माघार

माघार

ज्या माणसाला योग्य कारणांसाठी, योग्य वेळी, योग्य प्रमाणात माघार घेणे जमते, त्याच्या आयुष्यात कमीत कमी समस्या येतात असे माझे निरीक्षण / अनुभव  आहे. . बघा विचार करून.

आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे घडत नाही. खरेतर हा अनुभव प्रत्येकाला बरेच वेळा येतो. आपल्याला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी आपण नक्की प्रयत्न केले  पाहिजेत, पण प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित यश मिळाले नाही, तर वेळेवर माघार घेता आली पाहिजे. तसेच जे मिळाले आहे ते स्वीकारता आले पाहिजे व त्यावर प्रेम करता आले पाहिजे.

माघार म्हणजे पराजय नव्हे. परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी माघार आवश्यक असते. यशस्वी माघार घेणे म्हणजे  सुद्धा एका अर्थाने जिंकणेंच होय. युद्धात -राजकारणात - सामाजिक  जीवनात - नातेसंबंधात जो यशस्वी माघार घेतो, तोच अखेर विजयी होतो.

माघार शब्दात घार दडलेली आहे. घार जशी आत्मविश्वासाने आकाशात झेप घेते तसेच वर्तन माघार घेतल्यानंतर व परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर आपल्याकडून अपेक्षित असते.

ज्या माणसाला लहानपणापासून कष्टसाध्य यश मिळते, त्याला  माघार घेणे परिचयाचे असते. त्यामुळे अश्या वेळी त्याच्या मनावर माघार घेण्याचा ताण येत नाही. परंतु ज्या माणसाला  आयुष्यात प्रत्येक गोष्ट विनासायास मिळत जाते, त्याच्यासाठी माघार घेणे हे खूप कठीण असते. त्याच्या मनावर प्रचंड ताण येतो. आयुष्य निरर्थक वाटू लागते. हीच ती वेळ असते स्वत:ला सावरण्याची.

माघार घेण्याचे प्रसंग कमी यावेत किंवा येऊ नयेत असे वाटत असेल, तर वागताना, बोलताना टोकाची भूमिका घेणे टाळावे. योग्य सल्ला चांगल्या  भाषेत द्यावा. जे बोलाल तेच मनात असू दे. मनात असलेले प्रत्येक वेळी बोललेच पाहिजे असे नाही.

बघा विचार करून.... !

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार