स्वभाव

मिहिका जेव्हा बाहुलीचा हात तोडते आणि त्या तुटक्या हाताने मला bye-bye करते तेव्हा मला कससंच होतं.  लहान असताना मी खूप भातुकली खेळायचे. माझ्या बाहुल्यांना जपायचे. त्यांचा हात मोडला, डोळा पडला कि मलाच रडू यायचं. मला आता हे बाहुल्यांच्या बाबतीत फारसं होत नाही. पण माणसांच्या बाबतीत मात्र होतं. लहानपणी पण मला मारामारी, अंगाशी येणारी मस्ती, उड्या मारणे फारसं रुचायचं नाही. खूप शांत, सोशिक अशी मुलगी होते.  आजही थोड्या-फार फरकाने मी तशीच आहे. (ह्या आत्मस्तुतीला बऱ्याच जणांची मान्यता मिळेल).   मी शक्यतो, मारणे, भांडणे ह्या गोष्टीच्या विरोधात असते. शक्य तेवढं टाळते.

मिहिकाचं मात्र तसं नाही. ती मुळातच चंचल. आता इथे तर क्षणात दुसरीकडे. वारा वहावा तशी पळत असते. बाहुल्या वगैरेंशी नावालाच खेळते.  त्यांचे हात-पाय तोडते.  ढकलणे, ओढा-ओढी, तिच्या बाबाशी कुस्ती हे तिच्या आवडीचे खेळ. तिला बाहुलीचा हात तुटणे वगैरे गोष्टीनी फारसा फरक पडत नाही.  भांडणं वगैरे मस्त मन लावून करत असते. तिचं आणि शांततेचं वाकडं आहे.

मिहिका आणि मी वेगवेगळ्या स्वभावाच्या  दोन व्यक्ती आहोत. आमचा हा स्वभाव आमच्या खेळण्यातून बऱ्यापैकी लक्षात येतो. ह्याचा अर्थ असा नाही कि, भातुकली खेळणाऱ्या सगळ्या मुली शांत असतात किंवा न खेळणाऱ्या सगळ्या भांडखोर.  एखाद्या गोष्टीला  आपण कसा प्रतिसाद  देतो, हे मात्र आपल्या स्वभावावर बऱ्याच प्रमाणांत अवलंबून असतं. आपल्या खेळण्यातून, वागण्यांतून, आवडी-निवडीमधून  ते दिसत असतं.

काही मुलांना एकटंच खेळायला आवडतं, तर काहीना मुलांच्या सोबत, काही जणांना बॉसिंग करायला आवडतं तर काहीजणांना ते करून घ्यायला आवडतं. काहीजणांना मुळातच तक्रार करायला आवडते तर काहीजण विनातक्रार सगळं फक्त स्विकारत असतात. काहीजणांना लक्ष आकर्षित करायला आवडतं. हे सगळे स्वभावाचे कंगोरे असतात.

मुलांचा स्वभाव जेव्हा आपल्याला हवं तसा असतो तेव्हा आपण खूप खुश असतो.  आपल्याला अभिमान वाटत असतो. स्वभाव वेगळा असला कि मात्र भांडणं, सतत सूचना देणं, बदलण्याचा प्रयत्न  करणं सुरु होतं. कितीदा तरी अशा बदलण्याच्या प्रयत्नातून फक्त निराशाच पदरी पडते. आपण मुलांची सतत तुलना करू लागतो. 'तो बघ कसा चपळ  आहे, तू मंद .' 'ती बघ कशी अभ्यास करते, तू कर'. असं बोलतो. नाहीतर, 'मी कसं रात्रंदिवस वाचायचे, हे असं तोडफोड करत कधीच बसले नाही.' असं तरी बोलतो. एकूण काय तर आपण तुलना आणि तक्रार करत राहतो.

जेव्हा काही आई-वडिलांच्या तक्रारी विचारांत घेतल्या तेव्हा असं जाणवलं, कि मुलांना बदलता येत नाही, ह्याचा त्यांना खूप त्रास होत असतो. त्यामुळे त्यांची स्वत:ची चिडचिड वाढलेली असते. वैताग आलेला असतो. 'हि अशी का? किंवा हा असा का? ' हा प्रश्न सतावत असतो. ह्या 'का' ला उत्तर नाही.

मुलांचा स्वभाव आवडीनिवडी, खेळण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असू शकते. मला बाहुलीचा हात तुटल्यावर कसंतरी होतं, म्हणून मिहिकालासुद्धा व्हायलाच हवं का? पालक म्हणून वाढताना मुलांचा स्वभाव आहे तसा स्वीकारणं फार आवश्यक असतं.

मग वळण लावणार कसं? वळण लावताना ते स्वभावाला लावण्यापेक्षा वागण्याला लावायला हवं. म्हणजे रागीट स्वभाव असेल तर राग व्यक्त कुठे आणि कसा करायचा ह्याला वळण हवं.  राग यायलाच नको, असं म्हणून चालणार नाही.  मागे माझ्या एका मैत्रिणीने विचारलं, 'तुला हिला (मिहिकाला)आवरता येतं का?' मी म्हणाले, "तिला आवरण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही". ती खोड्या करणार, धावत सुटणार, धडपडणार, वाद घालणार, स्वत;च्या मतांना फारशी मुरड घालणार नाही हे मी गृहीतच धरलेलं असतं. तिला आवरताना मी फक्त काही काळजी घेण्याच्या काही सूचना देते, तिला पटतील अशा. वाद घालताना तिने आम्हाला तिचं मत उदाहरण देऊन पटवावं हा नियम असतो. तिने वादच घालू नये, मी म्हणेन ते ऐकावं, असं म्हटलं कि प्रश्न गुंतागुंतीचा होत जातो.

इथे लक्षात घ्यायला हवं कि, ती आणि मी फक्त उदाहरणं आहोत. प्रत्येक मुलाच्या स्वभावातल्या खाचाखोचा ओळखणं आणि त्यानुसार त्यांचं आणि आपलं वागणं वळवणं हे अवघड असलं तरी आनंद देणारं असतं. पालक होणं म्हणजे मुलांना शहाण्यासारखं (आपल्याला हवं तसं) वागायला लावणं नाही. तर त्यांच्याबरोबरीने पुन्हा एकदा लहानाचं मोठं होणं. त्यांच्या रंगात रंगून  जाणं. असं झालं तर पालकत्वाचा प्रवास  खूप आनंद   देणारा ठरतो.

-वसुधा देशपांडे-कोरडे
Vasudha Deshpande-Korde
M.A. (Psychology), M.Sc.(Psychology)(UK) MBA (HR)(UK).
Mindmaster counsellors,
Ganesh corner, Mahesh Society,
Bibwewadi, Pune
9225505369

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार