सेवा निवृत्तीनंतर
*मी कोण होणार ( सेवा निवृत्तीनंतर )*
निवृत्ती नंतर काय ? हा प्रश्र्न मी खूप लोकांना विचारलं तर सर्व साधारण असं उत्तर मिळायच वाचन, टीव्ही बघणार, फिरायला जाणार वगैरे वगैरे.
पण कोणाकडेही ठाम उत्तर नव्हतं व कोणाचीही मानसिक तयारी नव्हती की ते नेमकं काय करणार आहेत.
आपण नोकरी करत असताना एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. सकाळी उठायच ऑफिसला जाययच परत संध्याकाळी घरी आल्यावर टीव्ही पाहणे झोपणं व परत दुसऱ्या दिवशी तेच करायचं. जसं सर्कसमध्ये घोडा एका रिंगणात गोल गोल फिरतो तसं. या काळात आपण १२-१४ तास घराच्या बाहेर असतो.
निवृत्ती नंतर अचानक १२ -१४ तासांची पोकळी निर्माण होते व ती कशी भरून काढायची हा मोठा यक्षप्रश्न उभा राहतो.
निवृत्तीनंतर सुरुवातीचे एक दोन महिने घरी कौतुक होत पण नंतर नंतर घरचेही कंटाळतात कारण घरी बसून काही काम नसल्यामुळे सारखी भूक लागते किंवा चहा प्यावसा वाटतो. तेव्हा घरचे म्हणतात आॅफीसमध्ये जात होते ते बरं होतं हा त्रास तरी नव्हता सकाळी डबा भरून दिल की झालं.
कारण आपण निवृत्त असतो. आपल्याला काम नसतं पण आपण ऑफिसला गेल्यावर त्यांना त्यांची काम असतात त्यामध्ये आपण व्यत्यय आणत असतो.
घराच्या बाहेर पडलो तर सोसायटीमधील लोक सुरूवातीला वेळ देतात पण जेव्हा त्यांना कळतं की आपण निवृत्त आहोत त्यावेळी ते ही आपल्याला टाळायला लागतात.
ह्या सगळ्यामुळे आपल्याला नैराश्य येते. आपली कोणाला गरज नाही. सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि मीच रिकामं टेकडा आहे माझ्याकडे काहीच काम नाही.
असे वेगवेगळे विचार डोक्यात थैमान घालत असतात.
मग आमची अर्धी लाकड स्मशानात गेली, मुलाच लग्नाचं झाल किंवा नातवाच तोंड बघितले की मग मी मरायला मोकळा अशी वाक्य बोलायला सुरुवात होते आणि हे वाक्य आपण अनेकदा बोलतो. ( Biological Alarm set करतो )
जस आपल्याला सकाळी लवकर उठायचं असेल तर तसं आपण चार पाच वेळा बोलतो व त्याप्रमाणे घड्याळाचा गजर लावतो. पण पाहटे गजर वाजण्याच्या आत आपल्याला जाग येते.
अगदी तसंच खरोखरच मुलांचं किंवा नातवाच तोंड बघितल्यावर ती व्यक्ती या जगात नसते.
*आयुष्य जगण्यासाठी काही तरी ध्येय पाहिजे.*
जगण्यासाठी ध्येय असेल तर वेटिंलेटरवरचा पेशंटही पुर्णपणे बरा होतो.
*एक उदाहरण देतो सत्य घटना आहे.*
माझ्या मित्राची सासुबाई हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. डॉक्टरांच्या कोणत्याही उपायाना प्रतिसाद देत नव्हत्या म्हणून त्यांना वेंटिलेटरवर ठेवले होते. त्याच हाॅस्पिटलमध्ये दुसऱ्या एका पेंशटचा नातेवाईक होता त्यांनी मित्राला सांगितले की सासुबाईना काही तरी आनंदाची बातमी सांग. त्यांने तसं केलं व सासुबाईना सांगितले की मुलीचं लग्न ठरलं आहे. मुलगा चांगला शिकलेला व सुखवस्तू आहे. पुढच्या महिन्यात लग्न करायचं आहे. लवकर बरे व्हा. त्यानंतर चमत्कार झाला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आठ दिवसांत घरी गेल्या. कारण त्यांना जगण्यासाठी ध्येय मिळालं.
*तर आयुष्य जगण्यासाठी ध्येय, वेळेच तसंच मानसिक दृष्ट्या निवृत्ती नियोजन करणं गरजेचं आहे कस ते आता आपण पाहू.*
जसं शिक्षण संपल्यावर आयुष्याची ३५ वर्ष ( निवृत्ती वय ६० वर्ष व नोकरीची सुरूवात २५ व्या वर्षी ) आपण काय करणार आहोत त्याची तयारी १५ -२० वर्ष आधी सुरूवात करुन त्याप्रमाणे शिक्षण / अभ्यास करतो.
तसंच निवृत्तीनंतर पुढची अनेक वर्ष आपण काय करणार आहोत त्याची तयारी निवृत्ती होण्याच्या १५ -२० वर्ष आधी करायची असते. म्हणजेच साधारण वयाच्या ४० व्या वर्षी सुरूवात करायची असते.
जसं आपण मुलांना विचारतो मोठं झाल्यावर कोण होणार तसंच नोकरी करत असताना हा प्रश्र्न स्वत:ला विचारा की निवृत्त झाल्यावर कोण होणार आहेस किंवा आपल्याला काय करायचे आहे.
आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते नीट विचार करून ठरवा कारण ते तुमच्या आवडीच काम असणार आहे. कदाचित तुम्हाला गाण्याची, एखादं वाद्य वाजवायची, समाजसेवेची, लिहीण्याची, पेंटिंगची इत्यादी आवड असेल. ते एकदा ठरलं की त्याबद्दलची इत्यंभूत माहिती मिळवा.
एकदा ते पक्क झालं की त्यानंतर त्या गोष्टींसाठी रोज थोडा थोडा वेळ द्यायला सुरुवात करा. सुरुवातीला २०-३० मिनिटे व सुट्टीच्या दिवशी २-३ तास नंतर हळूहळू हा वेळ वाढवत जायचं.
असं करत असताना १५-२० वर्षाच्या सरावामुळे तुम्ही त्यात मास्टर झाल्यावर एक वेळ अशी येईल की तुम्ही पुर्ण वेळ तेच करायचं निर्णय घ्याल. कारण ते तुमच्या आवडीच काम असतं. निवृत्ती पुर्वीच तुम्ही नोकरी सोडून द्याल.
ह्या परिस्थितीत तुमच्या समोर १२-१४ तासांच काय करायचं हा प्रश्र्नच उरत नाही उलट तुम्हाला वेळ कमी पडेल एवढे व्यस्त रहाल. तुम्ही कधी म्हातारं होणार नाही कारण तुमच्याकडे तेवढा वेळच नसेल की तुमचं वय किती झाले इकडे लक्ष द्यायला. मानसिक दृष्ट्या कायम तरूण व आनंदी राहाल.
आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे.
समजा तुम्हाला तबला वाजवायची आवड आहे ते तुम्ही ४० व्या वर्षी शिकायला सुरुवात केली. १५ -२० वर्षाच्या सरावामुळे तुम्ही त्यात पारंगत व्हाल. त्या क्लासमध्येच तुमचा एक ग्रुप तयार होईल. सुरुवातीला तुम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमात वाजवाल नंतर आॅकेष्ट्रा मग सिनेमा मोठ्या मैफिलीत असा तुमचा आवाका वाढत जाईल व तुम्ही व्यस्त व आनंदात राहाल.
तर अजून कोणी निवृत्ती नियोजन केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सुरू करा व उर्वरित आयुष्य आपल्या मनासारखं, धमाल, मस्ती आनंदात जगा.
सगळ्यांना निवृत्ती जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment