, अस्तित् , घेतलेले निर्णय, जोडलेली-तोडलेली माणसं यांचा नव्याने विचार व्हायला लागतो. आपला जीवनपट आपण Bird Eye view ने बघायला लागतो. खूप गोष्टी accept करत जातो. मी मनात हजारो गाणी या तीन दिवसात गायली असतील.. कविता म्हंटल्या असतील.. गुलजार साब, सलील चौधरी, मजरूह सुल्तानपुरी, अमृता प्रीतम, कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, अरूणा ढेरे, बहिणाबाई, विंदा, इंदिरा संत सारे जण सोबतीला होते. प्रत्येक गाण्याची एखादी ओळ काळीज चिरत पुढे जायची. ग्रेसने एखादी खपली खरवडून काढली तर गुलजार साब हळूच फुंकर घालायचे. अश्रू हा एकमेव भावना व्यक्त करण्याचा मार्ग तेव्हा शिल्लक होता. अर्थात त्याच detoxification साठी मी तिथे आलेलो. त्या तीन दिवसानंतर मी एक वेगळा- मी होतो. शांत, प्रगल्भ, विचारी, संयमी... खूप जणांनी मी "पूर्वीसारखी राहीलो नाही !" असे शेरेही दिले. अर्थात मी "लोगोंका काम है कहना" हे आठवून स्मित केलं. मी या तीन दिवसात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकलो. ते म्हणजे 'इदं न मम्' ! इथे असलेलं काहीच हे माझं नाही. सगळं क्षणभंगूर आहे आणि आभासी आहे. 'जगत् मिथ्या' हे एकच सत्य. काही जणांना हा खूप नकारात्मक दृष्टिकोन वाटतो. पण, थोडं मनन केलं तर हा दृष्टिकोन मला अतिशय सकारात्मक वाटतो. ही सगळी उजळणी यासाठी कारण मला मागच्या काही दिवसांपासून बरेच फोन येत आहेत. आणि लॉकडाऊनमुळे एकंदरीत मानसिक स्वास्थ्य अस्थिर आहे, अस्वस्थ वाटतंय असा एकंदरीत तो मजकूर असतो. असं वाटणं चूक नाही. पण, ह्याच मनःस्थितीचा जर आपण अधिक सकारात्मक विचार केला तर, मला वाटतं आपण आपल्यातल्या खऱ्या स्वतःच्या जवळ येऊ.
दुपारी एका शुभार्थी (समुपदेशन हवे असलेल्यांना शुभार्थी संबोधतात) चा फोन आला. मोठ्या MNC मध्ये बऱ्यापैकी वरच्या हुद्द्यावर असलेला हा माणूस. Psychosomatic symptoms असल्याने माझ्याकडे यायला लागलेला. त्याच्या orthopedic surgeon ने पाठवलेलं. पाठ प्रचंड दुखते पण physically He was all fine. त्याने स्वतः कधी त्याला मानसिक त्रास होतोय हा विचारच केला नव्हता. कामाचा व्याप, बायको- मुलांना गृहीत धरणं, त्यामुळे कौटुंबिक अस्थिरता, excessive smoking, अवेळी जेवण, अपुरी झोप आणि पन्नाशीनंतर हे हे करणार असे हवेतले प्लॅन्स ! त्याच्या कामाने त्याला इतकं पोखरलेलं की सुरूवातीचे दोन/तीन सेशन्स मला रोबोट समोर बोलतोय असं वाटायचं. मला सेशन्समध्ये जिथे जिथे योग्य वाटेल तिथे तत्वज्ञान मांडायला आवडतं. मी हल्ली स्वतःला Clinical psychologist न संबोधता Holistic Psychologist म्हणायला लागलो आहे.
तर, मी याच पेशंटला अगदी शेवटच्याच one to one session मध्ये एक गोष्ट सांगितलेली. कदाचीत आपणासही ती ठाऊक असेल. 
"एक राजा असतो... त्याला चार बायका असतात. राजा मृत्यूशय्येवर आहे. पण त्याला मृत्यूचे भय आहे. तो त्याच्या चौथ्या बायकोला जिला त्याने नेहमी आभूषणांनी मढविलं तिला विचारतो, "तू माझ्यासोबत येशील का..."ती सांगते, "माझं आयुष्य मला प्रिय आहे.. मी येणार नाही." तो तिसऱ्या बायकोला विचारतो जिला त्याने नेहमी सगळीकडे फिरवलं असतं.. मिरवलं असतं. ती म्हणते. "मी येणार नाही. मी तर पुन्हा लग्न करायचंसुध्दा ठरवलंय.." राजाला वाईट वाटतं. तो त्याच्या दुसऱ्या बायकोला विचारतो, त्या दोघांनी खूप चांगले क्षण सोबत घालवले असतात. खूप निर्णय एकत्र घेतलेले असतात. त्याला वाटतं ती इथेही सोबत येईल. ती शांतपणे सांगते, "मला खरंच खूप दुःख होईल. मी तुमच्या अंतिम संस्कारांपर्यंत सगळं नीट करेन." 
तितक्यात पहिली बायको म्हणते, "मी येईन सोबत." राजा खजील होतो. तो म्हणतो, "मी तर कधी तुला महत्त्वही दिलं नाही. तरी तू सोबत यायला तयार झालीस...?" .. 
- तर आपण सगळे हा राजा आहोत. आणि आपल्याला या चार बायका आहेत. चौथी बायको म्हणजे आपलं शरीर. जे फक्त आभूषित करण्यात आपण धन्यता मांडतो. सौंदर्याच्या चुकीच्या व्याख्यांखाली आपण आपल्या स्वतःला विसरत जातो.  तिसरी बायको म्हणजे आपल्याकडे असलेल्या भौतिकवादी गोष्टी उदाहरणार्थ पैसा, घर, गाडी, सामाजिक - वैयक्तिक दर्जा. त्या आपण संपल्यावर दुसऱ्याकडे जातील. दुसरी बायको म्हणजे नातेवाईक आणि मित्रमंडळी. ते आयुष्यभर सोबत करतात. अगदी पिंडदान - श्राध्द घालतात. पण पहिली बायको म्हणजे आत्ममन. त्याला कोणी चैतन्य म्हणेल... कोणी जीवात्मा म्हणेल... माझं शरीर, माझं मन म्हणताना हे 'माझं' म्हणणारं कोण आहे यासाठी तुमच्याकडे जे उत्तर असेल ती ही पहिली बायको. ज्याकडे आपण सगळ्यात कमी लक्ष देतो. 
तर, माझ्या या पेशंटने फोन करून मला सांगितलं की या quarantine मध्ये मी माझ्या पहिल्या बायकोच्या जवळ आलोय. मी काही बोलायच्या आधीच तो पुढे बोलायला लागला. "मी आठवडाभरापूर्वी जो होतो, आणि आजचा मी यात खूप फरक पडलाय. रोलेक्सचं घड्याळ आहे पण त्यात मुलांना द्यायला वेळ नव्हता. तो हातात घड्याळ नसताना परत मिळाला. ब्रांडेड सुट्स आणि शूज घालून जायचं कुठेय कोणाला? बायकोने केलेल्या भजीची चव इतकी सुंदर कधीच नव्हती लागली. मी सुद्धा तिला रोज सकाळ - संध्याकाळ स्वतः तुम्ही सांगितलेला गुलकंद चहा करून देतो. जेवण वाया घालवत नाही. बाहेर जाऊन socializing करणं आणि मुखवटे घालून फिरणं हे बंद झालंय. मी आणि बायको इतक्या वर्षात एकत्र आमच्या झोपाळ्यावर बसलो नव्हतो. आता आम्ही चक्क गप्पा मारतो. माझा चुलत भाऊ रत्नागिरीत असतो. शेती करतो. तो मला माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटतोय. खरा पोशिंदा तोच आहे. दर दोन दिवसाने त्याला वीडीओ कॉल करतो. मुख्य म्हणजे मी मला स्वतःला रोज भेटतो. खिडकीच्या बाहेर क्वॉर्टर्स चा मोठा पट्टा.. तिथला समुद्र... सूर्यास्त कित्येक वर्ष पाहिला नव्हता. डॉ. शिरीष राजे सर, हल्ली रोज न चुकता सूर्यास्त बघतो.  रडतो कधीकधी... पण जड वाटत नाही रडल्यानंतर... हलकं वाटतं हल्ली. अहो, हेच आहे ना meditation ? डॉ. राजे सर..! तुम्ही एकदा म्हणालात, की सगळं जे तुम्हाला वाटतंय तुमचं नाही आहे तर... ? आज वाटतंय, हे सगळं खरंच माझं नाही. मला या ब्रेकची गरज होती. का धावत होतो कळत नाही. पैसा होता पण समाधान नव्हतं. मन थाऱ्यावर नव्हतं. कालपर्यंत सगळा देखावा होता आणि आज अचानक जगण्याची लढाई सुरू झाली तेव्हा कळलं हे किती materialistic आहे ते. परवा एक फोटो पाहिला इन्टाग्रामवर. बहुतेक इटलीतला. श्रीमंत लोकांनी पैसा रस्त्यावर टाकलेला... कारण अब्जो करोडो इटालियन लिरादेखील त्यांना आयुष्य देऊ शकले नाही, त्यांच्या कुटुंबियांचे प्राण वाचवू शकले नाही. एका वायरसने आम्हाला वठणीवर आणलंय. अनंत धन्यवाद डॉ. शिरीषसर माझ्यासारख्या प्रवाहपथीताला प्रवाहासोबत आणुन वस्तुस्थिति जाणवुन दिल्याबद्दल.. अनंत धन्यवाद राजेसर !!"
मला समाधान वाटले.... त्यांच्या कॉलने.. 
खरच खूप मोठा धडा आहे हा आपल्यासाठी. आपण आपल्याकडे bird eye view ने पाहायला सुरूवात केली तर आपण खरंच नैराश्याकडे न जाता थोडे प्रगल्भ होऊ. गरज आणि हाव या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे जाणवतंय आपल्याला. आपली मोजकी माणसं आणि स्वतःची काळजी करणं हे आज जास्त महत्त्वाचं झालंय आपल्याला. आणि इथेच खरं समाधान दडलं आहे. मी नेहमी म्हणतो, Contentment is bigger and brighter than happiness. आनंद हा क्षणिक असतो, समाधान शाश्वत आहे.
पुर्वी मी देखील उदास असतांना कपड्यांची शॉपिंग करायचो किंवा वाचनाच्या आवडीपोटी पुस्तकांचा संग्रह.. पण, त्याचा परिग्रह करणं हे काळाच्या ओघात आता खूप मागे पडलंय. 
हे माझं possession नाही हे जाणवणं महत्वाचं! ज्या शरीरात माझं वास्तव्य आहे त्याची काळजी घेणं गरजेचंच आहे पण, आपल्या मनाची, आत्म्याची काळजी घेणं हे सर्वाधिक निर्णायक आहे. आपल्याकडे असलेलं आपलं नसून ते देण्यासाठी आहे, ही आत्मिक बौद्धिक पोच महत्त्वाची. विपश्यना हा प्रवास नाही, प्रवाह आहे. लहान मोठ्या थोड्या-थोडक्या फरकाने जरी आपण, ‘मी व माझं’ या साच्यातून बाहेर आलो तर, हा कोरोनाने शिकवलेला life lesson आहे असंच मी मानेन. 
                       - डॉ. शिरीष राजे 
              मानसशास्रतज्ज्ञ (नाशिक)

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार