भांडणशास्त्र
*भांडणशास्त्र !*
आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतूशून्य, आणि फक्त 'मी' ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेली वेळ.
हो, हेसुद्धा शास्त्र आहे, प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो. एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं आतल्या आत. पद्धत चुकली की, आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.
संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. साॅक्रेटिसच्या बायकोनं एकदा चिडून त्याच्या अंगावर पाणी फेकलं, यावर तो म्हणाला, "जरा जास्त तरी फेकायचंस. अंघोळीचं काम झालं असतं"
लक्ष्मीबाई टिळक यांचं 'स्मृतीचित्रे' वाचलं तर लक्षात येईल की, तापट व्यक्तींसोबत भांडण टाळणं, हीच खरी बुद्धिमत्ता आहे, कौशल्य आहे. हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो.
भांडण करताना काही नियम पाळले तर, आपलं जगणं सोपं होऊ शकेल. मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा; कुठंतरी लिहून ठेवा. पण, काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचं, हे आधी पक्कं करा.
सर्वांत पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा, विषय सोडायचा नाही. आज, आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच. काही विधानं करायची नाहीत. ‘तू नेहमी...' , 'तू ...' ने सुरु होणारी वाक्यं टाळायची. नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख, वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल, तरच करायचा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण भांडण करताना सुंदर तर दिसत नाहीच उलट प्रचंड भेसुर दिसतो हा विचार केला तरी संयम येईल.
प्रश्न सुटला पाहिजे, हा हेतू हवा; आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी. सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे, एका विषयावर एकदाच भांडायचं, पुन्हा कधीच नाही. वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही, हे मनात पक्कं हवं.
आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो, तो याच परीक्षेत. त्यामुळं, हे शिकलंच पाहिजे. यशस्वी व्यक्ती, आपले आदर्श टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात, याचं खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं. यासाठी चरित्रं, आत्मचरित्रं वाचता येतील.
आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो. आपल्या आईवडिलांचं, मोठ्यांचं, समाजाचं. सतत जिंकणारे, शब्दांत पकडणारे, काही हुन्नरी कलाकार या क्षेत्रात पाहायला मिळतात. यांची स्मरणशक्ती दांडगी असते, शब्दांचे अचूक अर्थ यांना माहीत असतात. नवखे तर गोंधळून जातात यांच्यासमोर. हे मात्र जिंकूनसुद्धा आतल्या आत हरलेले असतात. कारण, कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेलं असतं, तेच मौल्यवान सिद्ध होतं.
एकदा एका नवराबायकोचं भांडण झालं. दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला. नवऱ्यानं तिच्या हातात कागद दिला. त्यावर फक्त लिहिलं होतं,
'... but i like you.'
कधी कधी 'हारके जितने वाले बाजीगर 'असतात ते असे.
'जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम, वो फिर नही आते...', हेच खरं !
असं म्हणतात की, एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो, ते तो गेला म्हणून नाही तर, तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो ते आठवून ! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास...
Comments
Post a Comment