मनातल्या घरात
मनातल्या घरात .......
एका ठिकाणी बसून करमत नाही ...मग उगाच आपण इथं फिरायला तिथं फिरायला जातोच की ...मग ती पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या घरी ,याच्या त्याच्या घरी ,या न त्या कारणाने पाहुणा म्हणून जातोच..... मग मी ठरवलं , का नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ....
हो हो चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार ..आपणच आपल्या मनाच्या घराला भेट द्यावी ..म्हंटल, बघावं तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाच घर ...कोण कोण राहतात तिथं ..कसं स्वागत होत ते ...
ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारा पर्यंत पोहचले , अगदी छोटंसं होतं पण छान होत ..आत काय असेल या उत्सुकतेने दार वाजवत ,तर ...आतून आवाज आला ...कोण आहे ?????काय पाहिजे ????
असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना न्हवती , पण खरंच आपण कोण आहोत हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ...
मी ही सांगितलं ,मी स्व आहे रे ...ज्याच तू कधी ऐकत नाही ,ज्याच्याशी सतत वाद घालत असतोस , ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी ......
आतून आवाज आला ,बरं.... बरं... उघडतो दार .....दार उघडल्या नंतर आत पाहिलं तर अंधार होता ...मी विचारलं का रे एवढा अंधार , तो म्हणाला तुमच्याच कृपेने ....मी म्हंटल माझ्या कृपेने .....तो म्हणाला हो तुझाच कृपेने ...कारण इथं उजेड तेव्हा पडेल जेव्हा तू सकारत्मक विचारांचे दिवे लावशील .
मी ही जरा एटीतच म्हणाले , "ठीक आहे ..ठीक आहे लावते दिवे म्हणत पुढे सरकले .थोडं पुढे चाचपडत गेले तर काय ...तिथं असंख्य खोल्या होत्या ..अगदी कोंदट वातावरण होत ....मी त्याला पुन्हा विचारलं काय रे त्या खोल्यात काय दडलंय ...
तो पुन्हा म्हणाला बघ की उघडून एक एक खोली कळेल काय आहे ते ...मग मी हळूच एक खोलीचं दार उघडलं .....फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले ..जणू ते मला गिळणकृतच करणार ...मी पटकन दार लावलं ...तो म्हणाला , काय झालं ,दार का लावलं ..मी म्हंटले कसले भयानक होत रे ते ...तो पुन्हा हसत म्हणाला तुम्हीच गोळा केले आहेत ते ....तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करतात ,ज्यांचा राग करतात त्यांची संख्या किती ते कळलं का ,तुम्हीच केलेली मेघा भरती आहे ती ....
हुश्श.....अरे बापरे पुढचं दार उघडायचा धाडस होईना पण म्हंटल आता आलेच आहे तर उघडाव ...तिथं तर काय जे काही घटना पहिल्या त्याने घामच फुटला ..तो पुन्हा मिस्कील पणे म्हणाला काय , काय झालं ...मी म्हंटले अरे बाबा हे काय ..तो पुन्हा म्हणाला , तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करत गेली त्याला मी तरी काय करणात ..आता तर या खोल्या सुद्धा अपुऱ्या पडत आहेत त्या साठवून ठेवायला ..
तिथं अशा किती तरी खोल्या होत्या ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही मग त्याने त्या उघडून दाखवल्या ..ही भीती ची खोली ..ही द्वेष,ईर्षा ,वाईट विचारांची , मतभेदांची ,गैरसमजांची ,अशा अनेक खोल्यां पहिल्या ..सर्व च्या सर्व अंगावर येत होते ....
आता मात्र माझं डोकं गरगरायला लागलं ,अस्वस्थता वाढली होती .किती भयावह होत ते सर्व ...त्यामुळे पुढं काय आहे हे बघण्याची इच्छाच होत न्हवती ...हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता ...स्वतःचाच तिरस्कार वाटत होता ...
मी त्याला म्हंटल ,मी जाते आता मला नाही बघायचं काही आता ...तो म्हणाला थोडं थांब आलीच आहे तर हे पण बघून जा ...
थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो .... तिथं संपूर्ण जाळ लागलेलं होतं ...मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय ....आहा .....हा हा ...स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत ,तिथं प्रेम होतं ,तिथं माया होती ,तिथं आनंद होता , उत्साह होता ,नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता ..सुख ,समाधान शांती ने भरलेलं ..अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व होत ....
मी म्हंटल ,काय रे हे इतकं सुंदर आहे हे तू मला आधी का नाही दाखवलं ....तो मिस्कील पणे हसत म्हणाला मॅडम तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे ....मग मी म्हणाले जे आधी पाहिलं ते काय होतं ...तो पुन्हा हसत म्हणाला ...ते...ते...तुम्ही अतिक्रमण करत वाढवलेल्या खोल्या आहेत ...तुम्ही केलेला राग ,ईर्षा ,द्वेष , भीती ,नावडती माणस , नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारे करी बनून बसले , जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत ....
क्षणभर विचार केला खरंच की आपणच आपल्या सुख ,आनंदाच्या कडे जाणारा रस्ता या नकारात्मक गोष्टींच्या साठवणूक करून अडवला आहे ...मनाचा घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता ..पण ठरवलं की , आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची ...तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे ...आणि सुख समाधान ,शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा ....
बरं झालं आज मनाच्या घरात फिरून आले नाहीतर इतकं काही आपल्या मनावर नकारात्म विचारांच अतिक्रमण झालं आहे हे कळलंच नसतं ....
मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला ...आपल्या मनाच घर दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही ..स्वतःच्या घराची स्वतः साफसफाई करायची ...
मग तुम्ही कधी तुमच्या मनाच्या घराला तुम्ही कधी भेट देत आहात ......
🙏🙏🙏
Comments
Post a Comment